श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० डिसेंबर

विकिस्रोत कडून

२० डिसेंबर

नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥


<poem>

प्रारब्धानुसार देहाची गति । तेथे न गुंतवावी आपली वृत्ति ॥

प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥

देह प्रारब्धें जातो । सुखदुःख भोगवितो ॥

जें जें काहीं केलें । ते ते फळाला आलें ।

म्हणून देहाची गति । ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥

पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥

सुदामा भगवंताचा भक्त झाला । पण दारिद्र्यांत राहिला ॥

म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥

जैसें दुःख येते प्रारब्धयोगें । सुख आहे त्याचे मागें ॥

दोहोंची न धरावी चाड । नामाची ठेवावी आवड ॥

चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥

देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥

प्रारब्धानें आलेले कर्म करीत जावें । त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे ॥

साधुसंत देवादिक । हे प्रारब्धांतून नाही सुटले देख ॥

जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन ।

समाधान नसावें त्याचेवर अवलंबून ।

त्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥

दुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली । तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥

मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥

नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावे सत्य ।

हा निश्चय ठेवावा मनांत । मन होईल निभ्रांत ॥

कर्तव्यीं असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥

नामाचें प्रेम करावें जतन । जैसा कृपण राखी धन । कारण नामच आपल्याला तारण ॥

मुखीं रामाचें नाम । बाह्य प्रपंचाचें काम ।

ऐसा राम जोडा मनीं । दुःखाचा लेश न आणावा मनीं ॥

आजवर राहिला वासनेचा आधार । अतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥

असती पुण्याच्या गांठी । तरच नाम येईल कंठी ॥

रामाचें नांव ज्याला न होईल सहन । त्याची गति नाही उत्तम जाण ॥

निर्हेतुक घ्यावें नाम । जेणें जोडेल आत्माराम ॥

नामाविण जें जें साधन । तें तें कष्टास मात्र कारण ॥

देह जरी नाशवंत । सांगितलेलें नाम आहे सत्य ॥

बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनिवार ॥

नामांत कसलेही विचार आले । तरी ते नामानें दूर सारावे भले ॥

नामस्मरणीं निदिध्यास । स्थूलाची न करावी आस ॥

अखंड राखावें समाधान । हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥

जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ।

बाकी कितीजण आले गेले ।

मनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥

परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.