शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्याचा असूड शतकाचा मुजरा/शेतकरी राजांचे दुदैव

विकिस्रोत कडून



 शेतकरी राजांचे दुर्दैव


 तिहासात शेतकऱ्यांचे असे राज्य आढळत नाही. शेतकरी म्हणजे रयत म्हणजे प्रजा.त्यांनी राबून कसून मेहनत करावी, पिके पिकवावी आणि स्वत:ला राजे म्हणविणाऱ्यांनी, त्यांनी पिकवलेली पिके कधी गोडी गुलाबीने कधी निघृणपणे काढून न्यावीत. शेतकऱ्यांकडून पिके काढून नेणाऱ्या राजांनी एका एका प्रदेशावर सत्ता बसवावी आणि त्या प्रदेशाच्या हद्दीपलीकडील दुसऱ्या राजाशी लुटीच्या हक्काकरिता मारामाऱ्या कराव्यात हे इतिहासाचे स्वरूप राहिले आहे.

 पहिला राजा बळी

 शेतकऱ्यांचा राजा असा शोधायला इतिहासकाल ओलांडून पुराणकाळात जावे लागते. देशभरचा शेतकरी बळिराजाला आपले दैवत मानतो. पुराणांतरी आणि वेगवेगळ्या ग्रंथांत बळिराजाविषयी दिलेला मजकूर सगळा अकटोविकटच आहे. याचक म्हणून आलेल्या वामनाने कपटाने तीन पावले जमीन मागितली काय आणि मग एकाएका पावलात पृथ्वी आणि आकाश व्यापले काय आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर जणू पृथ्वीच्या बाहेर राहिलेल्या बळीने डोके पुढे केले काय. खरेखुरे काय घडले याचा अर्थ या भाकडकथेवरून तरी लागत नाही. कदाचित ही कथा एक रूपक असेल.

 जोतीबा फुल्यांनी म्हटल्याप्रमाणे "भटशाहीने शेतकऱ्यांवर केलेल्या आक्रमणाची" ती सुरुवात असेल. निश्चितपणे काहीही म्हणणे कठीण आहे. पण जे ग्रंथकारांना जमले नाही ते गावोगावच्या घरी घरांतील मायमाऊल्यांनी करून दाखविले. बळिराजाला जमिनीत गाडून टाकला, समूळ नष्ट केला तरीही शेतकऱ्यांच्या बाया "इडा पिडा बळीचे टळो राज्य येवो" या आशेची ज्योत हर प्रसंगी जिवंत ठेवत असतात. हजारो-हजार वर्ष आपल्या एका राजाचे इतक्या मोठ्या समाजाने इतक्या कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवल्याचे क्वचितच दुसरे उदाहरण असेल.

 बळिराजाची राजधानी पश्चिम किनाऱ्याला होती व त्याचे राज्य महाराष्ट्रापर्यंत पसरले होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. शेतकऱ्यांचा पहिला राजा बळी.तो

बळी पुन्हा एकदा वर निघणार आहे व त्या बळीचे राज्य पुन्हा एकदा येणार आहे, शेतकऱ्यांची इडा पिडा टळणार आहे आणि सगळीकडे आनंद मंगल होणार आहे ही आशा शेतकरी अजूनही मनांत बाळगून आहेत. पण असा बळिराजा कोण? कुठला? त्याने केले काय? त्याला संपविण्याकरिता प्रत्यक्ष विष्णूला अवतार घेऊन का यावे लागेल याचा थांगपत्ता लागत नाही. प्रल्हादाच्या प्रार्थनेला ओ देऊन विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. त्याच प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळी, प्रल्हादाच्या नातवाचा वध करण्याकरिता स्वत: विष्णूला पुन्हा एकदा घाईघाईने अवतार घ्यावा लागला हे मोठे गमतीशीर प्रमेय आहे. कागदोपत्री याचा खुलासा होण्याची काहीही शक्यता नाही. बळिराजा संपवण्यात आला एवढेच नाही, त्याची सगळी कहाणीच दडपून टाकण्यात आली.

