राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/भारतीय इस्लाम

विकिस्रोत कडून
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).
..
भारतीय इस्लाम

 भारतातील इस्लामचे स्वरूप, भारतात इस्लामचे आगमन ज्या प्रकारे झाले आणि ज्याप्रकारे त्याचा विस्तार झाला त्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. इस्लामचे आगमन येथे शांततापूर्ण मार्गाने झालेले नाही. ते हिंसक पद्धतीने झाले. शिवाय मुसलमान उपखंडात सर्वसाधारणपणे अल्पसंख्यांक राहिले आहेत.
 इस्लामच्या इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थिती आहे असे म्हटले पाहिजे, कारण मुसलमान जेथे विजेते म्हणून गेले तेथील बहुसंख्य किंवा सगळीच्या सगळी प्रजा कालांतराने मुसलमान बनली आहे. इस्लामच्या स्थापनेच्या इतिहासाशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. परंतु या स्थापनेनंतर अत्यंत अल्पावधीत इस्लामी साम्राज्याचा आणि पर्यायाने धर्माचा जो प्रचंड विस्तार झाला त्याची कारणे इस्लामच्या स्थापनेच्या इतिहासात शोधावी लागतील. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रेषित महंमद हे इस्लामचे केवळ धर्मसंस्थापक नसून राज्यसंस्थापकही आहेत आणि राज्य (स्टेट) आणि धर्म यांची सांगड इस्लामच्या प्रस्थापनेपासून घातली गेली आहे. आपल्याला नव्या धर्माचा प्रसार करता येत नाही. (किंवा नवा धर्म पाळता येत नाही) म्हणून महमद मदिनेला गेले. परंतु मदिनेला त्यांनी केवळ धर्मप्रसाराचेच कार्य केलेले नाही, त्यांनी आपले राज्य स्थापन केले.
 या घटनेने इस्लामच्या चळवळीला एक विशिष्ट दिशा-सत्तासंपादनाची दिशा-दाखवून दिली. धर्मसंस्थापनेबरोबरच राज्य स्थापन झाले. परंतु राज्यविस्तार धर्मविस्तारावर आधारलेला राहिला नाही. किंबहुना राज्यसत्तेने धर्मविस्तार घडवून आणलेला आहे. इ. स. ६३२ साली प्रेषित महंमद मृत्यू पावले तेव्हा अरबस्तानचा बराच भाग मुसलमानांच्या सत्तेखाली आला होता. त्याच वर्षी झैदच्या नेतृत्वाखाली सिरियावर स्वारी करण्यात आली. या मोहिमेत अपयश आले. परंतु हा इस्लामी साम्राज्यविस्ताराचा आरंभ आहे.
 या साम्राज्यविस्ताराची गती आश्चर्यजनक राहिली. इ. स. ६४० मध्ये इजिप्तवर हल्ला करण्यात आला. पुढील सात वर्षांत इजिप्त ते खोरासन एवढा प्रदेश जिंकला. इ.स. ६४० पासून इ.स. ६७१ पर्यंतच्या एकतीस वर्षांच्या अवधीत अरबांनी पूर्वेला काबूल तर पश्चिमेला कॉन्स्टॅन्टिनोपलपर्यंतचा प्रदेश जिंकला!
