श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - दत्तजन्म

विकिस्रोत कडून

ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥

तुझे कीर्तिगुण वर्णाया लागुन । इच्छितसे मन माझें बहु ॥२॥

तरि देई मति वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥

आयका हो तुम्ही श्रोते संतजन । जन्म सुलक्षण श्रीदत्ताचा ॥४॥

सावित्री आणिक लक्ष्मी पार्वती । एके ठायीं स्थीति जाली होती ॥५॥

अकस्मात आली नारदाची फेरी । विणा स्कंधावरी घेउनियां ॥६॥

देवोनियां त्यातें बैसाया आसन । पुसती वर्तमान त्रैलोकीचें ॥७॥

असे नारदमुनीं त्रैलोक्य भुवनीं । आम्हा ऐशा कोणी असती काय ॥८॥

पतिव्रता आणि सर्वसत्ता आंगीं । ऐशा कोणी जगीं असती काय ॥९॥

ऐशा गर्विष्ठ पाहे तिघीजणी । बोले नारदमुनी तयालांगीं ॥१०॥

तुमची याहुनी श्रेष्ठ कोटीगुण । देखलीसे जाण पतिव्रता ॥११॥

भूलोकाचे ठायी अत्रिमुनी-जाया । सती अनुसूया नाम तिचें ॥१२॥

तुम्हां ऐशा दासी तिजला शोभती । काय सांगूं ख्याति तिची तुम्हां ॥१३॥

ऐसे आयकोनी मुनीचें वचन । मनामाजीं खिन्न जाल्या तिघी ॥१४॥

आपुलिया घरा उठोनियां गेल्या । पतीसी बोलत्या जाऊनियां ॥१५॥

आइका हो तुम्ही आमुचें वचन । कासावीस होती प्राण बहू ॥१६॥

अनुसूयेची कीर्ति नारदमुनीनीं । वर्णिली येवोनी आम्हांपाशीं ॥१७॥

तरी तुम्ही जावें मृत्युलोकाठायी । अनुसूयेचे गृहीं लागवेगीं ॥१८॥

हरोनियां तिच्या सत्वालागीं जाण । यावें परतून निजघरा ॥१९॥

स्त्रियांचे वचन आयकोनी कानीं । तिघे तत्क्षणीं उठीयेले ॥२०॥

ब्रह्मा विष्णु आणि तिजा चंद्रमौळी । निघाले ते काळीं मृत्युलोका ॥२१॥

स्नानसंध्येलागी अत्रिमुनि गेला । माध्यान्हीं पातला दिनमणी ॥२२॥

तयाकाळीं तिवे होवोनि अतीत । गेले आकस्मात् भिक्षेलागीं ॥२३॥

अनुसुयेलागीं मारुनियां हांक । बोलती कौतुक करोनियां ॥२४॥

भिक्षा घाली माते आम्हांसी सत्वर । नग्न दिगंबर होवोनियां ॥२५॥

नाहीं तरी आम्ही जातो परतोनि । सत्त्वासि घेऊनि तुझ्या आतां ॥२६॥

आयकोनि ऐसें अतिथी वचन । पतिव्रतारत्‍न चिंतावलें ॥२७॥

करोनियां मनीं पतीचें चिंतन । तीर्थातें घेऊन शिंपीयलें ॥२८॥

तंव ते तिघेजण झाले चिमणे बाळ । रांगती लडिबाळ होवोनियां ॥२९॥

अनुसुया नग्न होवोनियां आपण । करि दुग्धपान तयांलागीं ॥३०॥

तिघेजण एक्या पालखीं घालून । ओवीया गाऊन हालवीत ॥३१॥

इतुकियामाजीं अत्रिमुनी आले । बाळांतें पाहिलें निजडोळां ॥३२॥

