सप्तशती गुरूचरित्र/अध्याय पंधरावा

विकिस्रोत कडून

शिष्यांप्रति गुरु म्हणती । तीर्थें हिंडा सर्वक्षिती । भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥

ते संसृतिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद । गुरु म्हणती निर्विवाद । चला खेद सोडूनियां ॥२॥

वाक्य तादृश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी । म्हणती जावे कोण्या स्थानीं । तें ऐकूनी गुरु बोले ।

सात पुरी धाम चार । बारा ज्योतिर्लिंगें थोर । आचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप ।

आचारावें तीर्थी क्षौर । जसा असे स्वाधिकार । तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम ।

जे कोणी जितुके गाव । तीर्था जाती ठेवूनि भाव । तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तयांचे ।

पाहुनि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम । ऋतु निवर्ततां ग्रीष्म । तीर्थधाम विटाळे ॥७॥

स्वधर्मानें आठ मास । फिरा ठरा चार मास । नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ ।

दोष नच तीरस्थांसी । तीन दिन महानदीसी । अहोरात्र र्‍हदकूपासी । करा ऐसी यात्रा तुम्हीं ।

पाप मोचन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य । श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१॥

इति श्री०प०वा०स०गु० सारे तीर्थयात्रानिरुपणं नाम पंचदशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]