 या विजयाची समाप्ती येथे झालेली नाही. महंमदाच्या मृत्यूनंतर सुमारे ५० वर्षांच्या अवधीत अरबस्तानातील लोक मुसलमान बनले. मुसलमान न बनलेल्या ज्यू आणि ख्रिश्चनांना उमर खलिफाच्या काळात (इ.स. ६३४ - ६४४) अरबस्तानातून हाकलून देण्यात आले. मक्केतून बिगरमुसलमानांना प्रेषित महंमद यांनी आधीच हाकलून दिले होते. तथापि एवढे मोठे साम्राज्य कमावल्यानंतर प्रचंड बिगरमुस्लिम लोकसंख्येचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. मदिनेत प्रेषितांनी जेव्हा पहिले राज्य प्रस्थापित केले होते तेव्हा ज्यूंना आणि ख्रिश्चनांना धर्मस्वातंत्र्याची हमी दिली होती. परंतु एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. मदिनेत प्रेषित महंमद परके होते. मुसलमान जेथे अल्पसंख्यांक होते तेथे महंमद यांना आरंभी तडजोड करावी लागली आहे. (ज्यू येसरबकडे (जेरूसलेम) तोंड करून प्रार्थना करीत. मुसलमानांनी आपण मक्केकडे तोंड करून नमाज पढू असे सांगितले. ज्यूंनी याला विरोध केला. मुसलमानांनीदेखील येसरबकडे तोंड करून नमाज पढली पाहिजे असा आग्रह धरला आणि ज्यू येसरबकडे तोंड करून प्रार्थना म्हणत असतील तर आम्हीदेखील तिकडेच तोंड करून नमाज पढू असे महंमद यांनी सांगितले.) पुढे साम्राज्यविस्तार झाल्यानंतर तडजोड करण्याची आवश्यकता संपली होती. उमर खलीफाच्या काळात साम्राज्यविस्तार सुरू झाला आणि बिगरमुसलमानांबरोबर वागण्याचे नीतिनियम तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. ह्या संबंधातील राज्याच्या धोरणाला विशिष्ट दिशा द्यावी लागली. या धोरणाचा पाया कुराण आणि प्रेषित यांनी आरंभी घालून दिलेले नियम हा होता. या नियमांत गरजेनुसार वेळोवेळी भर घालण्यात आली किंवा बदल करण्यात आले.
 बिगर-मुसलमानांकडून जिझिया घेण्याचा आदेश कुराणानेच मुसलमानांना दिला आहे. इस्लामी धर्मशास्त्राचे पुढे चार विभाग झाले आणि त्यांना मानणारे हन्नफी, शाफी, मालिकी आणि हंबली असे चार पंथ झाले. (तुर्क (मोगल आणि अफगाण) हन्नफी होते. भारतात त्यामुळेच बहुसंख्य मुसलमान हन्नफी आहेत.) बिगर-मुसलमानांनी मुसलमानांशी व बिगरमुसलमानांशी वागण्याबाबतच्या प्रत्येक पंथाच्या नियमांत फरक पडत गेला. मात्र मुसलमान व बिगरमुसलमान यांच्यात फरक केला पाहिजे व बिगरमुसलमानांना मुसलमानांप्रमाणे समान वागणूक देता कामा नये यावर सर्व पंथांचे एकमत आहे. बिगरमुसलमान (काफिर) कुणाला म्हणावे याबद्दल या चारही धर्मपंथांचे एकमत आहे. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे (१) ज्यांना ईश्वरी संदेशाचा धर्मग्रंथ प्राप्त झाला आहे असे (अहले किताब), (२) ज्यांचे धर्मग्रंथ ईश्वरी संदेशाशी जुळत आहेत असे व (३) इतर काफिर. हे सर्व बिगरमुसलमान अथवा काफिर म्हणून गणले जातात.
 शाफी पंथाच्या धर्मनियमानुसार ज्यांना ईश्वरी ग्रंथ प्राप्त झाले आहेत असे ज्यू, ख्रिश्चन आणि झोरोस्ट्रियन्स यांनाच धर्मस्वातंत्र्य उपभोगता येते. तथापि इमाम हानिफाने (यांच्या धर्मनियमांना मानणारे हन्नफी म्हणून ओळखले जाऊ लागले.) अरबस्तानातील मूर्तिपूजक वगळून इतर सर्वांनाच धर्मस्वातंत्र्याच्या कक्षेत आणले.
