सप्तशती (मोरोपंत)/तृतीय चरित्र - अध्याय दुसरा

विकिस्रोत कडून

प्रकुपित दूत सविस्तर शुंभासि शिवोक्त सर्व आयकवी, विघ्नितकामखळाचा वर्णील क्रोधवेग काय कवी ? १


त्या दूतोक्तश्रवणें कोपें अत्यंत तापला खळ, गा ! व्यसनांत आपणाला पाडी मद, जेंवि आपला खळगा. २


घ्यावें फ़ुटकें तुंबीफ़ळ गंगालघनार्थ बाहूनीं, हें कार्य तसें सांगे, मूढा असुराधिपास बाहूनी :- ३


" हे धूम्रलोचना ! त्वां दानें; मानेंहि, नित्य जी तुष्टा, स्वचमू घेउनि सत्वर जावें, जेथें असेल ती दुष्टा. ४


केशातें धरुनि बळें, आकर्षुनि, करुनि विह्वळा, वीरें आणावी, जाणावी आज्ञा नि:संशया तुवां धीरें. ५


तीतें रक्षाया जरि तेथें कोणी उठेल जो दक्ष, मारावाचि, असो पर तो सुर, गंधर्वराज कीं यक्ष. " ६


साठ सहस्त्र असुरबळ घेउनि लंघावयासि तो मळधी पावे श्रीदुर्गेतें, वेळेतें खवळला जसा जळधी. ७


जी व्यसन आश्रितांस न बाधों दे, जेंवि घनघटा ऊन, त्या भगवतीस तो खळ बळमत्त असें वदे दटाऊन :- ८


" शुंभनिशुंभापाशीं चाल, तिळहि हित नसे दुरभिमानीं, त्या प्रभुच्या आज्ञेतें सर्वस्वहितावहा सुरभि मानीं. ९


प्रभुची आज्ञा मोडिसि ? आवडली तुज नवीच कां चाल ? प्रभुवागवशांसि म्हणे नय, कीं ‘ पाशीं पडोनि कांचाल. ’ १०


तूं नीतिनें जरि न, त्या मत्स्वामिसमीप, धरुनि मद, येसी केशीं कवळुनि, ओढुनि, नेयिन, कीं कुजन पात्र न दयेसी. " ११


जगदंबा त्यासि म्हणे, " दैत्येंद्रें धादिलासि या काजा; तूंहि बळी बळविष्टित जरि नेसिल, यत्न काय तरि माजा ? १२


नेसिल बळेंचि मज, कीं तूं बळवा‍न् ज्ञातधर्मनय, शस्त्री, कळह करुनि पुरुषासीं तेजें साधी न शर्म, न यश, स्त्री. " १३


तो समजे देवीनें रचिल्या विपुळा निजोपहासासी, तीवरि धांवे व्याघ्रीवरि ओतु - तसा सकोप हा सासी. १४


हुंकारेंचि तयातें सहसा परमेश्वरी करी भसित, प्रकटी यश दरहिमधरहिमकरदुग्धाब्धिहरहरीभसित. १५


क्रोधें तेहि खवळले, गर्वें कोठेंहि जे न पर माती, पर माती करि त्यांची, तत्काळचि तो मृगेंद्र, परमा ती. १६


त्या धूम्रलोचनाचा, तत्सैन्याचाहि, नाश कळला हो ! शुंभ म्हणे, ‘ ती दुष्टा या कर्माचें यथार्ह फ़ळ लाहो. ’ १७


आज्ञा करी शिवेवरि जाया तो शुंभ दैत्य पुंडातें, जेणें निवेदिली ती त्या चंडातें, तयाहि मुंडातें. १८


" रे ! चंडमुंड ! हो ! जा सत्वर घेवूनि विपुळसैन्यातें, आणा, खाणा तन्मदगद; द्या, धिक्कार करुनि, दैन्यातें. १९


ये ना तरि अंबेतें ओढाचि बळें धरूनियां वेणी, किंवा बांधुनि आणा; वृकचि तुम्हीं असुरवीर, ती एणी. २०


अथवा गांठुनि समरीं असुरांहीं शस्त्रशतगणें अल्पा, सिंह वधूनि, करावी, ती सर्वांहीं झटोनि हतकल्पा. २१


मग करुनि बहु कठिन निजमन, बंधन तीस बळकट करा हो ! तुमचें असावध, स्त्री ती धरिल्याही, न पळ कटक राहो. २२


कार्यकरा भृत्यावरि पूर्ण प्रभुचा प्रसाद, हें जाणा, साधु - असाधु करा, परि बहु सत्वर मत्समीप ती आणा. " २३



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.