महाबळेश्वर/मालकमपेठ उर्फ नहर.

विकिस्रोत कडून





मालकम पेठ ऊर्फ नहर.
---------------

 स्वदेश सोडून परदेशवास करणें कोणास प्रिय आहे? परंतु तोही कालमानानें करावा लागतो, व अशा अवस्थेत होईल तितकं करून परदेशांत राहिल्याचा भास न होईल अशी व्यवस्था करण्याची परकीयांस उत्कट इच्छा असते, आणि ती पूर्ण करण्यास लोभी, कष्टाळू आणि साहसी मनुष्य जिवापाड मेहनत केल्यावांचून राहत नाहीं. हें पुढील मालकम पेटशोधनाच्या हकिकतीवरून दिसून येईल.

 पहिल्यानें सन १८२४ मध्यें जनरल लाडविक साहेब सातारच्या रेसिडेंटचे जागी असतांना येथें आले. ते प्रथम आले; ते सिडने पाईंंटावर येऊन उतरले. त्यावेळीं येथें येणें ह्यणजे आपण होऊन काळाच्या दाढेत प्राणत्याग केल्या दाखलची स्थिति होती. एकतर डोंगर अस्मानपर्यत उंच गेलेले असून त्यावर झाडी इतकी दाट कीं त्यास जणु कांहीं पांघरूण घालून झांकूनच ठेवले 

आहेत असा भास होई. अशा ठिकाणीं हिंसक पशूंची गोष्ट काय विचारतां ? त्यांना रात्रंदिवस हवे तिकडे संचार करण्यास सारखेच असल्यामुळे ते जिकडे तिकडे फिरतांना दृष्टीस पडत. वाटांचें तर नांवच काढावयास नको. अशी स्थिती असतां लाडवुईक साहेब काठी टेंकीत टेंकीत जिवाचा धडा करून कसेतरी डोंगरावर येऊन पाहोंचले. सुदैवाची गोष्ट इतकीच कीं डोंगरावरच्या प्रदेशांत निबिड झाडीमधून माथ्यावर येत असतांना, एखाद्या शीघ्रकोपी वनराजाच्या तावडींत सांपडले नाहींत. तथापि त्यांचे जवळ हत्यारपात्यार असतांही दोन दिवसांनी भर दिवसा एका वाघोबानें त्यांचा बराबर असलेला आवडता कुत्रा त्यांच्या समोर उचलून अचानक नेला. बरें झालें. नाहीं तर साहेबांचीच आहुती व्हावयाची. येथील हवा फार उत्तम व स्थळ रमणीय आहे, असें पाहून साहेब बहादुरांनीं ही गोष्ट सर्व लोकांस कळवून सरकारांतही जाहिर केली. पुढे कर्नल ब्रिग साहेब सातारचे रेसिडेंट झाले, त्यांणींं १८२६ साली येथें येऊन एक बंगला बांधिला; आणि सातारच्या 

महाराजांकडून साताऱ्याहून येथपावेतों एक छानदार गाडीरस्ता करून घेतला. नंतर मुंबईचे गव्हर्नर सर जान मालकमसाहेबही येथें हवा खाण्याकरितां आले, आणि त्यांनीं आजारी युरोपियन शिपायांकरितां एक इस्पितळ बांधविलें. पुढें याच सालीं याच साहेबाचे अनुकरण करणारे दुसरे पुष्कळ साहेब लोक हवा घेण्याकरितां येथें येऊन भरले. पुढें कर्नल रॉबर्टसन साहेब सातारचे रेसिडेंंटचे जागीं आल्यावर त्यांनीं येथें एक बंगला बांधून टाकला. पुन्हां सन १८२८ चे नोवेंबर महिन्यांत मालकमसाहेब आपले बरोबर एक वुल्यमसाहेब ह्मणून कोणी डाक्टर घेऊन आले आणि त्यांनी त्याजकडून महाबळेश्वरच्या हवेची चिकित्सा करविली. नंतर त्यांनीं सरकारी बंगल्याकरितां जागा निवडून काढल्या व खाजगतचा आपला बंगला तयार करविला. तो अद्यापि कायम असून त्यास ‘माउंट मालकम ” असें ह्यणतात. मालकम साहेबाच्या सांगण्यावरून सातारचे महाराजांनीं नहर येथें एकगांव बसविला व त्यांस मालकमपेंठ हें नांव दिलें, परंतु हल्लीं हें महाबळेश्वर यानांवानें प्रसिद्ध आहे. पुढें 

साताऱ्यापासून महाबळेश्वरपर्यंत जुना रस्ता होता तो मालकमसाहेबांनीं महाराजांकडून रडतोंडीचे घाटानें महाबळेश्वर घाटमाथ्याखालीं पारं घाटापावेतों वाढवून चांगला बांधून घेतला. तसेंच नहरास पाण्याचा तोटा होता म्हणून वेण्यातलावही करून घेतला.