 हे धर्मस्वातंत्र्य विशिष्ट मर्यादेतच पाळता येत असे. या नागरिकांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व प्राप्त झाले. झिम्मी या नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्यावर जिझिया कर लादला गेला. परंतु ज्यांना झिम्मीचा दर्जा दिला गेला नाही अशांपुढे इस्लामचा स्वीकार किंवा मृत्यू असा पर्याय ठेवण्यात आला.
 बिगर-मुसलमानी प्रजेला वागवण्याशी या नियमांचा संबंध आहे. ईश्वरी धर्मग्रंथ कुठले आणि कुणाचे हे मुसलमान सत्ताधीशांनीच (एकतर्फी) ठरविले आणि ज्यांना मुसलमान करून घेणे आवश्यक वाटले आणि ज्यांना करणे शक्य झाले त्यांच्यापुढे इस्लाम किंवा मृत्यू असा पर्याय ठेवण्यात आला. इतरांना झिम्मीचा दर्जा देऊन त्यांच्यावर जिझिया कर लादण्यात आला. प्रथम तो माणशी आकारला जाई. पुढे उस्मान खलिफाच्या काळापासून तो (बिगरमुस्लिम) घरांवर बसविला जाऊ लागला. (घरातील माणसे कमी झाली किंवा उत्पन्न कमी झाले तरी जिझिया कराची आकारणी पूर्वीच्याच प्रमाणात केली जात असे.)
 झिम्मींवर लादलेल्या इतर अटी मानहानिकारक होत्या. उमर खलिफाने यासंबंधी काही नियम करून दिले. ते पुढीलप्रमाणे आहेत:
 १. झिम्मींनी नवीन प्रार्थनामंदिरे बांधता कामा नये.
 २. जुनी प्रार्थनास्थळे पडल्यास किंवा पाडल्यास नवीन बांधता कामा नये.
 ३. मुसलमान प्रवाशांना प्रवासात या प्रार्थनामंदिरांची उतरण्यासाठी गरज भासल्यास अडथळा करता कामा नये.
 ४. कारण न सांगता एखादा मुसलमान झिम्मींचे घरी तीन दिवसपर्यंत राहू शकतो.कारण असल्यास ते कारण संपेपर्यंत राहू शकतो.
 ५. झिम्मींपैकी कुणी मुसलमान होत असल्यास त्याला अडथळा करता कामा नये.
 ६. झिम्मी कोणत्याही कारणासाठी एकत्र जमले असल्यास तेथे उपस्थित राहण्याचा मुसलमानांना हक्क आहे. या हक्काला अडथळा आणता कामा नये.
 ७. झिम्मींनी मुसलमानांसारखा पोशाख करता कामा नये. मुसलमानी नावे (अपत्यांना) ठेवता कामा नयेत. लगाम व जिन बांधलेल्या घोड्यावर फिरू नये. त्यांनी धनुष्यबाण व तलवार बाळगू नये. त्यांनी बोटात मोहरेच्या अगर खड्यांच्या अंगठ्या घालू नयेत.
 ८. आपल्या धर्माचे समर्थन किंवा प्रचार त्यांनी करता कामा नये.
 ९. मुसलमानांच्या शेजारी घरे बांधता कामा नयेत.
 १०. मृतांविषयी मोठ्याने शोक करता कामा नये.
 ११. मुसलमानाला गुलाम म्हणून ठेवता कामा नये.  आणखीही काही नियमांचा ह्यांत समावेश होता. ते न पाळणाऱ्यांना संरक्षित म्हणून वागवले जाणार नाही व त्यांना ठार करण्याचा राजाला अधिकार प्राप्त होईल असे या नियमांचे सर्वसाधारण स्वरूप होते.
