रुणझुणत्या पाखरा/राखी : एक बंधन

विकिस्रोत कडून

  भारतीय लोकसंस्कृतीत इतके वैविध्य आणि वैचित्र्य आहे, इतक्या जटिल गुंतागुंती आहेत की त्यांचे चिकित्सक विश्लेषण करून त्याचा मूळ गाभा शोधणे कठीण जावे. जे विधी, ज्या गाण्यांतील शब्द अर्थहीन वाटतात त्यांत एकेकाळी जीवनाचे चैतन्य एकवटलेले होते. परंतु कालौघात विधींमागील संदर्भ सुटून गेले. शब्दांचे उच्चार... शब्द बदलत गेले. त्यात नवे संदर्भ घुसले. शब्दही घुसले. त्यामुळे त्यांचे स्वरूप व्याप्ती गुंतागुंतीचे होत गेले.
 द्रविड, दस्यू, आर्य, असुरांपासून ते मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश दर्यावर्दी आणि धाडसी परदेशी लोकांनी, या नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध भूमीवर संपत्तीच्या आशेने हल्ले केले. तीन बाजूंनी-पूर्वेकडे बंगालचा उपसागर, दक्षिणेकडे हिंदीमहासागर आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र अशा सागर सीमा आणि उत्तरेकडे पसरलेल्या उत्तुंग हिमालयाची सीमा. अशा नैसर्गिकरित्या एकात्म भूमीवर धनलोभाने स्वारी करणे जेवढे सोपे होते त्याहून येथून परत जाणे अवघड होते. त्यामुळे ज्या परदेशींसोबत विविध रिती... परंपरा या भूमीत आल्या त्या परदेशीसह इथे स्थिरावल्या. येथील मूलवासींसोबत त्यांचा संघर्ष झाला. नंतर मूलवासींनी त्यांना आपल्यात सामावून घेतले. समन्वयाच्या प्रक्रियेतून समरसता निर्माण होत गेली. केळीचे छोटे रोप वाढते. त्याच्या वरच्या आवरणावर अनेक आवरणे चढत जातात. ती एकजीव होऊन जातात. मूळ गाभा शोधायचा तर ही आवरणे सोलून वेगवेगळी करणे कठीण! तसेच भारतीय-
संस्कृतीचे, जीवनरितीचे आहे. वर्षापासून ही समन्वय समरसतेची प्रक्रिया सतत सुरू आहे. त्यातून एकमेकांच्या श्रद्धा, परंपरा, देवता यांचा स्वीकार केला. या संदर्भात इरावतीबाई कर्वेनी 'हिंदू समाजः एक अन्वयार्थ' या ग्रंथात 'नवस्वीकृतींचा ॲग्लोमेरॅशन सिद्धान्त मांडला. त्या लिहितात 'ही ऐतिहासिक घटना म्हणजे सतत स्वीकारची प्रक्रिया आहे. कोणत्याच दोन पर्यायी गोष्टींमध्ये एकीचा स्वीकार व दुसरीचा कायम त्याग असा प्रकार दिसून येत नाही." या नवस्वीकृतीमुळे भारतीय संस्कृतीची अभिजातता अधिक समृद्ध झाली आहे. आज २१ व्या शतकात प्रवेश करून सात वर्षे पूर्ण झालीयेत. या सांस्कृतिक एकात्मतेचा प्रत्यय कन्याकुमारी ते काश्मीर आणि जगन्नाथपुरी ते द्वारकेपर्यंन्त येतो. विविध विधी, सण, उत्सवांतून येतो.
 अगदी जवळ आलेला सण म्हणजे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा. इतिहास काळात उदयपूरची राणी कर्मवती हिने गुजराथच्या बहादुरशहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायूनला भाऊ मानून राखी पाठवली. अशी अनेक उदाहरणे. पूर्वी ही प्रथा उत्तर प्रदेशात रूढ होती. आता ती महाराष्ट्रानेही स्वीकारली आहे. भावाने बहिणीला केवळ आर्थिक वा कौटुंबिक नाहीतर मानसिक आधार द्यावा ही या 'राखी' मागची भूमिका. पुराण काळात श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा विधी करत. पहाटे उठून शुचिर्भूत होऊन तांदुळ, सोने आणि पांढरी मोहरी थोडेथोडे घेऊन त्याची पुरचुंडी करावी. ती 'रक्षा' उर्फ राखी. तिची पूजा करून मंत्र म्हणून मंत्र्याने राजाच्या मनगटावर बांधावी. मंत्र असा

येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्र महाबलः।
तेन त्वामपि बध्नामि, रक्षे मा चल मा चल।।

 महाबली बळिराजां जिने बांधला गेला ती रक्षा मी आपल्याला बांधत आहे. हे रक्षे तू चलित होऊ नकोस. कुठेही जाऊ नकोस. या पुरचुंडीला लालपिवळाशुभ्र असा दोरा बांधून राखी तयार करतात. आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो, राख तथा रक्षा जमिनीच्या सुफलनासाठी. तिच्यातील उर्जाशक्ती वाढण्यासाठी उत्तम असते. हे इथे लक्षात घ्यावे.

 महाराष्ट्रात या पौर्णिमेला नारळी पौर्णिमाही म्हणतात. कोकण किनारपट्टीवर हा दिवस थाटात साजरा होतो. ज्येष्ठ आषाढात दक्षिणेकडून धावत येऊन वेगाने धुमाकुळ घालणारी वादळे शांत होतात. या दिवशी समुद्राची पूजा करून, नारळ फोडून समुद्र किनाऱ्यावरचे कोळी लोक मासेमारीसाठी बोटी समुद्रात सोडतात. पूर्वी प्रवासी बोटीही. हा मुहूर्त साधून सागरातून प्रयाण करीत. गेल्या ५० वर्षात तांत्रिक प्रगती शिगेला पोचली
आहे. परंतु हे सांस्कृतिक दिवस त्यांचे महत्त्व मात्र भारतीयांच्या भावजीवनात अजूनही ताजे आहे. नारळी पौर्णिमेला नारळीभात कोकणात होणारच. आणि देशावरचे रक्षाबंधन बासुंदी श्रीखंडाने मधुर होणारच. महाराष्ट्र उत्तर दक्षिण भारताच्या मध्यावर आहे. कोल्हापून पासून गोवा जवळ. तर जळगाव धुळ्यापासून गुजराथ जवळ. उदगीर निलंग्यापासून कर्नाटक हातावर. हिंगोली नांदेडपासून तेलंगण, आंध्र जवळ. याचा परिणाम असा की महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीवर या सर्व प्रांतातील विविध रितीपरंपरांच्या इन्द्रधनुषी छटा विविध विधी, उत्सव सणांमधून सतत जाणवतात. त्यांचा अभ्यास हा सुंदर ध्यास असतो.