विस्मित होवोनि आपुलीया मनीं । म्हणे श्रेष्ठ कोणी असती हे ॥३३॥

असो या लागून झाले बहुदिन । स्वर्गींचें भुवन शून्य ठेलें ॥३४॥

लक्षुमी पार्वती सावित्री या तिन्ही । चिंताग्रस्त मनीं जाल्या बहू ॥३५॥

एके ठायीं सर्व होवोनियां गोळा । चिंता वेळोवेळां करिताती ॥३६॥

इतुक्यांत आली नारदाची फेरी । मंजुळ उच्चारी नाममंत्र ॥३७॥

देवोनि आसन बैसविले मुनी । करिती विनवणी तयांलागीं ॥३८॥

आमुचे भ्रतार गेले कोणीकडे । आम्हांसी सांकडें घालोनियां ॥३९॥

तयावीण आम्हां न गमेचि क्षण । जाले बहुदिन तयालागीं ॥४०॥

तयांवीण सर्व शोभीत मंदीर । दिसति भयंकर आम्हांलागीं ॥४१॥

तुम्हांप्रति कोठें भेटतील तरी । सांगावें सत्वरीं आम्हांलागीं ॥४२॥

तंव बोले मुनि तया स्त्रियांप्रति । देखियेले पती तुमचे म्यां ॥४३॥

अनुसूयेचे घरीं तिघेजण बाळ । होवोनि लडिवाळ खेळताती ॥४४॥

आयकोनि ऐंसें मुनीचें वचन । विस्मित होऊन बोलती त्या ॥४५॥

आमुचिया बोला गेले सतीघरीं । आम्हांलागीं घोरीं । घालूनियां ॥४६॥

चला जाऊं अतां तयेचिया घरा । मागूनि भ्रतारा घेऊं आजी ॥४७॥

अभिमान दूर सांडुनियां जाण । पातल्या शरण अनुसूयेसीं ॥४८॥

म्हणती वो माते देई चुडेदान । करी बोळवण आम्हांलागीं ॥४९॥

भ्रतारांवाचून आमुचे पंचप्राण । कंठापाशीं जाण आले माते ॥५०॥

सर्वभावें आतां शरणागत आम्ही । द्यावे आमुचे स्वामी आम्हांलागीं ॥५१॥

पतिव्रता म्हणे ’न्यावे आपुले पती । धरुनियां हातीं आपुलाले’ ॥५२॥

तवं त्या बोलती तिवीजणी तीतें । ओळख आम्हांते न पडेचि ॥५३॥

समान दिसती ब्रह्माविष्णुरुद्र । तिन्ही मुखचंद्र सारिखेची ॥५४॥

माय होवोनियां दीन । मावशी । द्यावे हो आम्हांसी ओळखून ॥५५॥

ऐशा त्या वेल्हाळा पाहूनियां दीन केलेसें विंदान अनुसूयेनें ॥५६॥

पतीच्या तीर्थासीं शिंपूनी मागुती । तिघीचेही पती दाखविले ॥५७॥

ब्रह्माविष्णुरुद्र होवोनि प्रसन्न । म्हणे ’वरदान मागें कांहीं ’ ॥५८॥

म्हणे अनुसूया द्यावे ऐसे वर । तिवेही कुमर तुम्हां ऐसे ॥५९॥

तथास्तु म्हणोनि देऊनीयां वर ब्रह्महरीहर जाते झाले ॥६०॥

तयांच्या प्रसादें जाले तिघे पुत्र । उत्तम पवित्र पुण्यशील ॥६१॥

विरंचीचा चंद्र शिवाचा दुर्वास । विष्णूचा तो अंश दत्तात्रय ॥६२॥

तयाकाळीं हर्ष जाला जयजयकार । येती सुरवर तया ठायां ॥६३॥

आनंदोनि देव वर्षती सुमनें । करिती निंबलोण सर्व जग ॥६४॥

निरंजन म्हणे धन्य आजि दिन । पाहिलें निधान दत्तात्रय ॥६५॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]