श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० जुलै

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१० जुलै

सद्‍गुरूस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ||


<poem> राम ठेवील जी स्थिति । त्यात समाधान राखे ज्याची वृत्ति । त्या नाव खरी विरक्ति ॥

रामा‍आड जें जें कांही । तेथून दूर ठेवी वृत्ति । या नांव विवेकाची प्राप्ति ॥

वृत्ति न होऊं द्यावी विषयीं फार । चित्तीं चिंतावा रघुवीर ॥

जेव्हां वृत्ति होते विषयाकार । तेथें न राहे सारासार विचार ॥

वृत्ति राही अभिमानाला धरून । तेथें न कधीं अनुसंधान ॥

जें जें पाहावे तें तें रामच होईजे । ऐसी ठेवावी वृत्ति । रघुनंदन आणावा चित्तीं ॥

काळोख अत्यंत मातला । घालवावयास उपाय दुजा न सुचला ।

होतां सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥

तैसें 'राम कर्ता' हा भाव ठेवता चित्तीं । उपाधीरहित बनते वृत्ति ॥

वृत्ति असावी शुद्ध, संतसज्जनांना प्रमाण । त्याने संतुष्ट होईल नारायण ॥

जग स्वार्थमूलक खरें । हे आपले वृत्तीवरून ओळखणें बरे ॥

वृत्ति अलग करावी सर्वांहून । आलेली ऊर्मि करावी सहन । सर्व कर्ता जाणून रघुनंदन ॥

निःसंशय करावी वृत्ति आपण । सद्‍गुरूस जावें शरण ।

संशयविरहित वृत्तिने घ्यावें नाम । जें सुखाचे आहे धाम ॥

शुद्ध ज्याचे अंतःकरण । शुद्ध ज्याचे आचरण ।

परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ति । त्याच्याहून दूर न राहे रघुपति ॥

सर्व कांही करावें आपण । पण वृत्तीनें त्यांत न गुंतावे आपण ॥


नामांत ठेवावें प्रेम । तेथें प्रकटेल पुरुषोत्तम ॥

देहाचें चलन ज्याचे सत्तेनें । त्या रघुपतीचें स्मरण असावे आनंदाने ॥

वासना नामापायीं जडली । धन्य धन्य सज्जनीं मानिली ॥

पाणी माती एक झाले । वेगळें नाही करतां आले ।

निवळी घालावी पाण्यांत । पाणी स्वच्छ होते जाण ॥

तैसा विषयांत राहून जगती । नामाची ठेवावी संगती ॥

विषयाचें विष शोषून घेई । ऐसी आहे नामाची प्रचीति ॥

शक्य तितकें राहावें नामांत । याहून दुसरे न आणावे मनांत ॥

परा पश्यंती वैखरी वाणी । याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणीं ॥

नामापरती उठेल वृत्ति । तेथें सावध असावें तुम्ही ॥

जो नामांत राहिला दंग । त्याने लुटला रामरंग ॥

रामनाम बोलावें वाचा । काळ न येऊं द्यावा काळजीचा ॥

नामाविण राम । जैसें पाकळ्याविण फूल जाण ॥

नाम ज्यानें घेतले सर्वकाळ । जिंकला त्यानें एक अंतराळ ॥

भगवंत ठेवील त्यांत हित मानावें । अखंड नामस्मरण घ्यावें ॥

नामांत स्वतःचा विसर । हेंच देईल रघुवीर ॥

भगवंताची प्राप्ति, संतांची संगती, नामाचे प्रेम, । हे भगवत्कृपेवांचून नाही साधत जाण ॥


सतत करावे नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.