शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती/प्रास्ताविक

विकिस्रोत कडून

 प्रकरण :१
 प्रास्ताविक


 आजपर्यंत शेतकरी संघटनेचा विचार मांडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, असे वेगवेगळे कार्यक्रम झाले. पुढेही होत राहतील; परंतु हे सर्व मर्यादित वेळांचे कार्यक्रम आहेत. जाहीर सभांतून विचार मांडायला आणि ऐकायला एक किंवा दीड तास मिळतो. इतक्या थोड्या वेळात फार खोलात जाऊन विचार मांडता येत नाही. सभेस हजर राहणारा सर्वसामान्य शेतकरी असतो त्याला खोलात जाऊन तात्त्विक विचार करण्याची वा समजून घेण्याची कुवत या फुरसत नसते आणि साधारणपणे काय चाललेले आहे हे जाणून घ्यावे या औत्सुक्याने तो सभेस आलेला असतो; परंतु ज्यांना गावोगावी संघटनेच्या विचाराच्या प्रसाराचे काम करावयाचे आहे त्यांना इतका जुजबी अभ्यास पुरेसा नाही. खेड्यात कुणी वेडेवाकडे प्रश्न विचारले, डिवचून टोचून प्रश्न विचारले तरीसुद्धा त्यांची योग्य उत्तरे देता आली पाहिजेत. त्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास व्हावा म्हणून मेळावे आणि प्रशिक्षण-शिबिरांचे कार्यक्रम घेतले जातात. पण तेथेही वेळ अपुराच वाटतो. मुळातच संघटनेच्या विचारांचा अभ्यास नसल्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न आणि शंका यामुळे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यादृष्टीने हा वेळही अपुरा पडतो. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणातील ही अडचण दूर करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकाच्या अभ्यासामुळे एक दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरातून कार्यकर्ते तयार होणे सुलभ होईल. काही ठिकाणी तर अशा शिबिरांचीही आवश्यकता उरणार नाही. प्रशिक्षण शिबिरास येऊ न शकणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना संघटनेचा विचार आत्मसात करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल.
 आपला विषय तसा कठीण विषय आहे. महाविद्यालयांत, विद्यापीठांत हा विषय अभ्यासाला जातो. त्या मंडळींनासुद्धा हा विषय समजायला कठीण जातो. हा कठीण विषय लक्ष देऊन अभ्यासला जावा हा या पुस्तकाचा हेतू आहे. महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक यांना ज्या एका गोष्टीची कल्पना नाही ती आपल्याला आहे त्यामुळे त्यांना हा विषय जितका कठीण वाटतो तितका आपल्याला वाटणारा नाही. पुण्यातील एक सुप्रसिद्ध प्राध्यापक एका कार्यक्रमाला होते. त्यांनी विचारले, 'महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जो विचार समजणे कठीण जाईल तो विचार खेड्यापाड्यातील अशिक्षित शेतकऱ्यांना तुम्ही कसा समजावून देता?' शेतकऱ्यांना हा विषय समजायला कठीण नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून एकदा तरी 'उलट्या पट्टी'चा अनुभव येतो. उलटी पट्टी म्हणजे दलालामार्फत भाजीपाल्यासारखा शेतीमाल बाजारात पाठविल्यावर त्याच्या किमतीची जी पट्टी शिल्लक न राहता शेतकऱ्यांच्याच अंगावर काही देणे राहते. हा अनुभव ज्याला एकदा आलेला आहे त्याला शेतमालाच्या किमतीचा प्रश्न समजावून देणं आणि त्यांनी तो समजावून घेणं कठीण राहत नाही. ज्याला आपली परिस्थिती दिवसेंदिवस ओढागस्तीची होत चाललेली आहे हे अनुभवाने माहीत आहे. त्याला हा विषय समजायला कठीण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जो विषय मांडणे जड वाटते तो सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार जलद गतीने समजावून घेतला आहे. आत्मसात केला आहे. इतका की त्यानंतर दोन दोन लाखांच्या संख्येने शेतकरी चळवळीत समील झाले, तुरुंगात जायला तयार झाले, लाठ्या खायला तयार झाले. असा या विचाराचा प्रभाव आहे.
