श्यामची आई/रात्र दहावी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

पर्णकुटी

"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.

'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.

'ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सा-यांनी ऐकावे. मी सुध्दा आले असते; पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर.' भाऊची आई म्हणाली.

'शेजारची भिमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ?' वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती.

'चल, तेथे मग 'मला झोप येते, चल घरी' अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र!' असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले.

आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत.

वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती.

'शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे. ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही-दूध दिले, परंतु स्वत: चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावाबहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले! घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळयांत पाणी आणून कधी कधी सांगत असे.

तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपति-उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळयांतून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मो-या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, ज्या घरात एके काळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले; त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाटयाने जात होतो! कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्या वेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता; परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात.

नवीन घरी आता सवय झाली; परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई. कारण स्वत:ची परिस्थिती ती ओळखून होती.

आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नव-यासह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते. आई ओटीवर गेली व म्हणाली 'माझ्याच्याने येथे अत:पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते.'

वडील म्हणाले, 'अगं, आपण आपलेच भात खातो ना? फक्त येथे राहातो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत?'

आई एकदम संतापून म्हणाली, 'तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी.'

माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, 'आम्हाला स्वाभिमानच नाही! आम्ही माणसेच नाही जणू! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल!'

वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही.'

'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले.

'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठया कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातीतील पाटल्या घ्या, या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळयात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला?' असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या.

वडील स्तंभितच झाले. 'तुला इतके दु:ख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लौकरच लहानसे घर बांधतो.' असे वडिलांनी आश्वासन दिले.

माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे, स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय.

आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या. कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई; परंतु पुन्हा ती म्हणे, 'काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी 'ऊठ' म्हणणार नाही.'

झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेविले. मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, 'तात्पुरते बांधले आहे. पुढे मोठे बांधू.'

परंतु आई आम्हास म्हणे, 'यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.'

त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, 'श्याम! नवे घर तुला आवडले का?'

मी म्हटले, 'हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल.'

माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले? जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर! नाही, आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, 'होय, मथुरी गरीब आहे; परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊ या. मनाने श्रीमंत होऊ या.'

'होय, आपण मनाने श्रीमंत होऊ. खरंच होऊ.' मी म्हटले.

इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, 'आई! केवढा ग तारा होता!'

आई गंभीरच होती. ती म्हणाली, 'श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लौकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे, मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तरा?'

'नाही हो आई! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शितकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येती. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस.' मी म्हटले.

माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, 'श्याम! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस? खरेच आपले हे साधे, सुंदर घर ता-यांनाही आवडेल, सा-यांना आवडेल!'

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.