 दुसरा शेतकरी राजा

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुसरे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांविषयीचा अभिमान हा प्रत्येक मराठी शेतकऱ्यांच्या जणू रक्तातच असतो. शिवाजी कोण होता, कसा होता, काय होता याविषयी कोणाला काही वाचून ठाऊक आहे असे नाही. आधी शेतकरी समाजात वाचणारे कमीच आणि ज्यांना वाचता येते त्यांनी विश्वासाने वाचतो असे काही साहित्यही नाही. गावागावात फडांच्या वेळी, उरूस उत्सवांच्या वेळी गावगन्ना शाहिरांनी रचलेले पोवाडे हाच काय तो त्यांच्या माहितीचा आधार. दरबारातील भाटांच्या काव्याप्रमाणे शाहिरांच्या कवनांची रचनाही समोर बसलेल्या श्रोत्यांच्या औदार्याच्या अपेक्षेने होणारी. सुरवातीच्या शाहिरांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांत प्रत्यक्षात लढायात भाग घेतलेले सरदार, दरकदार, शिपाई गडी उपस्थित असताना शाहिरांनी त्यांच्या अंगच्या शौर्य, दिलदारपणा इत्यादी गोष्टींचे अतिशयोक्त वर्णन करावे हे साहजिकच आहे. त्याबरोबर शत्रूला सर्व दुर्गुणांचा मूर्तिमंत पुतळा बनवावे आणि त्याला रौद्र अक्राळ विक्राळ मुखवटा द्यावा हेही तितकेच क्रमप्राप्त.समोर बसलेले श्रोते प्रत्यक्ष प्रसंगाचे साक्षीदार असले म्हणजे सत्यापासून अपलाप करण्याबाबत शाहिरांवर आपोआपच मर्यादा पडते. जसजसा काळ जाई आणि काहणी सांगोवांगीच ऐकलेले श्रोते पुढे येत, तसतसे इतिहासाचे इतिहास पण जाऊन मनोरंजक कथांचं स्वरूप यावे हे सहज समजण्यासारखे आहे.

 शेतकऱ्याच्या या दुसऱ्या राजाला कोणी वामन संपवू शकला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्य स्थापले. जिवावर आणि स्वराज्यावर आलेल्या काळप्रसंगांना विलक्षण धैर्याने तोंड दिले आणि त्यांच्यार मात केली. दिल्लीश्वराच्या नाकावर टिच्चून राज्य संस्थेची द्वाही फिरविण्याकरिता राज्याभिषेकाने स्वराज्याचे

स्वतंत्र तख्त स्थापन केले आणि त्यांचा अकस्मात मृत्यू ओढवला तेव्हा मराठी फौजफाटा घेऊन दक्षिणेत उतरून यावे लागले.

 इतिहासाचा अपर्थ

 बळिराजापेक्षा शिवाजी राजा जिवंतपणी सुदैवी ठरला.पण मृत्यूनंतर शिवाजीराजाचीही अवस्था बळिराजाप्रमाणेच होऊ लागली आहे. स्वराज्यसंस्थापनेची कल्पना नांगरासह तलवार हाती घेणाऱ्या मावळ्यांच्या आणि सर्वसामान्य रयतेच्या सहकार्याने मूर्त झाली. भारतातील त्या काळात घडणाऱ्या इतर इतिहासाकडे पाहिले म्हणजे भयाण काळोख्या रात्री वादळी हवेत एखादा लहानसा दिवा तेवत असावा असे या स्वराज्याचे स्वरूप दिसते.ही पणती त्या परिस्थतीत तेवत राहणे दुरापास्तच नव्हे अशक्यच होते. संभाजी एक अविवेकि म्हणून सोडून द्या, पण राजारामासारख्या संयत पुरुषाससुद्धा स्वराज्य आणि शेतकरी यांच्यामध्ये वतनदारांचे मध्यस्थ घ्यावे लागले. त्यानंतर मराठेशाहीचे स्वराज्य आणि देशभरातील इतर पाळेगार आणि पुंड यांत जवळ जवळ काहीच फरक राहिला नाही. बंगलमध्ये मोगलांच्या इतक्या स्वाऱ्या झाल्या पण बंगालातील बायकापोरांना दहशत बसली ती भोसल्यांच्या लुटीची! पानिपतच्या लढाईच्या वेळी आसपासच्या शेतकऱ्यांना सदाशिवराव भाऊच्या सैन्याबद्दल आपुलकि वाटण्याचे काहीच कारण नव्हते. खुशवंतसिंग लिहितात, "पंजाबातील लोकांना मराठ्यांकडून लूट होणे अधिक भयानक वाटे. कारण मराठे रयतेच्या अंगावरील कापडचोपडसुद्धा काढून नेत." स्वराज्याचा शिवाजी महाराजांनी लावलेला दिवा त्यांच्याबरोबरच विझला. शिवाजीचे वारसदार आणि पेशवे यांच्यात स्वराज्याचे तेज नावापुरतेसुद्धा शिल्लक नव्हते.

