भारतीय लोकसत्ता/उपसंहार

विकिस्रोत कडून
खडतर व्रत चालू ठेवले पाहिजे. त्यांतच त्यांचे चारित्र्य प्रखर होत जाईल आणि धनशक्तीवर मात करून काँग्रेसचें पुनरुज्जीवन त्यांना करता येईल. ब्रिटिश सरकारशी लढा चालू असतांना आपल्याला कार्य करण्यास वाव आहे की नाहीं या विचाराने त्यावेळचे नेते व कार्यकर्ते आडून बसले नाहींत, तर आत्मबलिदानाचा निश्चय करून त्यांनी आपल्या पराक्रमाला क्षेत्र निर्माण केले. एकामागून एक त्यावेळी मागल्या पिढीचे धुरीण बळी जाऊं लागतांच जनता जागृत झाली व तिच्यांतून एक नवी शक्ति निर्माण झाली. आणि तिच्यापुढे ब्रिटिश सरकारलाहि नमावे लागले. म्हणून तेच धोरण तेथील तमोगुणी शक्तीशी संग्राम करण्याच्या काम नव्या पिढीनें अवलंबिले पाहिजे,
 काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे आग्रहाने सांगण्याचें कारण असे कीं, ती एक फार मोठी पुण्याई आहे. आजचे काँग्रेसचे अनुयायी नीतिभ्रष्ट असले तरी ते म्हणजे काँग्रेस नव्हे. अशा स्थितींतही ते देशाच्या अधिकारपदावर राहूं शकतात तेहि काँग्रेसच्या पूर्वपुण्याईच्या जोरावरच. हें पुण्याईचं सामर्थ्य त्यांच्यामागून काढून आपल्यामागें खेचण्याचें कार्य नव्या नागरिकांनी केले पाहिजे. यामुळे दोन कार्ये साधतील. सध्यांचें भ्रष्ट अधिकारी हतप्रभ होतील व नव्या पिढीला पूर्व संचिताचे बळ प्राप्त होईल. थिओडोर रूझवेल्ट यांनीं रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेचा असाच उपयोग केला. विड्रो विल्सन व फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी डेमाक्रॅटिक पक्षाची पुण्याई अशीच उपयोगांत आणली. १९१४ साल लोकमान्य टिळक तुरुंगांतून सुटून आले तेव्हां काँग्रेसचे नेते अगदीं सरकारधार्जिणे व भीरु वृत्तांचे होते. त्यांच्या हाती सध्यांच्या श्रेष्ठीप्रमाणेच काँग्रेसची सूत्रे होतीं तरी त्याच काँग्रेसमध्ये टिळक शिरले व त्यावेळच्या नेत्यांना आपल्या चारित्र्याच्या बळावर उधळून देऊन त्यांनी काँग्रेस आपल्या ताब्यांत घेतली. हेंच धोरण आपण पुढे चालू ठेविले पाहिजे. नाहींतर फ्रान्ससारखे येथें अनंत पक्ष निर्माण होतील आणि स्थिर शासन निर्माण करणे आपल्याला अशक्य होऊन बसेल. म्हणून मला नव्या पिढीच्या तरुण नागरिकांना अट्टाहासाने असे सांगावेसे वाटते की पंडितजींच्या हांकेला प्रतिसाद देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये शिरावें व आपल्या चारित्र्यबळाने तिला पूर्वीचें उज्जवल रूप प्राप्त करून द्यावे.
 १५ ऑगस्ट १९५२ या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानें अध्यक्ष राजेंद्रबाबू यांनी जे भाषण केले त्यांत एकच संदेश होता. 'चारित्र्य संपादन करा.' खरोखर या एकाच संदेशाची भारताला जरूर आहे. आपण माणूस म्हणूनच कमी पडत आहे. सार्वजनिक नीतिमत्ता, कार्यक्षमता, उद्योगशीलता, उत्तरदायित्व, दक्षता, समाजहितबुद्धि या गुणांच्या दृष्टीनें जपानी माणूस, इंग्लिश माणूस, अमेरिकन माणूस हा हिंदी माणसापेक्षा पुष्कळच उंच पदवीवर आहे. ती उंच पदवी हेच चारित्र्य. जमिनीची मशागत करून तिचा कस वाढविण्याचे या देशांत जसे प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत करून त्याचा कस आपण वाढविला पाहिजे. तो वाढला तर लोकशाहीला अवश्य ती साधनसामुग्री व समृद्धि आपणांस उपलब्ध होऊन राममोहनरायांच्यापासून टिळक, महात्माजी, सुभाषचंद्र यांच्यापर्यंत अनेक विभूतींनी ज्या एकाच ध्येयासाठी आयुष्य वेचलें तें ध्येय साध्य होईल.



