रुणझुणत्या पाखरा/हे विठूराया

विकिस्रोत कडून
 'सूनबाई, हाईस का घरात' अशी हाक घालीत यमुना मावशी फाटक उघडून ओट्यावर येऊन बसल्या. यमुना मावशी ही गावकडच्या वाड्या शेजारी खोपटात रहाणाऱ्या सुभान वारकाची माय.
 "बरं झालं माय. घरी सापडलीस. ममदापुरातून फाटेच निघाले. इथवर येईतो सूर्व्य डोंगर चढून वर आला. तुजी साळा असंल नव्ह? आता सहा कोस चालाया दोन चार घंटे हवेच. आंदी पानी आन. मगं माजं काम सांगते."
 यमुना मावशी समोर पाण्याचा तांब्या आणि चहाचा कप ठेवला.
 'माय, काचेच्या कोपात नको पितळी नायतर इस्टिलच्या ताटलीत दे. माजी मैतरिण - तुझी सासू खर्चली तवा पासून तिची आठवण म्हणून पितळीतच चा पिते. तू दे आता इस्टिलची ताटली. तिला जाऊन बी झाली चार वरसं. दोघींचा नाद होता. पंढरपुराची वारी बरूबर करायची... ती तर गेली.' असे म्हणत मावशी तांब्या घेऊन ओट्यावर आल्या नि एका हाताची ओंजळ करून तांब्यातलं. पाणी पिऊ लागल्या.
 'मावशी पेला दिलाय. तोंड लावून आरामात पाणी प्या.'
 "खरंय ग. पन आमी वारिक. तुज्या सासूची आन् माझी लई दोस्ती. पांदीला जाऊन आलो की कंदीकंदी माज्या खोपटा समूर ती बी टाकायची. तिथंच हातपाय धुवायची. माज्याकडे शेळ्या होत्या. निक्या दुदूचा चा दिला की पितळीतून प्यायची. मी बी तुमच्या वाड्यात चा पियाची. पन कप मातुर येगळा असे. थोरली काकी घरात होती. तिला नाय चालायचं. न्हाणीत जाऊन पानी मातुर असंच प्यावं लागे. तीच सवय लागली. देसमुखाची हरणाबाई, बामणाची शकाबाई.. आमी समद्या मैतरणी.. लई याद येते. ते जाऊंदे माज काम ऐक." असे म्हणत त्या सांगू लागल्या. त्यांना पंढरीच्या वारीला जायचे होते. वाघोळ्याची बायामाणसं वेगळा गट करून वारीला निघणार होती. आसपासच्या खेड्यातले स्त्री पुरुष त्यांच्या गटात सामील होणार होते.
 'सूनबाई, लई दिसांपासून घोकतीय. पन सुभान्या नि त्याची कारभारिण मनावर घेईनात. माजे बी किती दिस ऱ्हाईले ग? म्हनून या सुनेकडे आले. बरा आहे शिरीहरी? मला पन्नासशंभर रुपये देशील? वाटेत दानापान्याला लागतील. अग तुमा वाण्याबामणाच्या देवा परिस आमचा काळा इठूबा समद्या गोरगरिबांचा हाय ग. त्यो काई मागत नाही. ही बघ तुळसीची माळ. नि यकादस. हितून हात जोडले तरी त्याला आपलं मन कळतं. पन यंदा लईच जाऊ वाटतंय गं. बघ बाई... असं म्हणत यमनामावशी गप्प बसल्या.
 त्यांचा विश्वास मी कसा फुकट जाऊ देईन? आज यमनामावशी नाहीत. आषाढातल्या दिंड्या बघितल्या. हजारो स्त्री पुरुष न थकता, जे मिळेल ते खाऊन, ऊन, धो धो पाऊस झेलत चालतांना पाहिले की मनातले श्रद्धा अंधश्रद्धांचे वाद... गोंधळ शांत होतात आणि यमना मावशींची आठवण येते. शाळेत शिकताना एक वाक्य मनात ठसले होते. We walk by faith not by sight. श्रद्धेने जगी चालतो न बहुधा, दृष्टीमुळे मानव.
 आध्यात्मिक समतेचा विचार सामान्य माणसांच्या मनात पेरणारा, अंकुरवणारा सावळा विठोबा गेल्या शेकडो वर्षांपासून सामान्यांना, ... आर्थिक, जातीय धार्मिक भेदाभेदांच्या भिंती फोडून जगण्याचं बळ देतो आहे. त्याची उत्पत्ती, त्याचा इतिहास, तो नेमका कुठून इथे आला वगैरेवर संशोधक अभ्यासक करत आहेत. करत राहतील. पण गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे चालणाऱ्या दिंड्या, वाऱ्या, वारकरी संप्रदाय यांच्यातील ऊर्जा, ताजेपणा कणभरही विटलेला नाही आणि उणावेल असे ठामपणे वाटत नाही.
 परवा औरंगाबादहून येताना एक दिंडी दिसली. बरीच मोठी होती. इथे तीस टक्क्यांची अट नसल्याने निम्म्याहून जास्त महिला होत्या. सगळे सकाळच्या नाश्त्यासाठी त्या लहानशा गावात थांबले असावेत. त्या गावाने ती सोय केली होती. बायांना पुढे बसवले होते. गळ्यात टाळ अडकवलेला पँटविजारीतला एक तरुण बोलत होता. उत्सुकतेने गाडी बाजूला उभी केली.
 'हये बगा, आया बहिणींना आधी खाऊ द्या. मायबहिणींनो उस्ट टाकू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. पलिकडे एक टोपलं ठेवलंय. त्यात कागदाचा बोळा टाका. हितं तिथं टाकू नका. गाव वाल्यांनी आपल्या दिंडीला नाश्ता दिलाय. आपल्या भागातल्या पंचायत समितीत निवडून आलेल्या शमावैनी चार दिवस आपल्या बरोबर दिंडीत चालनार आहेत. त्या गावाच्या वतीने तुमचे आभार मानतील, आन् मग दिंडी पुढे सरकेल. पान्याची टिपं ठेवलीत. न सांडता आपआपल्या तांब्यात पाणी घ्या. चला...'
 मी ते पाहिले आणि २१व्या शतकातल्या काळा सोबत चालणाऱ्या दिंडीचे दर्शन घेतले. न कळत त्या दिंडीला हात जोडले.
 या दिंड्या, वारकरी संप्रदाय, त्यातील विचार म्हणजे चालत्या बोलत्या, बिनभिंतीच्या पाठशाळा आहेत. सावळा विठ्ठल, त्याच्या भोवती सतत भिरभिरणारी समता विचाराची, सांस्कृतिक एकात्मतेची वलये. काल होती. आज आहेत आणि उद्याही राहतील, विठूराया ही सामान्य माणसाची 'स्वप्नभूमी' आहे. तिने चोखामेळा, जनाबाई, सावतामाळी, संन्यास त्यागून संसार करणाऱ्या विठ्ठलपंतांच्या... समाजाने टाकलेल्या त्यांच्या चार मुलांना, तुकोबाला... अनेकांना समर्थपणे निरभ्र जीवन जगण्याचे बळ दिले. एकनाथांसारखा ब्राह्मण कुळात जन्मून 'संस्कृत देवें केली प्राकृत काय चोरापासौनि आली?' असा खडा सवाल ब्राह्मण पंडितांना विचारणारा व 'भागवत' मराठीतून लिहिणारा लोककवी महाराष्ट्राला दिला.
 ...हे विठूराया तुला सर्वांचे, आमच्यासारख्या नास्तिकांचे दंडवत.