स्वरांत/मनोगत

विकिस्रोत कडून



मनोगत
..........इतकंच!

 खूप खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. मी छोटी होते तेव्हाची. दरवर्षी उन्हाळ्यात नाहीतर दिवाळीच्या सुटीत आम्ही पार्ल्याला जात असू. मामाकडे. चांदवडचा चढ असो, नाहीतर कसाऱ्याचा हिरव्यागर्द झाडांनी वेढलेला वळणदार घाट असो. माझे डोळे खिडकीच्या बाहेर गढलेले असत. मला वाटे, हे आकाश . , हे दगड..., हा डोंगर... हे झाडं ही पिवळी फुलं... मला पुन्हा कधीच भेटणार नाहीत. मनांत आंत कुठे तरी व्याकुळतेची लहर दाटून येई. डोळे अधाशासारखे सारं गिळून घ्यायला धडपडत. मग दारची सारी म्हणत, 'खुळं आहे' झालं. या खुळेपणाचं कौतुक केलं माझ्या मामांनी. वक्तृत्वस्पर्धेत मिळालेलं बक्षिस असो; नाहीतर महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झालेला चिमुकला लेख असो. किंवा थरथरत्या आवाजात गायलेली एखादी कविता असो. कौतुकाचा हळुवार शिडकावा केला मामांनी नाहीतर आईंनी. त्यामुळेच खुळेपणाला शब्दांचे कोंभ फुटले. पार्ल्याच्या बंगल्यात रहाणाऱ्या गानूंची मी भाची नसते तर, जीवनाचा ओघ दहादिशांनी अंगभर झेलावा; त्याचे गार...उष्ण...कडवट स्पर्श अंतरात गोंदवून घ्यावेत, हे कळले असते की नाही कुणास ठाऊक !
 "तू मुलगी आहेस. म्हणून हे करू नकोस. इथे जाऊ नकोस." असा संस्कार आई-पपांनी दिलाच नाही. पण केलेल्या कृतीच उत्तरदायित्व स्वीकारावच लागवं याची कठोर जाणीवही दिली. आम्ही विवाह करायचं ठरवलं. तर, डॉक्टरना पहायची उत्सुकता पपांनी दाखविली नाही. लग्नाच्या दिवशीच सासरे-जावयाची गाठ पडली. त्यांच्या मित्रांनी आदल्या दिवशी विचारलं होतं.
 'शंकरराव, तुम्ही अजून जावयाला पाहिलं नाही. मुलगी आंतर-जातीय लग्न करतेय. पुढे काही बखेडा झाला तर?...'
 पपांनी नेहमीप्रमाणे ओठात हसत उत्तर दिलं "तिला शिक्षण दिलंय. तिने विशी ओलांडलीय. जीवनाबाबत बरं वाईट तिला कळायला हवं. पुढे काही अडचणी निर्माण झाल्या तर, त्याचे उत्तरदायित्व तिच्यावर आहे. त्या अडचणी तिने निभवायला हव्यात. आम्ही आहोतच. पण असं काही घडणार नाही असा मला विश्वास आहे."
 आई-पपांनी दिलेला हा विश्वासाचा सूर पुढे डॉक्टरांनी पण जपला. माझ्या वेड्यावाकुडया शब्दांचे पहिले वाचक तेच राहिले आहेत. त्यांची तक्रार असते की मी खूप कमी लिहिते. पण लिहू म्हटल्याने का कुठे लिहिता येते ? आणि लिहायचं नाही म्हटल्याने का कुठे स्वतःला रोकता येते ?
 गेल्या ८/९ वर्षात लिहिलेल्या, पहिल्यावहिल्या नऊ कथांचा संग्रह आज इंद्रायणीत अर्पण करतेय. (या कथा स्त्री, माहेर, मेनका, मराठवाडा यातून प्रकाशित झाल्या आहेत.) या कथासंग्रहात तरण्याचे सामर्थ्य असेल तर तो तरेल. अन्यथा बुडून जाईल. नव्हे, त्याने बुडायलाच हवे. खऱ्या कला असतील तरच इवलासा कोवळा जीव जन्माला येतो. खोटया कळा खोट्याच असतात. उदरात लपलेल्या जीवाला मोकळा श्वास देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते. अळेबळे जन्माला घातलेला अनुभव अल्पायुषीच ठरणार.
 तरीही मी समाधान मानीन. कारण या फसव्या कळांतूनच, खऱ्या; जन्मोत्सवी कळांच्या लाटा जन्माला येतात. ते सामर्थ्यही कधीनाकधी लाभेल !!!
 संसार, नोकरी, वाकीच्या उठाठेवी यात बुडालेल्या या भाबीच्या कथा एरवी इकडेतिकडेच लोळल्या असत्या. जर महावीर जोंधळेसारखा दीर लाभला नसता तर ! कथा, मागेलागून नेण्यापासून ते त्यांना देखणं रूप देईपर्यन्तचे सारे संस्कार त्यानेच केले आहेत. साथ मिळाली श्री. बाबा भांड यांची. प्रकाशनार्थ अनुदान मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपडही या दोघांनीच केली. त्यांच्या सहयोगामुळेच 'स्वरान्त' ला रूप लाभले आहे. पण आभार कशी मानू ? सारीच आपली.
 'स्वरान्त' च्या निमित्तानं जे जे मनात आलं, त्याला मोकळी वाट करून देतेय. इतकंच.

- शैला लोहिया