प्रकरण सोळावें
उपसंहार

 आज जग एका क्रान्तिरेषेवर उभे आहे. त्या रेषेच्या कोणच्या बाजूला त्याचें पाऊल पडेल, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. आणि हे भवितव्य ठरविणे भारतीयांच्या हाती आहे. आजपर्यंतच्या इतिहासांत जगाचें भवितव्य ठरविण्याचा हा मान कालपुरुषाने असा एकट्या एक देशाच्या हात कधी दिला नसेल. भारताला आज तो प्राप्त झाला आहे. त्या सन्मानाला आपण पात्र आहोत की नाहीं है मात्र ठरावयाचे आहे. कालपुरुषानें एक असामान्य जबाबदारी आपल्या शिरावर टाकून आपली सत्त्वपरीक्षाच चालविली आहे.
 जगांत आज लोकायत्त शासनानें आपलें राजकारण चालविणारी, लोकशाहीवर खरी श्रद्धा असणारी दोनच राष्ट्रे आहेत. ब्रिटन व अमेरिका. स्विट्झरलंड, स्वीडन, नॉर्वे हीं लहान राष्ट्र फार तर त्या श्रेणीत आणखी बसवितां येतील; पण त्यांच्या अंगी निर्णायक सामर्थ्य नसल्यामुळे त्यांना गौणत्व आहे. पण एवढे देश सोडले तर बाकी सर्व जग आज दण्डायत्त आहे. एवढेंच नव्हे तर त्याची श्रद्धाहि दण्डायत्त शासनावर आहे. जपान, जर्मनी, इटली यांनी बोलूनचालून लोकशाहीचा धिक्कार केला आहे. त्यांच्या शासनाचे बाह्यरूप गेली दोनचार वर्षे जरी लोकसत्ताकाचें असले तरी तेथील नेते व तेथील जनता यांना लोकशासनाबद्दल मुळींच प्रेम नाहीं. रशिया, चीन व त्यांच्या कम्युनिस्ट साम्राज्यांतील पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, रुमानिया तिबेट, मांचूरिया, मंगोलिया इ. देश यांच्या तोंडी भाषा लोकशाहीची आहे. पण तेथील लोकसत्ता व्यक्तिस्वातंत्र्यशून्य आहेत. 'जनतेची दण्डायत्त लोकसत्ता,' 'नवी लोकसत्ता,' 'कामगारांची लोकसत्ता' अशी आपल्या शासनाला अभिधाने देऊन आपल्या अनियंत्रित दण्डसत्तेला जरा साजरें रूप देण्याचा तेथील समाजधुरीण प्रयत्न करीत आहेत. पण गेल्या आठदहा वर्षांत जगाला त्यांचे खरें रूप दिसून आले आहे. इजिप्त, सिरिया, अरेबिया, इराण येथे अजून उत्पातच चालू आहेत. आपण कोणचे रूप घ्यावयाचें, काय करावयाचें हें त्यांचेंच अजून ठरलेले नाहीं. मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, वेनेजुवेला इ. लॅटिन अमेरिकेतील देशांत वरच्या प्रमाणेच नित्य बंडाळ्या चालू आहेत. त्यांनीं बाह्यतः लोकायत्त शासने स्थापन केली आहेत. पण त्याचे कसलेहि संस्कार लोकांच्या मनावर झालेले नसल्यामुळे तेथें लोकशाही एखाद्या रोगाप्रमाणे लोकांच्या अंगावर फुटून निघत आहे. शिवाय युनायटेड् स्टेट्स् च्या आर्थिक पाशांतून स्वतःला मुक्त करून घेण्यांतच त्यांची अजून कित्येक वर्षे जातील असें दिसते. यावरून पहातां आज जगांतल्या शासनांचा सर्व रोख दण्डसत्तेच्याच दिशेला आहे. रशिया व चीन ही दोन राष्ट्र