 धर्मांतरे सक्तीने झाली, तसेच या अपमानित अवस्थेतून मुक्त होण्यासाठीही लोक धर्म बाळगू लागले. अरबस्तानमधून ज्यू आणि ख्रिश्चन यांची हकालपट्टी झाली. परंतु एवढ्या प्रचंड साम्राज्यातील बहुसंख्येची हकालपट्टी करणे शक्य नव्हते. त्यांना मुसलमान करून घेणे हाच मार्ग उरला. सिरिया, इराक, जॉर्डन, येमेन, इत्यादी प्रदेशांत धर्मांतर थोड्या काळात पार पडले. एक तर तेथील अरब टोळ्या वंशाने मुसलमान अरबांना जवळच्या होत्या. शिवाय या प्रदेशावर रोमन आणि बायझान्टाइन या परक्या लोकांची जुलमी सत्ता होती. पश्चिम आफ्रिकेतही धर्मविस्तार झपाट्याने झाला. इराणमध्ये बहुसंख्यांक लोक मुसलमान बनावयास तीन-चारशे वर्षे लागली. पश्चिम आफ्रिकेतील बर्बर टोळ्यांनी (आताचा ट्यूनिशिया) इस्लामला कडवा प्रतिकार केला. त्यांना पुन्हापुन्हा जबरदस्तीने मुसलमान करण्यात येई आणि पुन्हापुन्हा ते आपल्या मूळच्या ख्रिश्चन किंवा ज्यू धर्माकडे वळत! अनेकदा जिझिया अतिशय निष्ठूरपणे वसूल केला जाई. आताच्या मोरोक्कोमधील एका ठिकाणी जिझिया देण्यासाठी तेथील बिगरमुसलमानांना आपली मुले विकावी लागली. मुसलमान सैन्याला प्रतिकार झाल्यास जिंकलेल्या प्रदेशातील सर्व बिगर-मुसलमानांची मालमत्ता जप्त करण्यात येई! अशा परिस्थितीत जिंकलेल्या प्रदेशातील लोक मुसलमान झाले नसते तरच आश्चर्य! एकदा जिंकलेला हा सारा प्रदेश बहुसंख्य लोक मुसलमान झाल्यामुळे कायमचाच मुसलमानी सत्तेखाली राहिला.
 परंतु इस्लामच्या या इतिहासाला एक दुसरीही बाजू आहे आणि ती पराभवाची आहे. इ.स. ७११ मध्ये तारिकने जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून स्पेनमध्ये प्रवेश केला. इ.स. ७१३ मध्ये, म्हणजे केवळ दोन वर्षांच्या अवधीत, सर्व स्पेन ताब्यात आला आणि थोड्याच वर्षांच्या अवधीत आयबेरियन भूशिर अरबांच्या टाचेखाली आले. अरब सैन्य पुढेपुढे, फ्रान्सच्या रोखाने घुसू लागले. इ.स. ७२१ मध्ये फ्रान्समधील तुलो येथे अरबांचा पहिला पराभव झाला. परंतु त्यामुळे या घोडदौडीला पायबंद बसला नाही. इ.स. ७३० साली ऐव्हिग्वॉन सर झाले आणि सर्व गॉल प्रदेश ताब्यात आला. गॉलचा गव्हर्नर अब्दुल रहेमान याने विजयाची ही परंपरा पुढे चालविण्याचा निश्चय केला. त्याने बोर्दो जिंकले आणि लॉयरे व तूरच्या दिशेने फ्रान्समध्ये पुढे घुसत असताना प्रथमच इ.स. ७३२ साली चार्लस दि हॅमरने अब्दुल रेहमानचा पराभव केला. या पराभवानंतर अरबांची घोडदौड थांबली. इ.स. ७११ मध्ये तारिकने जिब्राल्टर सामुद्रधुनी ओलांडल्यानंतर इ.स. ७३२ मध्ये म्हणजे केवळ २१ वर्षांच्या अवधीत सुमारे एक हजार मैल (स्पेन ते तूर हे अंतर १००० मैल आहे.) ते पुढे घुसले होते. (तूरच्या या विजयाबद्दल युरोपात थेंक्सगिव्हिंग डे पाळला जातो.)
