श्यामची आई/रात्र पंचविसावी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय <poem> संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. "आई! मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का?" आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; मी तुला आंघोळ घालीन, जा." "आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील. मला मारायला येतील; काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ?" असे मी विचारले. "लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये." असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. "नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली. "अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली. "अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, "मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणर नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुद्धीः' हे मला माहीत आहे." असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, "त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला." "ए गोयलेवाली! अग, इकडे ये." मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, "म्हाताऱ्ये, आजारी का गं आहेस?" "व्हय, माय. ताप लई येतो. काय करतांव, पोटाला हवं ना!" असे ती म्हणाली. "दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?" आईने विचारले. "द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!" दीनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. "वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली. "चल, श्याम, तू आंघोळ कर." आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. "घास घाला हो, दादा." आई! तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत-ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीत होते-ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, "लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राम्हण जेवतात, तर येथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून!" असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. "नको, रे दादा. नको रे मारु, जात्ये, रे दादा." असे म्हणून ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, "गरिबाला कोणी नाही," तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळ्यात हार घालतील. आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का, ग, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई! हे कसे, ग? हे कसले सोवळे? हा का धर्म! देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?" आई म्हणाली, "बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड-खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, "तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत." श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले, तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही, म्हणून ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत." "खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक मनाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?" मी विचारले. "श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!" आई खिन्न होऊन म्हणाली. "आई! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?" मी विचारले. आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राम्हणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल." आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी "श्याम श्याम" म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार. <poem> (पद चाल-मेरे मौलाबुला) माझ्या भारती या देव मुळी नुरला सगळा अंधार रे भारतांतरि भरला? माझ्या.. नाहि दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीळ न, तिथे प्रभु कसा वसे देव मंदिरी ना देव अंतरी ना देव तो अजि मेला. माझ्या.. <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.