 या विचारांचा प्रसार करताना कार्यकर्त्यांनी काही गोष्टी पाळायला हव्यात. त्यासाठी कार्यकर्त्यांना काही सूचना:
 इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन प्रथमच उभे राहत आहे असे ठिकठिकाणी लिहिले / बोलले जात असले, तरी कार्यकर्त्यांनी या अगोदर झालेल्या शेतकरी आंदोलनाविषयी, चळवळींविषयी उपहासाने बोलू नये.
 पूर्वी लहान लहान शेतकरी आंदोलने झाली, त्यामुळे शेतकऱ्यांत हळूहळू जागृती होऊ लागली. त्या प्रत्येक आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे डोळे थोडे थोडे उघडले; परंतु त्यांतील अपयशांमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली. निराशा-जागृती-निराशा या फेऱ्यात सापडलेला शेतकरी त्याच्या पूर्वानुभवामुळेच आपण संघटित करू शकलो, त्याचे आंदोलन उभे करू शकलो.
 पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात जुन्यातलं जुनं आंदोलन म्हणजे तंट्या भिल्लाचं म्हणावं लागेल. त्या दृष्टीने तंट्या भिल्ल हा शेतकरी आंदोलनांचा मूळ प्रवर्तक म्हणावा लागेल. त्या काळी कुळांवरील अन्याय फार असह्य झाले होते. सावकारी पाश भयानक झाले होते. रयतेला काय करावं सुचेनासं झालं होतं. त्यावेळी, आपल्यातला एखादा भडक माथ्याचा तरुण ज्याप्रमाणे 'आपल्याला तुमचं हे काही पटत नाही, मी मला हवं तसं करतो' म्हणून उठतो त्याचप्रमाणे तंट्या भिल्लानं सावकार आणि व्यापारी यांच्या घरांवर दरोडे घालायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा प्रश्न अशा तऱ्हेने मांडणारा हा दरोडेखोर जेव्हा हैदराबाद राज्यात पकडला गेला तेव्हा त्याला इतर दरोडेखोरांप्रमाणे फाशी दिले नाही. एका खड्ड्यात चुन्याची कळी घालून त्यात तंट्याला ठेवून वरून पाणी ओतले. कारण राज्यकर्त्यांनी ओळखले होते की हा साधासुधा दरोडेखोर नसून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याला प्रश्न मांडतो आहे.
 १८५७ च्या स्वातंत्र्य-समरानंतर चार पाच वर्षांत शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे आंदोलन इथे महाराष्ट्रातच झाले. इंग्रज यायच्या आधी खेडेगावातील कर्ज देणारा सावकार महत्त्वाची आसामी समजली जात असे. बारा बलुतेदारांइतकीच त्याची प्रतिष्ठा होती. इंग्रजांनी रोख साऱ्याची पद्धत सुरू केली. शेतकऱ्यांवर रोख खर्चाची सक्ती पहिल्यांदाच झाली. परिणामतः मोठमोठे शेतकरीही सावकारांकडे जमिनी गहाण ठेवून बसले. कर्ज फेडता येत नाही म्हटल्यावर जमिनीचे लिलाव होऊ लागले.
 शेतकऱ्यांनी उठाव केला. सुरुवात पुणे जिल्ह्याच्या सासवड तालुक्यात झाली. इतर तालुक्यांत चळवळ पसरली. अहमदनगर जिल्ह्यात गेली. शेतकरी सावकारांच्या घरांना घेराव घालायचे. मारहाण नाही, रक्तपात नाही. फक्त सावकाराचे कागदपत्र जमा करायचे आणि जाळून टाकायचे. सरकार अर्थात सावकारांच्या मदतीस धावले. लक्षात ठेवा १८६१ म्हणजे जवळ जवळ सव्वाशे वर्षांपूर्वी तीन हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.
