श्यामची आई/रात्र विसावी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

सात्त्विक प्रेमाची भूक

"काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा?" श्यामने विचारले. "थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते." गोविंदा म्हाणाला. "इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले." श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?" भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात." गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा." राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो." ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता." राजा म्हणाला.

सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरु झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली.

मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. एक-दोन यत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते.

दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती; म्हणून दापोलीस कअँप दापोली असेही म्हणतात. या कअँपनंतर 'काप' असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असे म्हणतात. तसे पाहिले, तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजीमहाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून तो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे "केसरी"चे संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणितविशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.

दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा लागू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या-झुंबरांसारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.

दापोलीहून माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की, मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा.

एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत हेते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते, की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात? हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू! कोणा झाडाचे पान! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार! असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यांत, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही.

त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, "मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!" माझीही जणू तशीच स्थिती होती. दर आठा दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की, प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.

मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यांतून अश्रू येत होते. या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहिर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल, अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.

शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!

मी अंगणात दिसताच "अण्णा आला, अण्णा आला," असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, "उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली." मी म्हणालो, "माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते." “मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे." आई म्हणाली. “आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन." असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. “हे कढत पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावत्ये. मग वर कढत पाणी घे." असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहात होतो. मला त्या वेळेस किती आनंद होत होता! त्या वेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. "अण्णा, गोष्ट सांग, नाही तर एक नवीन श्लोक शिकव." असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले. “का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी?" त्यांनी मला विचारले. त्या वेळेस मी संध्या करीत असे, संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. "नाही केली, करतो." मी म्हटले. “तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची." ते रागाने बोलले. आई म्हणाली, "आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर." मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यांतील पाण्याची देवाला शतर्ध्ये सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, "तिकडे संध्या वगैरे करतोस, की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा झाला आहे! मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले, की डोके करून घे, म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लख्या न्हाव्याला, बोलावून आण व डोके तासटून घे. नाही तर येथे राहू नकोस. निघून जा." मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. "झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी." वडील म्हणाले. “पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील." आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.

आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रूमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.

आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली; परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती.

कृष्ण यशोदेचा बाळ। सुकुमार लडिवाळ
कृष्ण यशोदेचा तान्हा। त्यासी पाजी प्रेमपान्हा
कृष्ण बाळ मेघश्याम। यशोदेचे प्राशी प्रेम

मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजीत होती, मला प्रेमपान्हा पाजीत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. "आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट. राहू दे पोतेरे." मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.

पहाटेची वेळ
दूर कोंबडा आरवे
परी बाळा झोपी जावे
लहान तू
अंगाई
पहाटेची वेळ
वाजू लागती रहाट
बाळा तू रे पाळण्यात
झोप घेई
अंगाई
पहाटेची वेळ
का का करितो कावळा
झोपे परि माझ्या बाळा
उठू नको
अंगाई
पहाटेची वेळ
कामाची आहे घाई
बाळा, तू झोप घेई
आई म्हणे
अंगाई

मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, "आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे." आई म्हणाली, "असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यानी आजपर्यंत तुम्हांला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हांला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वतः फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत, म्हणून इतकेही तू करू नयेस का?" आई मला समजावीत होती.

“केसांत कसला आहे, ग, धर्म?" मी म्हटले. आई म्हणाली, "धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे, यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म." मित्रांनो! माझ्या आईला त्या वेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल; परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, ही गोष्ट आपणां आश्रमवासीयांस सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे, सर्वांत धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जिवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो, ते मी सुंदर दिसावे, म्हणून! खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे.

त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो; परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई. परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते.

आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. "काय, श्याम! लईशी डोई वाडविलीस?" असे त्याने विचारले.

मी त्याला म्हटले, "गोविंदा! तुझा हात हल्का आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात." माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, "हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो."

वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो! मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो, असे आल्यावर त्यांनी पाहिले असते, तर त्यांची केवढी निराशा झाली असती! त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते! हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत! दोन शब्दांनीच ती मरून जावीत, असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे, म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती, त्यांतील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दूर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेविली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली.


वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदुळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यत गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घावावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.

वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवावयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. “श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ." वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.

आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वांत लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, "आई, जाऊ?" “कुठे रे बाबुल्या?" मी म्हटले. “आईला आहे माहीत. जाऊ का?" त्याने विचारले. आई म्हणाली, "जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत बसू नको." हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याच नावाचे त्याला हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, "आई! करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला?" आई म्हणाली, "नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!" मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, "श्याम! तू आज गेला असतास, तर त्यांना किती वाईट वाटले असते! त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला, तर म्हणतात, "कोणी आठवण काढली? गजूने, की श्यामने?" त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे-तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख!" असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, "श्याम! ते नेहमी म्हणतात, की "असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ." तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या." आईचे जेवण झाले. मी ही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते, म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. तीत त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुऊन तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाणीखाली विस्तव हवा का, तिने पाहिले. याप्रमाणे आईची निरवानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फर्यामर्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला.

आईने, माझे धोतर फाटले होते, ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यालो.

पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात, म्हणून शेजारच्या जानकीवयनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. "आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो." असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. "श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर." ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकट्या भावांस कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.

आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, "का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?" मी त्याला म्हटले, "माझे आईबाप आहेत." “ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?" “नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे!" विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलदीने चालू लागलो.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.