श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० जून

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१० जून

आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥


<poem>

'असे झाले असते तर बरे झाले असते' । हे म्हणणे नाही खरे ॥

जे होणे योग्य ते घडले । व ते राम‍इच्छेनेच घडले ॥

परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले ।

हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥

माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥

आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥

परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥

न पडावे अभिमानाला बळी । राम‍इच्छा जाणावी सगळी ॥

हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥

आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥

म्हणून, होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥

चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥

ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥

माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥

आपण होऊन रामाचे जाण । सदा राखावे समाधान ॥

मी-माझे करावे रामार्पण । तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण ॥

आस ठेवावी रामापायी । आनंदी समाधानी राही ॥

अंतरी समाधान । हेच आपले साधन जाण ॥

संसारात न पाहावे उणे पुरे । ठेवावे त्यात समाधान खरे ॥

जशी जशी ज्या वेळी परिस्थिति । तशी तशी असावी समाधान वृत्ति ॥

ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ॥

चिंता, अहंता, ममता, कोणी कारणावांचून । केले छळ, कपट अपमान ।

अथवा बोलिले शब्दबाण । त्यात राखावे समाधान ॥

समाधान देणे नाही दुसर्‍याचे हाती । ईश्वरकृपेनेच त्याची प्राप्ति ॥

जोवर संशयी झाले मन । तोवर न होई समाधान ॥

विषयास घातले खत जाण । तरी कसे पावावे समाधान ? ॥

जोवर दृश्याचे भान । तोवरी मनी न राहे समाधान ॥

समाधानाची स्थिति । उपाधीरहित असावी वृत्ति ॥

कोठे ठेवावे मन । जेणे मिळेल समाधान ? ॥

समाधान नव्हे देहाचा गुण । मनाने व्हावे भगवंताचे आपण ॥

पांडव झाले वनवासी । पण अखंड राहिले भगवंतापाशी ॥

पांडव भगवंताचे भक्त झाले । वनवास नाही चुकविता आले ।

त्यांनी केले भगवंताचे स्मरण । जेणे राखिले समाधान ॥

'आता झालो मी रामाचा' । हा विचार ठेवावा साचा ॥

ऐसे होऊन राही । समाधान तेथेच पाही ॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.