 सावकारांविरुद्ध रोष निर्माण झाला. तसाच जमीनदारांविरुद्ध झाला. अनेक चळवळी झाल्या. मुळशी धरणासारखे शासनाविरुद्धचेही आंदोलन झाले. शेतकऱ्यांच्या दुःखाचे खरे मूळ दीडदमडीचा सावकार, जमीदारांत नाही. वाघाने शिकार मारल्यानंतर त्यावर हात मारणाऱ्या खोकडांपलीकडे त्यांना काही महत्त्व नाही. पण आजवर शेतकरी आंदोलनांना आर्थिक विचार, ऐतिहासिक तत्त्वज्ञान नसल्यामुळे त्यांची दिशा चुकली. कुत्र्याला कोणी दगड फेकून मारला की ते धावत जाऊन चेवाचेवाने दगडालाच चावते, तसे या शेतकरी आंदोलनाचे झाले. जेव्हा जेव्हा ग्रामीण भागात उद्रेक उभे राहू लागले तेव्हा तेव्हा ते ग्रामीण भागातीलच एखाद्या घटकाविरूद्ध- सावकार, जमीनदार, एखादी जात, एखादी पात, एखादा धर्म याजविरुद्ध वळवून देण्यात आले. प्रचंड ताकदीच्या पहिलवानास लहान पोराने जणू चलाखीने फसविले. वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले यांनीही शेतकऱ्यांच्या दारिद्र्यावर विचार मांडले. आपण तेच विचार नव्या भाषेत मांडीत आहोत. स्वातंत्र्याआधी आणि नंतर कुळकायदे झाले. त्याची चळवळ, स्वातंत्र्यानंतरची सहकारी चळवळ या सर्व चळवळींनी आपलं एक एक पाऊल पुढं टाकलं. लहान मूल जसं सुरुवातीला पडत पडत चालायला शिकतं, तसंच शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवे. गावात बोलताना आजवर शेतकऱ्यांत जागृती झालीच नाही, आम्हीच काय ती करायला सुरुवात केली आहे, अशा तऱ्हेचा अहंकार कार्यकर्त्यांनी बाळगू नये आणि मानू नये.
 १९८० साली शेतकरी आंदोलन चालू झालं आणि सुरुवातीच्या काही चकमकीत यशही मिळालं. वर्तमानपत्रे, रेडिओ, इतर प्रचारमाध्यमे यातून प्रसिद्धी मिळाली. परदेशातही प्रसिद्धी मिळाली. पंजाब, हरियानातील शेतकऱ्यांच्यात तर विचार सुरू झाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न जर सुटायचे असतील तर नाशिकच्या पद्धतीने आंदोलन केले पाहिजे. आपलं आंदोलन इतकं यशस्वी झालं त्याला तशी महत्त्वाची कारणंही आहेत.
 आपण ८० साली आंदोलन केले हे भाग्य! कारण ८० ऐवजी जर आपण ७५ साली आंदोलन सुरू केलं असतं तर यश मिळालं नसतं. ८० साल दोन प्रमुख दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक म्हणजे १९७७ सालापर्यंत देशात सर्व धान्ये कडधान्ये आणि इतर शेतीमालाचा तुटवडा होता. त्यावेळी जास्त पीक आलं की जास्त पैसा हाती लागत असे. पण ७७ सालापासून शेतीमालाची मुबलकता निर्माण झाली. मालाचा उठाव होईना. विकण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली. भाव गडगडले. जास्त पीक आले तर पदरी तोटा अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाली. यंदा तर नाशिक जिल्ह्यात संकरित ज्वारीचे पीक बंदा रुपया आलं. सरकारी खरेदी यंत्रणा नाही. त्यामुळे शेतकऱ्याला ज्वारी ६५ पैसे किलो भावाने विकावी लागली. पदरी आलेल्या तोट्याने डोळ्यातून पाणी आले. पीक जास्त आले, आता कसं करायचं अशी चिंता पडायला लागली. अशी स्थिती प्रथमच आली आहे. त्यामुळे ८० साली आंदोलन प्रभावी होऊ शकले.