 मग शिल्लक राहिल्या त्या फक्त शाहिरांच्या अतिशयोक्त आणि अघळपघळ कहाण्या. शिवाजीला मिळालेली मान्यता वापरून घेण्याचा प्रयत्न करणारे हरघडी निघाले. कोणी छत्रपतीला गोब्राह्मण प्रतिपालक असे बळचे बनविले. कोणी त्याचा उपयोग जातीयवाद वाढविण्याकरिता केला आणि हिंदुत्ववाद्यांनी तर शिवाजीवर जवळ जवळ मक्तेदारीचा कब्जा मिळविला.त्यांनी इतिहासाची मांडणी केली ती अगदी साधी आणि सोपी, पण तितकिच खोटी आणि विखारी.त्यांनी इतिहासाचे कुभांड रचले ते थोडक्यात असे.

 शिवाजीच्या काळी सर्व महाराष्ट्र मोगलांनी ग्रासून टाकला होता. ते गावेच्या गावे लुटीत असत, देवळे पाडीत, देवांच्या मूर्ती फोडीत माणसांची कत्तल करीत, त्यांचे हालहाल करीत, स्त्रिया-मुलांचा छळ करीत, त्यांना गुलाम बनवीत किंवा जनानखान्यात दाखल करीत. हिंदूंना पूज्य असलेल्या गोमातेची भरदिवसा कत्तल होत असे. अशा

परिस्थितीत प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार अशा तेजस्वी शिवाजीचा अवतार झाला. आणि त्याने युक्तिप्रयुक्तद्दने स्वत: भवानीदेवीच्या आशीर्वादाने हिदूंचे राज्य स्थापन केले."बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला", "उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया". स्वराज्याची येवढी मर्यादित मांडणी हिदुत्वनिष्ठांनी केली. देशात धर्माधर्माचे वाद माजवण्याच्या त्यांच्या राजकारणास पूरक अशी शिवाजीची मूर्ती तयार केली आणि मग दंग्यामध्ये सुरे घेऊन निघणारे गुंड आणि हरिजनांची घरे जाळणारे दादा 'शिवाजी महाराजकी जय' च्या घोषणा करीत आपली कृष्णकृत्ये उरकू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने लष्करभरतीच्या जाहिरातीवरसुद्धा शिवाजी महाराजांचे चित्र छापले होते, मग राजकीय स्वार्थासाठी धर्मही वेठीला धरणारे शिवाजीला काय मोकळा सोडणार आहेत?

 संस्थापक महात्मा निघून गेल्यानंतर उरलेल्या मठातील शिष्यांनी बाबांच्या शिकवणुकीचे तिरपागडे करून टाकावे तसे शिवाजीचे बीभत्सीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यात दुःखाची गोष्ट अशी की शिवाजीचे खरे मोठेपण झाकले गेले. त्या काळाच्या इतर राजेरजवाड्यांप्रमाणे एक, पण धर्माने हिंदू असलेला अशी त्याची प्रतिमा तयार झाली. परदेशात तर सोडा, पण देशाच्या इतर राज्यांतही शिवाजीविषयी यामुळे विलक्षण गैरसमज कानाकोपऱ्यांत आणि खोलवरपर्यंत पसरलेली आहेत. शिवाजी म्हणजे संकुचित, शिवाजी म्हणजे प्रादेशिक, शिवाजी म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रतीक आणि निव्वळ लुटारू व धोकेबाज अशी कल्पना महाराष्ट्राबाहेर सार्वत्रिक आढळते. जाती, धर्म, प्रदेश यांच्या संकुचित मर्यादांना सहज उल्लंघून जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबी अशी अपर्कीर्ती यावी ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी याला जातीयवाद्यांच्या वधर्ममार्तंडांच्या कैदेतून सोडविणे आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून इतिहासात त्याचा पुन्हा एकदा राज्याभिषेक होणे आवश्यक आहे.

 शिवाजीसंबंधी महाराष्ट्रात तरी खूप लिहिले गेले, पण त्याचे निर्णायक जीवनचरित्र आजही उपलब्ध नाही. नजीकच्या भविष्यकाळात तयार होण्याची काही शक्यता दिसतही नाही. शिवाजीविषयी अज्ञान जितके सार्वत्रिक, तितका त्याच्या जयंत्यांचा कार्यक्रम अधिकाधिक विपरीत. कर्ण्याच्या मदतीने वाटेल त्या गाण्यांची किंवा पोवांड्यांची उधळण केली म्हणजे शिवाजीचा उत्सव साजरा झाला अशी समजूत सार्वत्रिक होत आहे. शिवजयंतीउत्सवाला गणपतीउत्सवाचे स्वरूप येऊ नये आणि कर्ण्याच्या गदारोळात खरा शिवाजी हरवून जाऊ नये म्हणून या पुस्तिकेचा प्रपंच.