पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 नारायणराव पेशवे मरण पावले तेव्हां गंगाबाई गरोदर होती. तिला तारीख १८ एप्रिल सन १७७४ रोजीं पुत्र झाला. त्याचें नांव सवाई माधवराव असें ठेवण्यांत आलें व त्याच्या नांवें पेशवाईची वस्त्रें छत्रपतींकडून घेऊन राज्यकारभार नाना फडणीस व सखारामबापू यांनी चालविला. दादासाहेब इंग्रजांच्या आश्रयास गेले. त्यामुळें इंग्रजांची व मराठयांची लढाई गुजराथेंत सुरू झाली. मराठी फौजेवर मुख्य सरदार हरिपंत फडके होते. त्या फौजेत इचलकरंजीचें पथक दादा सावंत याच्या हाताखाली नापार वगैरे ठिकाणच्या लढायांत होतें व त्याने उत्तम रीतीनें आपली कामगिरी बजावली. कोल्हापूरकरांची इचलकरंजीकरांवर किती खप्पा मर्जी होती याविषयी मागें जागोजाग उल्लेख आला आहे. इचलकरंजी संस्थान रसातळास मिळवावें म्हणून करवीरकरांची बहुत इच्छा होती व तसें करण्याकरितां त्यांजकडून वारंवार यत्नही करण्यांत आला. परंतु आजपर्यंत त्यांस केव्हांही यश आलें नाही.
 जिजाबाई वारल्यावर त्यांच्या जागीं राणी दुर्गाबाई करवीर राज्याचा कारभार चालवूं लागल्या. यांच्या कारकीर्दीत पुण्याच्या बारभाईंची व दादासाहेबांची रणें माजून राहिलीं होतीं. त्या भानगडींत अर्थाअर्थी कांहीं संबंध नसतां करवीर दरबाराने आपणास गुरफटून घेतलें ही फार वाईट गोष्ट झाली. त्यांनीं वर्षानुवर्ष पेशवाईवर स्वाऱ्या करून व आपल्या राज्यावर स्वाऱ्या आणवून दोन्हींकडच्या रयतेची दैना केली व तिचा निष्कारण तळतळाट माथीं घेतला ! इतका दंगा करून करवीरकरांस काय मिळवावयाचें होतें हें त्या वेळच्या लोकांस कळले नाही व अजूनही आम्हांस कळत नाहीं !ताराबाईसारखी धामधूम करून सातारचें राजमंडळ अथवा निदान