श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० फेब्रुवारी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१० फेब्रुवारी

अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश.


<poem>


अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माउली ॥

स्वार्थरहित रामसेवा । याहून दुजा लाभ न जीवा ॥

वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंतसेवा ।

चित्ती भगवंताचे ध्यान । आपण रहावे रामार्पण ।

याहून अन्य सेवा । कोणतीही नाही जाण ॥

जे जे दिसते ते ते नासते । हा बोध घेऊनि चित्ती ।

सज्जन लोक जगी वर्तती । तैसे तुम्ही आता वागा जगात ॥

मुलां-बाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात उदास न व्हावे ॥

प्रपंचाची उपाधि । आता मनात न आणावी ॥

उपाधिवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥

उपाधीत राहिला । परि चित्ताला न वास दिला ।

ऐसे ठेवा मनी । राम आणावा ध्यानीं ॥

आता यापरतें हित । नाहीं दुसरे जगांत ।

हा माझा बोल । न मानावा फोल ॥

आता रामा तुझा झालो । कर्तेपणातून मुक्त झालों ।

ऐसें आणावे मनांत । शक्य तितके राहावे नामात । याहून दुसरें न आणावे मनांत ॥

लौकिकांतील मानापमान । यांचे सोडावें उदक । ध्यानीं आणावा रघुनंदन एक ॥

बायकोमुलांबाळांत राहावे । चित्त रामाकडे ठेवावें । होईल तेवढे नाम घ्यावें ॥

अंतरी परमात्मा त्यास । ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास ॥

न सोडावा मनाचा धीर । मागे आहे रघुवीर ॥

वृद्धपण आलें । शरीर क्षीण झालें ।

तरी आपण अभिमान घेऊनच राहिले । त्यास सोडावें दूर ॥

प्रपंचांत वृद्धपणीं फारसें न पाहावें । मुलांस मार्ग दाखवून सुखी राहावें ॥

औषध पथ्यपाणी सांभाळावें । पण दुःखी कष्टी कधीं न व्हावें ॥

शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति क्षीण नाही बनली ॥

जोवर देहाची संगति । तोवर "मी-माझें" ही वृत्ति ॥

आता वृत्ति राखावी रामापाशी । दुजी उठू न द्यावी त्यापरती ॥

आजवर जें घडलें । ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ।

तें रामकृपेने झाले । हे ठेवावे चित्तीं । आता न सोडावा रघुपति ॥

वयोमानानें शरीर होतें क्षीण । वागणें आहे फार जपून ॥

देह आळशी न ठेवावा हे जरी खरें । तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे ॥

आता आपण झालो शरीराचे अधीन । हे वयोमानानें दृश्य भासत ।

तरी भाव ठेवा रामापायीं । ज्याला क्षीणता कधीं आली नाहीं ॥

चित्तीं राखावें समाधान । आनंदानें संसार करावा जाण ॥

समाधानाचें करावे जतन । ते नसावें कशावर अवलंबून ॥

लाभहानींत न गुंतवता मन । राखता येईल समाधान ॥

समाधानाला अडवणूक जाण । माझा मीच आपण ॥

देहाचे भोग ठेवावे देहाचे माथीं । समाधानांत राखावी वृत्ति ॥

सर्व कर्ता राम हा भरवसा ठेवावा ठाम ।

मग काळजीचें उरलें नाहीं काम । हे सर्व जुळतें म्हणतां राम राम ॥

तरी सर्वांनीं घ्यावे रामनाम । व्हावें परमात्म्याचे आपण । कृपा करील रघुवीर ॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.