श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० ऑगस्ट

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१० ऑगस्ट

अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत ।

हाच माझा परमार्थ ॥ 



<poem>


ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥

जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥

मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥

जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥

तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥

पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥

मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली ।

तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥

सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥

मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥

अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥

व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥

राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥

मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥

नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥

मला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥

मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥

तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥

तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥

उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥

माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥

दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥

शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥

अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत ।

नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥

मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥

आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥

सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश ।

हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥

सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥

सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥

जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥

नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥

हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥

विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥

अखंड घडो भगवद्‍भक्ति । आत्मज्ञानप्रतीति ।

ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥

मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥

सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.