 तूरची ही लढाई निर्णायक ठरली आहे. इस्लामच्या स्पेनकडून होणाऱ्या विस्ताराला तेथे कायमचा पायबंद घातला गेला. इतकेच नव्हे तर त्याची लाट परतविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही परतविण्याची प्रक्रिया मात्र तेवढी नेत्रदीपक नाही. ख्रिश्चनांनी हळूहळू डोके वर काढले. इ.स९१० पर्यंत उत्तर स्पेनमधून अरबांना मागे रेटण्यात ख्रिश्चनांनी यश मिळविले. इ.स. १०८५ मध्ये अल्फान्सो सहावा (लिओं) याच्या नेतृत्वाखाली त्यांनी तोलेदो जिंकले.परंतु इ.स. १०९० मध्ये सत्ता बळकावलेल्या युसूफ अल्मुराविदने आपले आसन पुन्हा बळकट केले आणि तोलेदो वगळता बाकीचा सर्व स्पेन पुन्हा आपल्या टाचेखाली आणला. परंतु अल्मुराविद राजघराण्याला उखडून काढण्यासाठी उत्तर आफ्रिकेतून अल्मुशदीस राजांनी पुन्हापुन्हा स्पेनवर हल्ले केले. त्यांनी अल्मुराविद घराण्याला पदच्युत केलेच, परंतु आपला राज्यविस्तार करावयास प्रारंभ केला. पोप इनोसन्स (तिसरा) याने या राजवटीविरुद्ध धर्मयुद्ध पुकारले. इ.स. १२१२ मध्ये संयुक्त ख्रिश्चन सैन्याने अरब सैन्याचा पराभव करून बार्सिलोना ते लिस्बनपर्यंतचा आयबेरियन भूशिराचा उत्तर भाग मुक्त केला. इ.स. १२३८ ते १२६० या बावीस वर्षांच्या काळात ख्रिश्चनांनी ग्रानदाचा प्रांत सोडून बाकी सर्व प्रदेश पुन्हा घेतला आणि इ.स. १४९२ साली फर्डिनन्ड आणि इसाबेला यांच्या लग्नानंतर एकत्र आलेल्या अॅरेग्नॉन आणि कॅस्टाईलच्या सैन्याने ग्रानदा जिंकले. ग्रानदाच्या या पराभवाने इस्लामच्या इतिहासातील दुसरे पर्व संपले. स्पेनमधील उरलेल्या मुसलमानांना ख्रिश्चनांनी बळाने ख्रिश्चन केले. वरकरणी ख्रिश्चन धर्म पाळून इस्लामच्या निष्ठा गुप्तपणे कायम ठेवण्याचा प्रयत्न काही काळ मुसलमानांनी केला खरा, पण अखेर इ.स. १६१० मध्ये त्यांना स्पेनमधून बाहेर हुसकावण्यात आले.
 (भारतात मुसलमान प्रथम आठव्या शतकाच्या प्रारंभी आले. त्यांच्यापूर्वी आलेले शक, हूण आदी परकीय लोक येथे कालांतराने स्थायिक होऊन त्यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केला, परंतु मुसलमान लोकांनी मात्र येथे स्थायिक होताना त्यांचा धर्म कायम ठेवला, इतकेच नव्हे तर राज्यविस्तार करताना इस्लामचा सतत प्रसार करण्याचाही प्रयत्न केला. इ.स. ७११ साली महमद कासीमने सिंध प्रांतावर स्वारी करून दाहर राजाचा पराभव केला. महंमद कासीम हा अरब होता. त्याच्यानंतर मात्र अरब हिंदुस्थानात आले नाहीत. ह्यानंतरच्या काळात आलेल्या मुसलमानांमध्ये तुर्क, अफगाण आणि मोगल लोक होते. गजनीच्या महंंमूद या अफगाण सरदाराने १००१ पासून १०३० पर्यंत हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या. शेवटच्या काठेवाडवरील स्वारीमध्ये त्याने सोरटी सोमनाथ येथील सोमनाथाचे मंदिर लुटले आणि तेथील सोमनाथाची मूर्तीही फोडली.
