श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० नोव्हेंबर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> १० नोव्हेंबर

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥


ज्याला म्हणावे मी 'माझे' । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥

स्वतःचा नाही भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥

तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥

सर्व सत्ता रामरायाचे हाती । तेथे मानवाची काय गति ? ॥

विचाराने दुःख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ॥

सर्व केले रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण ॥

अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥

परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी, कोणतेही काळी, असते हा भरंवसा ।

याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥

ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥

उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढे एक पाऊल टाकून ।

उपासनेत राहावे आपण । तेथे आहे निर्धास्तपण ।

उपासनापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥

उपासनेंत राहावे आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची काय वार्ता ॥

जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वतां ॥

एवढें आता ऐकावे माझे । राम उतरील सर्व ओझें ॥

स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥

देवाकडे करावी विनंति । देहदुःख अति फार । होई रामाचा विसर ।

आता द्या नामाचे अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥

परमात्मा दयाळू फार । आपलें हित करील हा ठेवावा निर्धार ॥

मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास । न सोडावा आता धीर ।

सदा घ्या भगवंताचे नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥

राम कृपाळू दीनांचा नाथ । तो सर्व कांही पाहात ॥

आपले प्रारब्धाने आलेले कर्म । ते त्यास न विसरतां करावे अर्पण ।

सुखाने घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥

हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥


मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन । हेंच दुःखाला खरे कारण ॥

स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दुःखाला कारण ॥

आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दुःख, चिंता, शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥

सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥

सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥

दुःखाचें मूळ कारण । जगत् सत्य मानलें आपण ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.