श्यामची आई/रात्र छत्तिसावी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही! <poem> "आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?" भिकाने विचारले. "आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले." गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. "अलिकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे." राम म्हणाला. "सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न"

असा तुकारामाचा चरण आहे.

"श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?" रामने विचारले. "ते मघा तर वरती होते." भिका म्हणाला. "ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे, म्हणतात." गोविंदा म्हणाला. "काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव?" भिकाने विचारले. "अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो." राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला. "काय रे करता गोविंदा?" श्यामने विचारले. "काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?" त्याने विचारले. "तिला गावाला पाठविली त्यांनी." श्याम म्हणाला. "बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत." भिका म्हणाला. "कोणाला माहीत? आपण तरी काय करणार?" श्याम म्हणाला. "भिका! आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते." भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. "जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते." भिका म्हणाला. "का? आजचे पेळू चांगले नाही का झाले?" श्यामने विचारले. "त्यांत पुष्कळ कचरा राहिला आहे." गोविंदा म्हणाला. "माझे तर सूत तुटत नव्हते." श्याम म्हणाला. "तुमचे पेळू पहिले असतील." भिका म्हणाला. "नाही, रे; आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते." "मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते." गोविंदा म्हणाला. "श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही." राम म्हणाला. "झोप येत नाही, तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो." श्याम म्हणाला. "झोप न यायला काय झाले? आम्हांला बरी झोप येते?" राम म्हणाला. "तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते." श्याम म्हणाला. "तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास." राम म्हणाला. "परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?" श्यामने विचारले. "तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही, त्यांनी." राम म्हणाला. "लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे." गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी! अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या-मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्या वेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते. परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राम्हणवस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "राधाताई! तुमच्याकडे काही काम असले, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल." राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय? परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले, की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाकी. "श्याम असता येथे तर सारे दळून टाकता." असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो, हे आठवून ती रडू लागे. दळता-दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत, त्यांतून आई तेल, मीठ आणी व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना! एक काळ असा होता, की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्या वेळेस लागत असत; परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची? आई त्या पेन्शनरीणबाईला म्हणाली, "तुमचे धुणेबिणे सुद्धा मी धुऊन दिले, तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा." त्या पेन्शनरीणबाईची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, "आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का?" आई म्हणाली, "हो. आनंदाने करीन. मला हो काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे." आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे, असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून "तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!" असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू घालू लागल्यापासून त्या मुलाला बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला. राधाताईची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले. "दोन कशाला? एक पुरे, हो!" आई म्हणाली. "घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो." आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. "देवा! माझी लाज सारी तुला!" असे ती म्हणाली. दोन रुपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोड्या करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली, तर पारिंग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरिवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, "तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा."


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.