 यानंतर महंमद घोरी याने हिंदुस्थानवर ११९१ मध्ये स्वारी केली आणि मुलतान, पेशावर, लाहोर हा भोवतालचा प्रदेश जिंकून त्याने रजपूत राजाचा पराभव केला. इ.स. १२०५ पासून दिल्लीच्या तख्तावर मुसलमानांचा अंमल सुरू झाला तो १८५७ अखेरीपर्यंत चालू होता. महंमद घोरीनंतर अल्लाउद्दीन खिलजी याने प्रथम विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेस स्वाऱ्या करून मुसलमानी साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या मृत्यूनंतर तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांच्या काळात मुसलमानी साम्राज्यास उतरती कळा लागली.
 यानंतर भारतावर बाबराने १५१९ मध्ये स्वारी करून पंजाब प्रांत जिंकला. बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक. तो बापाच्या बाजूने तुर्क आणि आईच्या बाजूने मोगल होता. बाबराने पानिपतच्या लढाईत इब्राहिमखान लोदीचा पराभव करून आग्रा शहर जिंकले आणि नंतर दिल्लीच्या तख्तावर मोगल राजवट प्रस्थापित केली. बाबरानंतर हुमायून आणि नंतर अकबर हा १५५६ मध्ये मोगल साम्राज्याचा अधिपती झाला. अकबराने पन्नास वर्षे राज्य केले. इतिहासकार सरदेसाई यांनी अकबराचे वर्णन 'थोर राज्यकर्ता' असे करताना त्याने केलेल्या सुधारणांचा, रजपूत राजांना जिंकल्यावर त्याने अवलंबिलेल्या सहिष्णू धोरणाचा आणि त्याच्या गुणग्राहक वृत्तीचा गौरव केला आहे.
 उत्तर हिंदुस्थानात मोगल साम्राज्य असताना दक्षिणेकडे एके काळच्या सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली. यांपैकी बहामनी राज्य इ.स. १३४६ ते इ.स. १५२६ पर्यंत अस्तित्वात होते. या राज्याचा विस्तार उत्तरेस नर्मदा नदी, पश्चिमेस सह्याद्री, दक्षिणेस तुंगभद्रा आणि पूर्वेस तेलंगण इतका होता. नंतर या राज्यातील सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली आणि अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही अशा राजवटी अस्तित्वात आल्या. त्यावेळी विजयनगर येथे १३३६ मध्ये हरिहराने आपले राज्य स्थापन केले आणि नंतर विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा खूप मोठा विस्तार झाला. १६७४ मध्ये बहामनी राज्यातून निर्माण झालेल्या सर्व मुसलमान राजवटी एकत्र येऊन त्यांनी विजयनगरचे हिंदू साम्राज्य उद्ध्वस्त केले.
