रुणझुणत्या पाखरा/भूमीकन्या

विकिस्रोत कडून

  लोकपरंपरेतील सीता नम्र आहे. तेजस्विनी आहे. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपण्यासाठी भुईत नाहीशी होणारी सीता ही अग्निपरिक्षा देणाऱ्या पतिव्रता सीतेपेक्षा वेगळी आहे. स्वाभिमानी भूमिकन्या सीता लोकगीतांतून समोर येते. राम मात्र पुरूषप्रधान जीवन व्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. तो सीतेला विचारतो,

अंकुश पोटीचा, लहू कोनाचा सांग ।
धरनी झाली दोन भाग, तिच्या सत्वासाठी ।।
लहू न माझा, कूस कोनाचा सांग।
सीतामाई साठी, धरनी झाली दोन भाग ।।
 सीता शरणांगता होऊन रामाकडे परत जात नाही. तर, स्वाभिमानाने मातृगृही भूमीत विलीन होते.

 गर्भवती शकुन्तलेस राजा दुष्यन्त, होणारे मूल माझे नाही असे म्हणत तिला स्विकारत नाही. दुष्यन्ताने नाकारल्यावर माता उर्वशी... देवांचे मन रिझवणारी नृत्यांगना उर्वशी, शकुन्तलेस स्वगृही घेऊन जाते. सर्जन उर्जेत संवेदनशीलता असतेच. भूमी आणि स्त्री हे आदिमिथक त्यांच्यातील सर्जन उर्जेवर आधारलेले आहे. अनेक कवींच्या कवितांतील प्रतिमांतून ते व्यक्त होत असते. धरती आणि पाऊस, त्यातून बहरणारी हिरवी किमया रेखाटतांना बहिणाबाई लिहितात.

आला पहयला पाऊस
शिपडली भुई सारी
धरित्रीचा परिमय
माझं मन गेलं भरी-
धरित्रीच्या कुशीमंदी
बीया बियानं निजली
वऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली-
बीय टरारे भुईत
सर्वे कोंभ आले वऱ्हे
गहयरलं शेत जसं
अंगावरती शहारे-
 आपले मातीपण, सर्जनचा कोवळा आनंद जपण्याचा स्त्री आटोकाट प्रयत्न करते. 'आत्मदेह समुद्भव' असे म्हणत मानवाला स्वत:हून निर्माण केलेल्या अन्नावर जगवणारी, अन्नदा शाकंभरी देवीप्रमाणे कुटुंबासाठी ती अन्नपूर्णा होते. शेतीचा शोध स्त्रीने लावला हे जगन्मान्य सत्य आहे. आजही सर्वसामान्य कष्टकरी स्त्री तशीच शेतीत रमणारी आहे. पितृत्व आकाशाला वा सूर्याला दिले आहे. चैतन्याचे हिरवे... सुगंधी गाणी गाणारी मात्र धरित्री असते.
 कवी ना. धा. महानोर लिहितात,
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
 सर्वसामान्य स्त्रीला क्षणोक्षणी अत्याचार, संकटे, अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु हे सहन करत ती कुटुंबाचे घरपण सांभाळते. सुंदर घर ...खोपा हे तिचे जीवन स्वप्न असते. पण...
 की महानोर 'तिची कहाणी' त नोंदवतात.
ती रोज ओवी गाते सूर्यासाठी
संसारातल्या सुखदुःखासाठी
पण
खोपा खोपा जपतांना
कंठ भरून गातांना
झिम झिम पाऊस बरसल्यानं
डोळे ओले होतांना
खोप्यासाठी तरण्यापोरी काकुळतीला येतांना...
पाऊस आला अवकाळी
भिर भिर डोळे आभाळी...

 स्त्रीच्या मनातला सृजनाचा आनंद सांगतांना त्यांच्या हृदयातून शब्द अंकुरतात
निस्सीम आनंदाने
मृगाचं पेरतांना
काळ्या माऊलीची शपथ घेतांना
तिला भरून आलं रानभर...
माणसाच्या जगण्याचं
सगळं काही साठलंय
ह्या माऊलीच्या पोटात...
तिनं पेर सुरू केली.
आणि हे सारं किती सहज...हसत
कुठे शिकलीस ग माये, दुःख सोसण्याचा वेणा?
साऱ्यांसाठी हसण्याचा पुन्हा खोटाच बहाणा...

 गेल्या दोन दशकात स्त्रीची कविताही आत्मभान घेऊन येते आहे. १९६० नंतर स्त्री आपल्या व्यथा निर्भयपणे व्यक्त करू लागली.
 इंदिरा संत 'कुणी न पुरते आधाराला' या कवितेत लिहितात,
खोटी माती नभही खोटे
कुणी न पुरते आधाराला
दुभंगते ना माती अजुनी,
गगन उघडिना तिसरा डोळा
 आसावरी काकडेंच्या कवितेतली भूमी दान मागणारी नाही. दान देणारी आहे.
पाऊस धारांचे हात पसरून
गंध मागतसे आकाश वरून
असे मागणे ऐकून माती सुखावते आणि
मातीच्या तृप्तीचे बोभाट जाहले
तृप्तीच्या गंधाने आकाश भरले...
 आजच्या महिला कवींच्या कवितेतून भेटणारी भूमी स्वरूपा स्त्री स्वत:च्या माणुसपणाचे, सर्जनाच्या उर्जेचे, अस्मितेचे भान असणारी आहे. ललिता गादगे म्हणतात,
इथल्या मनस्विनीला मात्र आता
कळून चुकलंय
व्हावं लागणारय तिला स्वत:ला
तिला सोडवणारा कृष्ण.
 ती स्वत:तून नव्याने उगवते आहे.
अरूणा ढेरे लिहितात,
माझे पाणी बदलले आहे
माझे जगणे आणि गाणेही बदलले आहे.
 भूमी आणि स्त्री हे मिथक भारतीय मनातला सदाहरित आदिबंध आहे. सर्जनातील मधुर, नवनवोन्तेषी चैतन्य.. अनुभवणारी भूमीस्वरूपा स्त्री, प्रत्यक्ष अंकुरतांना वेदनांची ओंजळ सहजपणे कुरवाळते. वास्तवाला सामोरी जाते. सोशिकपणा, खंबिरपणा ही तिची उर्जा आहे. आज ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ आदि कवी तिच्या सोसण्याची कीव वा दया व्यक्त करत नाही. तर ते विद्ध होतात.
तुझे दुःख भोगण्याचे माझ्या अंगी येवा बळ
तुझ्या अथांग गंगेचे पाणी वाहू दे निर्मळ...
तुझ्या घळघळ घामाचा आला गहिवर आभाळा
वसां पाठोपाठ वसं बरसला पाणकळा