 दुसरं म्हणजे राजकीय परिस्थिती ७५ सालातील आणीबाणी, ७७ सालात निवडणुका, त्यानंतर पुन्हा निवडणुका, यामुळे एक पक्ष सत्तेवरून जाऊन दुसरा येणे आणि अल्पावधीत पुन्हा पहिलाच पक्ष सत्तेवर येणे, त्याचबरोबर पुढाऱ्यांच्या पक्षोपक्षातील कोलांटउड्या यामुळे सामान्य जनतेच्या मनात सर्व राजकीय पक्षांविषयी निराशा निर्माण झाली. त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली. या पर्श्वभूमीवर '३३ वर्षे शासन शेतकऱ्यांना फसवीत आलं आहे' हा आपला विचार आपण ताठ मानेने, जोरजोराने शेतकऱ्यांपुढे मांडतो. लोक ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. ७५ साली अशी निराशा नव्हती. तेव्हा जर आपण असे बोललो असतो तर कदाचित लोकांनी ऐकून घेतलं नसतं. आज परिस्थिती बदलली आहे. अनुभवाचे चटके बरीच वर्षे खाल्यामुळे लोकांना हा विचार पटतो. म्हणूनच ८० साल शेकऱ्यांच्या नवीन युगाची सुरुवात आहे. अशा परिस्थितीत ८० साली आपल्याला शेतकरी आंदोलन करायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. या आधी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना द्यावा लागला. चटके खाऊन पराभव पत्करावा लागला आणि घोर निराशा पचवावी लागली.
 निपाणीला तंबाखू उत्पादक शेकऱ्यांची एक परिषद घेण्यात आली. तिला चौदा हजार शेतकरी जमले होते. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल अशा हालचाली झाल्या नाहीत तर १४ मार्चपासून तंबाखूच्या भावासाठी लढा देण्याचे ठरले आहे. *निपाणी शहरातील तंबाखूचा व्यापार संपूर्णपणे खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात आहे. ते शेतकऱ्यांवर जबरदस्त अन्याय करीत आहेत. निपाणी भागात १९५६ पासून तंबाखूची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तेव्हापासून शेतकरी अधिक भावाची मागणी सतत करीत आहेत; परंतु व्यापारी शेतकऱ्यांना फक्त लुटत आहेत. शेतकऱ्याने व्यापाऱ्याच्या दारी तंबाखूचा नमुना घेऊन जायचे. मग व्यापारी तंबाखूचा भाव ठरवतो. प्रथमच भाव ठरवताना व्यापारी शेतकऱ्याला मारतो. पुढे जर तंबाखूचे भाव घसरले तर व्यापारी सौदा विसरून शेतकऱ्याला सोडून देतो.


 *१४ मार्च १९८१ रोजी निपाणी परिसरातील तंबाखू उत्पादक आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या जाचातून सुटण्यासाठी आणि शेतीमालाला किंमत मिळावी या मागणीसाठी आपले आंदोलन सुरू केले. ४० हजार शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसले आणि वाहतूक बंद पडली. या महामार्गाच्या सुमारे ३ कि.मी. भागाला एखाद्या नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागाला 'आंदोलन नगरी' असेच नाव देण्यात आले. धाकदपटशा, प्रलोभन, भेदनीती या कशालाही दाद न देता सर्व शेतकरी सतत २३ दिवस शांततेने आणि वाढत्या निग्रहाने रस्त्यावर बसून होते. या अशा वेळी शेतकऱ्याला व्यापाऱ्याचे पाय धरून कमी भावात तंबाखू विकण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तंबाखूचे भाव जर सौद्याच्या भावापेक्षा वधारले तर मात्र व्यापारी सौद्याच्या कमी भावानेच खरेदी करतो. अशा तहेने भावात मारल्यावर मालाचे प्रत्यक्ष वजन करताना काडीसूट, मातीसूट, हवासूट अशा तऱ्हेच्या अकरा तऱ्हांनी वजनात कपात करण्यात येते. अक्कोळच्या सुप्रसिद्ध कडक तंबाखूच्या पूर्ण झाल्यावर रोख पैसा मिळत नाही. झालेल्या रकमेवर ५ ते १२ टक्के सूट कापली जाते. एकूण रक्कम २४४२ रु. झाली तर वरचे ४४२ रु. सोडून देऊन फक्त दोन हजारच देतात. अशा तऱ्हेने लूट होऊनसुद्धा शेतकरी उघडपणे तक्रार करू शकत नाहीत इतके दहशतीचे वातावरण निपाणीच्या व्यापारपेठेत आहे. अशा स्थितीत १४ हजार शेतकरी भव्य मंडप उभारून एकत्र जमू शकतात यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. १९७२ साली अक्कोळच्या तंबाखू उत्पादक तरुणांनी आंदोलन केले होते. त्यांनी ६४ व ७८ साली रास्ता रोको आंदोलने केली होती. त्यामुळे चाकण-नाशिक भागात जी आंदोलने झाली त्यात नवीन काही आहे असे म्हणणे बरोबर नाही. मुख्य गोष्ट आता शेतकऱ्याची वेळ आली आहे. म्हणूनच ८० सालचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर वणव्यासारखे पसरते आहे.
 शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे पर्यायाने महागाई वाढत जाईल असे शहरांमधून राहणाऱ्या डॉक्टर, वकील, ऑफिसर्स, कारकून आणि इतर मध्यमवर्गीयांना वाटत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त भावाच्या मागणीचे परिणाम ग्राहकावर काय होतील हा आपला अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, तो आपण नंतर अभ्यासू; परंतु शहरातील ग्राहकांशी संबंध येणाऱ्या कार्यकर्त्यांनी 'उत्पादक शेतकरी आणि ग्राहक हे दोघेही'


 सत्याग्रहाच्या काळात दि. ५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी पाडव्याचा सण साधेपणाने गुढ्या उभारून आंदोलन नगरातच पार पाडला. ६ एप्रिलच्या पहाटे कर्नाटक शासनाच्या पोलिसांनी आंदोलनाच्या नेत्यांना अटक केली आणि त्यांच्याबरोबरच सर्व सत्याग्रहींनाही अटक केल्याचे जाहीर केले. सकाळी आठ वाजेपर्यंत काही सत्याग्रहींना पकडून बसेसमधून बल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगात रवाना केले. अटक करवून घ्यायची वाट पहात रस्त्यावर शांतपणे बसलेल्या शिल्लक सत्याग्रहींच्या प्रचंड जमावावर शेवटी अश्रूधूर, लाठीमार आणि अमानुष गोळीबाराचा मारा करून पोलीसांनी आंदोलन नगरी उद्वस्त करून टाकली. या आंदोलनात १२ शेतकरी हुतात्मा झाले आणि शेकडो जखमी झाले. (प्र.)  एकाच व्यवस्थेखाली भरडले जात आहेत' ही गोष्ट ग्राहकांच्या मनावर प्रथमतः सवली पाहिजे; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकरी व ग्राहक यांच्यात भांडण लावून शेतकरी आंदोलनाचा पराभव करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तेव्हा ग्राहकांशी किंवा मध्यमवर्गीयांशी बोलताना हे आंदोलन ग्राहकविरोधी आहे, त्यांना त्रास देणारे आहे, या शंकावर सध्या जास्त भर देऊ नये. या विषयाचा अभ्यास करताना ग्राहकांना कोणते त्रास व का होणार आहेत, तसेच फायदे कोणते होणार आहेत याचा अभ्यास करू पण प्रचार करताना ग्राहकांच्या होणाऱ्या फायद्यांवर जास्त जोर दिला पाहिजे. काही दिवसांनी अशी काळजी घेण्याचे कारणही उरणार नाही.
 शेतकरी आंदोलन अजून बाल्यावस्थेत आहे, तरीसुद्धा वर्तमानपत्रीय टीका अभ्यासहीन आहे. हल्लीचे संपादक क्रिकेटपटूपासून शेतकरी-आंदोलनापर्यंत सर्वाविषयी सारख्याच अधिकाराने सल्ले देत असतात. बहुतेकांची धोरणे ही परिस्थितीनुरूप बदलत असतात. युरोपमधील फ्रांसचा बादशहा सम्राट नेपोलियन याच्या राज्यात एकदा बंड झाले आणि त्याला पकडून दूरवर एल्बा बोटावर तुरुंगात ठेवले गेले. नेपोलयनने तिथून आपली सुटका करून घेतली. त्यावेळी पॅरिसच्या वर्तमानपत्रांनी 'दरोडेखोर नेपोलियनचे तुरुंगातून पलायन' अशा ठळक मथळ्याखाली ही बातमी प्रसृत केली. पुढे नेपोलियनने सैन्य जमा करून प्रदेशामागून प्रदेश काबीज केले. जसजसा नेपोलियन राजधानी पॅरिसच्या जवळ येऊ लागला, तसतसे वर्तमानपत्रांचे मथळे बदलत गेले आणि नेपोलिनयन पॅरिसच्या वेशीपाशी सेनेसह आला तेव्हा वर्तमानपत्रांनी 'सम्राट नेपोलियचे भव्य स्वागत' असे ठळक मथळे दिले. तात्पर्य, शहरातील काही लोकांची विचारसरणी ही दबावप्रणीत असते. डोक्याने विचार करणारे थोडे, खिशाने विचार करणारे जास्त. आपल्याला एखाद्या गोष्टीपासून काही तोशीस पडणार नसेल तर दुर्लक्ष, नाहीतर पहिल्यापासून विरोध करण्याची प्रवृत्ती जास्त.