 अकबराने दक्षिणेकडील या मुसलमान राजवटी जिंकण्यासाठी स्वाऱ्या केल्या. १५९६ मध्ये त्याने अहमदनगरच्या राज्यावर स्वारी केली. चांदबिबीने प्रतिकार केला. परंतु १६०० मध्ये मोगलांनी तिचा पराभव केला. अकबरानंतर त्याचा मुलगा जहांगीर हा राजा झाला. त्यानेही या मुसलमान सरदारांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेवर स्वाऱ्या केल्या. जहांगीरने उत्तरेस काश्मीरपर्यंत त्याच्या राज्याच्या सीमा भिडवल्या. जहांगीरमुळेच काश्मीर मोगल अंमलाखाली आला. जहांगीरनंतर शहाजहान आणि त्याच्या नंतर औरंगजेब हा मोगल बादशहा बनला. तीन भाऊ आणि बाप यांची वाट लावून औरंगजेब ४० व्या वर्षी दिल्लीच्या गादीवर बसला. औरंगजेब हा कडवा मुसलमान होता आणि त्याने आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत इस्लामचा सबंध हिंदुस्थानात प्रसार व्हावा आणि पगडा बसावा यासाठी अविश्रांत धडपड केली. १६७९ मध्ये त्याने मुसलमानांखेरीज इतर सर्वांवर जिझिया कर लादला. औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात १६८१ मध्ये दक्षिणेवर जंगी स्वारी केली. विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नेस्तनाबूत केल्यावर औरंगजेबाने मराठ्यांची राजवट उद्ध्वस्त करावयाचे ठरवले. संभाजीला त्याने क्रूरपणे ठार मारले. औरंगजेबास अशी खात्री वाटत होती की त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांचा पराभव करील आणि त्यांना जिंकल्यावर इस्लामचा प्रसार झपाट्याने होऊ शकेल. परंतु मराठे सरदारांनी चिवटपणे गनिमी काव्याने औरंगजेबाशी लढा दिला आणि जुन्नरपासून जिंजीपर्यंतच्या विशाल मुलूखात औरंगजेबाच्या शाही सैन्याला जेरीस आणले. औरंगजेब अत्यंत निराश झाला. इस्लामचा हिंदस्थानभर प्रसार करण्याचे त्याचे स्वप्न भग्न झाले. मोगल साम्राज्य मोडकळीस आले. १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाले.)
 औरंगजेबाचा अस्त होईपर्यंत (इ.स. १७०७) भारतात अव्याहत मुसलमानांची सत्ता अस्तित्वात होती. हा काळ ५३२ वर्षांचा आहे. मुसलमानांच्या सत्तेच्या प्रभावाचा एकूण काळ ८०० वर्षांचा आहे. एवढ्या प्रदीर्घ काळात अखंड भारतातील मुसलमान लोकसंख्येचे प्रमाण फक्त २५ टक्क्यांएवढे राहिले आहे. एवढा प्रदीर्घ काळ सत्ता असताना देशातील बहुसंख्यांक लोक मुसलमान न झालेला भारत हाच एक अपवाद असलेला देश आहे.
 याची कारणे अनेक होती. एक तर भारतातील मुसलमानांची सत्ता क्रमाक्रमाने विस्तार पावली. अकबराच्या उदयापर्यंत सर्व भारत मुसलमानी सत्ताधीशांच्या एकछत्री अंमलाखाली आलाच नव्हता. मोरोक्को ते अफगाणिस्तान एवढ्या प्रचंड प्रदेशात तेव्हा असलेल्या लोकसंख्येहून कितीतरी अधिक लोकसंख्या मुसलमानी राजवटीच्या अंमलाखाली आली. तिचे वेगाने धर्मांतर करून घेणे ही जवळजवळ अशक्य बाब होती. या बाबतीत अल्तमशच्या वजिराने हिंदूंचे धर्मांतर करून घेण्याच्या उलेमांच्या मागणीला दिलेले उत्तर सूचक आहे. तो म्हणतो;
 "हा देश नुकताच आपण जिंकला आहे आणि मुसलमानांची संख्या एका मोठ्या भांड्यात टाकलेल्या चिमूटभर मिठाएवढी आहे. हिंदूंना'इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला तयार व्हा' हा हुकूम आत्ता दिल्यास भयंकर परिस्थिती उद्भवेल आणि मुसलमान एवढे थोडे आहेत की ते हिंदूंना दडपू शकणार नाहीत. मात्र काही वर्षांनी राजधानीत, इतर प्रदेशात मुसलमान चांगले स्थायिक झाले आणि सैन्याची संख्या वाढविली की हिंदूंना इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला तयार व्हा असे सांगणे शक्य होईल.” (उतारा : निझामींचे पुस्तक.)