  पुढे सन १८२९ सालीं ता० १६ मे रोजीं नामदार ईस्ट इंडिया कंपनी व सातारकर महाराज यांच्यामध्यें तहनामा होऊन मालकमपेंठ व सभोंवतील १५ मैलाच्या परिघाची जागा महाराजानीं कंपनीस दिली. तसेच पारगांवही दिलें, परंतु प्रतापगडचा किल्ला व त्या सभोंवतील गडक-याच्या जमिनी पूर्वीप्रमाणें महाराजांकडे रहाव्या असा स्पष्ट ठराव होता. मालकंपेठचे व पारगांवचें ऐवजी कंपनीनें महाराजांस खांबटकीचें घाटाखाली वांईहून सात कोस खंडाळे ह्मणून गांव आहे ते दिला. खंडाळें हें गांव पूर्वी र्शिद्याकडे होते, ते त्यांनीं इंग्लिशास दिलें होतें. पुढे १८४८ मध्यें सातारचें संस्थान खालसा झाल्यावर हें ठिकाण कुलाबा जिल्ह्यांतून काढून सातार जिल्ह्यांत सामील केलें. अशी येथें जागा घेऊन 

याला इंग्रज लोकांनीं अगदीं आपल्या विलायतचे स्वरूप दिलें आहे. तसें देण्यास येथें विलायतेप्रमाणे थंड हवा, धुकें, पाऊस वगैरे जसे असावें तसें आहे.  येथील वस्तीचें नांव मालकमपेंठ ठेविलें आहे. या वस्तीला तीन पेठा आहेत त्यांस त्या ज्यांनीं बसविल्या त्यांचींच नांवें दिली आहेत. मध्यभागीं जी पेठ आहे तिला मालकमपेठ, उत्तरेकडील मशीद रस्ता व दक्षिणेकडे आहे तिला मरी पेंठ अशा संज्ञा आहेत. व प्रत्येक बंगल्याचें नांवही इंग्रजी असून सभोंतालचीं जीं रमणीय ठिकाणें आहेत त्यांची जुनीं नांवें टाकून देऊन त्या ऐवजीं साहेब लोकांनीं आपलीं नांवें दिलों आहत. एलफिनस्टन पाइंटास आपलें नांव दिलें आहे. त्यास पूर्वीचे नांव ब्रह्मारण्य असें होते. सिडनी पाइंटचें जुनें नांव 'डोमेश्वर' असें होतें तें सोडून देऊन सिडनी पाइंट असें नांव ठेविलें. आर्थरसीटचेंही मूळचें “ मडीमहाल ” असें नांव आहे. मुंबईंचे गव्हरनरावरून कार्न्याक पाइंट व फाकलंड पाइंट ही नांवे पडली आहेत. तसेच मुंबईचे हल्लीचे गव्हरनर लॉर्ड नॉर्थकोट यांचे नांव एक टोंकास

दिलें आहे. मालकमसाहेबांच्या दोन मुलीवरून “केट पाइंट" व अमेलियाखोरा हीं नांवें देण्यांत आलीं आहेत. राणीचा मुलगा ड्यूक आफ क्याॅॅनाटचे नांव कोनॉट् पीकला दिलें आहे. अलिकडे “ फ्रियर हॉल " व फ्रियरघांट हीं नांवें पडलीं आहेत; ' व रडतोंडीचा घाट' या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘रोटंडाघांट' असें नांव देण्यांत आलें आहे.

 लहान लहान प्रतीचे साहेब लोक बंगल्याला आपली स्वतःची नांवें किंवा विलायतेंतील खुबीदार नांवे देतात, जसे “ ईगल्सनेस्ट् " “ वुडलॉंन " “हिलस्टोन” “ ग्लेनमेार ” “आलबॉनिया' “फोरओक्स' “ लिलीकाटेज ” “रोजकाटेज् " " सनिसाइडू ” "पारेडाइजलाज् " सिडनी हैीस वगैरे, असाच प्रकार सर्व ठिकाणच्या हवाशीर जागीं चालला आहे. तेव्हां जेथें मनुष्य यत्न व्यर्थ आहे अशा कांहीं सृष्ट वस्तूंखेरीजकरून बाकीच्या बाबतीत कोंडयाचा मांडा करून परदेश कंठणारें आमचें इंग्रजसरकार व त्यांची अनुयायी मंडळी यांची धन्य असो. यांच्या या अशा अप्रतिम गुणामुळे त्यांचें राज्यावर सूर्य कधीही  मावळत नाहीं इतकें तें अफाट झालें आहे हें त्यांच्या स्तुत्य उद्योगाचें फल होय.

---------------