{{gap}आज आंदोलनाची ताकद अत्यंत लहान आहे. नाशिकला २८ नोव्हेंबरला आंदोलन स्थगित केल्यापासून फक्त १४ जिल्ह्यांतून संघटनेचा प्रसार झाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन लाख शेतकरी संघटनेत सामील झाले आहेत. नवीन १४ जिल्ह्यांतून पाच लाख तरी शेतकरी बाहेर येतील. म्हणजे आता संघटनेची ताकद ७ लाखांची झाली. अशा तऱ्हेने ताकद वाढवत नेली तर लोक म्हणतील शेतकरी झोपला होता. ते बरे होते. पण आता तो जागा झाल्यामुळे आज हा रस्ता बंद, उद्या तो रस्ता बंद. म्हणजे वाहतुकीत अडचणीच निर्माण होणार. या तकतकीपेक्षा ज्वारीला पन्नास पैसे जास्त दिलेले बरे. असं जेव्हा ताकदीचं वातावरण तयार होईल तेव्हाच आंदोलन यशस्वी होईल आणि आज जे आंदोलनाविषयी तुच्छतेने बोलत आहेत ते सुद्धा व्यवस्थितपणे बोलू लागतील.
 आपला विचार स्पष्टपणे मांडावा पण त्यात कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न करू नये. तशी काही माणसे आपोआप दुखावली जातात. आपण तसा प्रयत्न मुद्दाम करू नये. शेतकरी-संघटनेचे यश हे अनेक राजकारणी पुढाऱ्यांच्या आयुष्याचे अपयश आहे. 'शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती व्हावी असे म्हणत आम्ही वर्षानुवर्षे घालवली; परंतु आम्हाला ते जमलं नाही. पण एक शेतकरी-आंदोलन केवळ दहा महिन्यात उभं राहतं. सर्व शेतकरी, छोटा शेतकरी, शेतमजूर असे भेदसुद्धा विसरून एकत्र येतात,' हेच त्यांचं अपयश आहे. हेही आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना म्हणायला वाव राहिल की शेतकऱ्यांची संघटना होऊच शकणार नाही. एक पुढारी तर म्हणतात, 'एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण शेतकऱ्यांची संघटना होणं शक्य नाही.' आज संघटना उभी राहताना दिसते, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो - हे जर शक्य होत तर आपण का केलं नाही? आणि हे डाचत असल्यामुळेच संघटनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे. आज आपल्याला माणसं मिळवीत जायचं आहे. संघटना बांधत जायचं आहे. माणसं तोडायची नाहीत. तोडणं सोपं असतं. ज्यांना आंदोलन करावयाचे आहे त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की माणूस, मग तो कसाही असो आपल्याविरुद्ध असण्यापेक्षा आपल्या बाजूच्या एखाद्या कोपऱ्यात का असेना, असणे बरे.
 सारांश, प्रचार करताना या आधीच्या काळातील शेतकरी आंदोलनांच्या प्रयत्नाविषयी आदर बाळगून प्रचार करावा. १९७७ पासूनची धान्याची मुबलकता, राजकीय पक्षांविषयींचा भ्रमनिरास या गोष्टी १९८० सालचं आंदोलन प्रभावीपणे उभं राहण्यामागील प्रमुख बाबी आहेत. ग्राहकांच्या बाजूनं काळजीपूर्वक विचार मांडायला हवेत.
 ****