 अकबराच्या काळात खऱ्या अर्थाने राज्यविस्तार झाला. राज्याच्या विस्ताराबरोबरच सरकारी नोकरवर्ग आणि सैन्य प्रचंड प्रमाणात वाढले. फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा सैन्यात आणि सरकारी राज्ययंत्रणेत शिरकाव झाला. अकबराचे उदारमतवादी धोरणही याला बऱ्याच प्रमाणात साहाय्यभूत ठरले. (या काळातदेखील हिंदूं अधिकाऱ्यांचे राज्ययंत्रणेतील प्रमाण १५% एवढे होते. भारतीय मुसलमान अधिकाऱ्यांचेदेखील प्रमाण १५% च होते. सत्तर टक्के वरिष्ठ अधिकारी वर्ग इराण आणि मध्य आशिया येथून आयात केला जाई.) (प्रा. महंमद यासीन यांचे पुस्तक.) त्याने जिझिया रद्द केले आणि हिंदूंना कारभारात स्थान दिले. त्यामुळे, तसेच धर्माकडे पहावयाच्या त्याच्या विशाल दृष्टीमुळे इस्लामच्या विस्ताराची प्रक्रिया मंदावली. पुढे औरंगजेबाने हा क्रम पुढे रेटण्याच्या अट्टहासाने प्रयत्न केला तरी त्याला यश आले नाही. एकतर अकबराचे धोरण संपूर्णपणे बदलणे सैन्य-दलातील आणि कारभारातील हिंदूंच्या अस्तित्वाने शक्य झाले नाही. (औरंगजेबाबरोबर दक्षिणेच्या स्वारीवर आलेल्या मोगलांच्या सैन्यातील हिंदूंचे प्रमाण पंचाहत्तर टक्के तरी असावे.) अनेक ठिकाणी त्याच्या दरबारातील सामर्थ्यवान राजपूत आणि इतर सरदारांनी आपल्या आधिपत्याखालील राज्यांत जिझिया न लादण्याची सवलत मिळविली. या सरदारांना काढून टाकणे शक्य नव्हते. त्यांच्यावाचून एवढे प्रचंड सैन्य उभेच राहू शकले नसते.
 दुसरे असे की हिंदूंचा प्रतिकार सुरू झाला. येथे एक गोष्ट चटकन लक्षात येते ती अशी की, बहुसंख्यांक हिंदूंनी अत्याचार सहजासहजी सहन केलेले नाहीत. अकबराच्या सहिष्णू धोरणांशी त्यांनी जुळते घेतले, तर औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेला आव्हान दिले. या प्रतिकाराची नीट दखल घेतल्यास धर्मविस्तार अधिक का झाला नाही हे समजून येते. मराठे,जाट आणि शीख यांच्या कडव्या प्रतिकाराला याच काळात भारतातील मुसलमानी सत्तेला तोंड द्यावे लागले. आसाममध्ये अनेकदा अहोमराजांनी मोगलांचे पराभव केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुसलमानी सत्ता इतकी दुबळी ठरली होती की धर्मप्रसाराचे उद्दिष्ट साधणे अशक्य होऊन बसले. भारताचा स्पेन झाला नाही, तथापि अफगाणिस्तानही होऊ शकला नाही. या विशिष्ट इतिहासाचे खोल ठसे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांच्या मनांवर उमटलेले राहिले. भारत इस्लाममय करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली. या जाणिवेने धर्मनिष्ठ मुसलमानी मने भारली गेली. या जाणिवेतूनच पुढे आधुनिक इतिहासातदेखील मुसलमानी धार्मिक चळवळींनी जन्म घेतला, तर स्पेनप्रमाणे इस्लामची ही लाट आपण परतवू शकलो नाही ही खंत हिंदुत्ववादी चळवळींना जन्म देणारी ठरली.

◼️