पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१०८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

तिचा ताबडतोब फडशा करावा म्हणून सरकारांतून ताकीद झाली व तगाद्याकरितां कारकून व ढालाईत इचलकरंजीस येऊन बसले. नारायणराव तात्या अलीकडे कित्येक महिने फार आजारी होते त्यांस तसेच टाकून सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्यांजबरोबर या खेपेसही गेले होते.तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सद्दी व पेशवे यांजवळ अनूबाईंनी बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रुपयांवर तोड झाली व ते रुपये बाईनीं चार महिन्यांत द्यावे असें ठरले. बाईविषयीं पेशव्यांच्या दरबारात अद्यापि आदर व प्रेमबुद्धि वसत होती. तफावतीच्या तपाशिलाची त्यावेळीं याद ठरली तींतल्या कित्येक रकमा 'वडील मनुष्य, सबब रयात' असा पेशव्यांचा शेरा होऊन माफ झालेल्या आहेत.
 पेशव्यांची स्वारी त्या सालच्या कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं ता. १२ नोवेंबर रोजी लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस नारायणरावतात्यांस देवाज्ञा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आलीं.
 अनूबाईंचा आतां वृद्धापकाळ झाला होता. गेलीं पंचवीस वर्षे संस्थानचा सर्व कारभार त्याच पहात होत्या. नानासाहेब पेशव्यांच्या अखेरीपर्यंत बहुतेक स्वाऱ्यांत त्या हजर असत. तात्या व त्यांचे कारभारी मोहिमेवर जात असत इतकेंच, परंतु त्यांच्या फौजेची तयारी करणे व त्यांस पैशाचा पुरवठा करणें या बाबतींत अनूबाईंस सारखें लक्ष घालावें लागे. दरबारचीं कामेंही सर्व त्याच करून घेत असत.