श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० ऑक्टोबर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१० ऑक्टोबर

राम ठेवील त्यात समाधान ।

हे खर्‍या भक्ताचे लक्षण जाण ॥ 

<poem>

नसावे कशाचे ज्ञान । वाटावे सदा घ्यावे रामनाम ।

प्रपंची राखावे समाधान । हेंच भक्ताचे मुख्य लक्षण जाण ॥

डोळे व कान ह्यांनी होते बाह्य जगाचें ज्ञान । त्यांना लावावे नामाचे अनुसंधान ।।

राम आणावा चित्तीं । 'त्याचा प्रपंच करतो' ही राखावी स्मृति ।।

स्वार्थहीन व्हावे आपण । तें होईल करतां परमात्मस्मरण ।।

संधि साधून जो राहिला । तोच जगीं धन्य झाला ।।

नाटकांत नट काम करी जैसें । आपण वर्तत जावें तैसें ।।

राजा रंक होई जरी । तरी मी कोण हें जाणून राहे अंतरीं ।।

जग सज्जन-दुर्जन मिश्रित । त्यांतून शोधून काढावा अवचित ।।

जो लाभेल संगतीला । रामाचें प्रेम दुणावेल त्याला ।।

द्वेष, मत्सर, अहंकारवृत्ति, । यांची न धरावी संगति ।।

मानापमान करावे सहन । साक्ष ठेवून रामचरण ।।

सर्व कांही करावें । पण खरें प्रेम साधनावर असावें ।।

अभिमानरहित राहावें । हेंच शिष्याचे लक्षण जाणावें ।।

राम व्हावा माझा । रात्रंदिवस काळजी ठेवीत जा ।।

लक्ष ठेवावें संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ।।


गुणांत उत्तम गुण । आपले कळावे अवगुण ।

अवगुण कळले ज्याला । तो सुधारण्याच्या मार्गाला लागला ।।

प्रथम स्वाधीन करीं आपले मना । सोडावा अहंभाव, विषयवासना । काही पाहिजे हें न वाटावे मना ।।

व्यवहारांत असावे दक्ष । कधीं न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष ।।

दुर्जनाची संगति । तीच रामाला दूर करिती ।।

म्हणून मनासी धरावा सत्संग । रामाविण दुजा नसावा रंग ।

उदास व्हावें एकाच वेळीं । केव्हा भेटेल वनमाळी ।।

तळमळीचे मुख्य लक्षण । दुसरे विषयाची न व्हावी आठवण ।।

पतिव्रतेला पति जाण । तैसें साधकाला साधन जाण ।।

मोहाला बळीं पडणें । याहून नाहीं दुजें लाजिरवाणें ।।

विघ्न रामसेवेंत भारी । तरी आपण सांभाळावें हातीं घेऊन शिरीं ।।

रामाची सेवा हा जाणावा संसार । मग सुखाने करावा व्यवहार ।।

देवास करावा नैवेद्य अर्पण । प्रसाद घ्यावा त्याचा आपण ।।

चित्त ठेवावें रामापाशीं । ध्यास असावा त्याचा अहर्निशीं ।।

गुरूकडून घेतलेले नाम पावन करील जगास । हा ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ।।

देहानें नाहीं करता आले । मन रामापायीं गुंतवले । रामानें त्याचें कल्याण केलें ।।

राम ठेवील त्यांत समाधान । हेंच खरे भक्ताचें लक्षण जाण ।।

भगवंतावांचून मनीं न येऊ द्यावें काही । भगवत्स्वरूप तो सर्व ठिकाणीं पाहीं ।।

आपण व्हावें रामाचें । उदाहरण घालून द्यावें साचें ।।



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.