श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ ऑगस्ट

विकिस्रोत कडून

१८ ऑगस्ट

रामाला अनन्यभावे शरण जा.


प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला, तर खचित् असे आढळून येईल, की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसाअडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही बऱ्यावाईट कर्माचा अभिमान धरू नका, किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट् करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. 'राम कर्ता' म्हणेल तो सुखी, 'मी कर्ता' म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावे आणि मजेने असावे; आनंदाने संसार करावा. 'तुझ्या नामस्मरणाची गोडी दे' हेच मागावे.

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून, समाधानात रहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असे वागल्याने हवे-नकोपण नाहीसे होते, आणि अहंपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्यभावे शरण जा. 'रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन,' अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार ? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले, म्हणून ते 'समर्थ' होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवद्‌भजनात आपला वेळ घालवावा, आणि तरूण असतील त्यांनी भगवत्‌स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे; यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो, त्याला उपदेश करण्याची जरूरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल. म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.