दण्डसत्तांकित व साम्यवादी झाल्यामुळे जगाचें भवितव्य आज बदलूं पहात आहे. हे दोन्ही देश लोकसंख्या, क्षेत्रविस्तार आणि सर्व प्रकारची भौतिक धने यांनी संपन्न आहेत; त्यामुळे त्यांच्या हाती फार मोठे निर्णायक सामर्थ्य आहे. ब्रिटन व अमेरिका हीं राष्ट्रे अजून पूर्वीप्रमाणेच बलाढ्य, संपन्न व समर्थ आहेत. म्हणून लोकसत्ता व दंडसत्ता यांच्या रस्सीखेचीत लोकसत्ता अजून पाय रोवून तरी उभी आहे. पण दिवसेंदिवस ताण वाढत चालल्यामुळे या सामन्यांतील ही रस्सी आतां अगदी मध्यरेषेवर येऊन तंग होऊन राहिली आहे. या वेळीं आतां हिंदुस्थान आपले बळ कोणच्या बाजूनें टाकणार यावर या जगांतल्या अभूतपूर्व सामन्याचा निर्णय अवलंबून आहे.
 आजपर्यंत मानवानें आपल्या उत्कर्षासाठी अनेक धर्म प्रस्थापित केले. अनेक संस्कृति निर्माण केल्या. कलांची उपासना केली. आणि ज्ञानविज्ञानांचें संवर्धन केले. या सर्वांचे सारभूत तात्पर्य ज्या एका महाशब्दांत सांगतां येईल तो शब्द म्हणजे व्यक्तित्व. धर्म, संस्कृति, कला, विज्ञान हे सर्व मानवाच्या व्यक्तित्वाचेच अविष्कार आहेत. आणि लोकसत्ता ही त्या व्यक्तित्त्वाच्या परिपालनासाठी, संवर्धनासाठी व परिणतीसाठी निर्माण झालेली जीवनपद्धति आहे. म्हणूनच लोकसत्ता हा सर्व धर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ धर्म होय, असे म्हटल्यास त्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं. जुन्या धर्मात जीं महनीय तत्त्वें सांगितली आहेत, तीं सर्व या महाधर्माच्या अभ्यंतरांत सहज समाविष्ट होतात. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण हक्काने मिळाले पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठीच शासनाचा जन्म झालेला आहे. गरीब-श्रीमंत असा भेद न करितां न्यायदेवतेनें सर्वांवर समदृष्टि ठेवली पाहिजे. सत्य हे सर्वात श्रेष्ठ बळ होय. पाशवी बळ हे बळ नव्हे. सर्वांनी सहकार्याने पराक्रम करावा व त्याची फळे सहकार्यानेंच भोगावीं. त्यांत विषमता किंवा भेदभाव असू नये. अनंत परमात्मा हा कोठें स्वर्लोकांत, ब्रह्मलोकांत, किंवा वैकुंठांत नसून तो प्रत्येक व्यक्तीच्या ठायींच निवास करतो. जनतेच्या हृदय- मंदिरांत रहाणाऱ्या या परमात्म्याची सेवा हीच खरी भक्ति होय. हीच पूजा होय. हीं व या तऱ्हेचीं सर्व धर्मांची आधारभूत अशी जी तत्त्वें तीं आत्मसात् करूनच लोकसत्ता पुढे चालली आहे. तीनचार हजार वर्षांच्या इतिहासांतून कालाच्या अग्निदिव्यांतून विशुद्ध होऊन निघालेले धर्म, संस्कृति, कला, विज्ञान यांतले ऐहिक उत्कर्षाला उपकारक असे एकहि तत्त्व लोकसत्तेनें झिडकारलेले नाहीं. उलट मोठ्या साक्षेपाने त्यांचा आदर करून त्यांना सांगाती घेऊनच हा नव्या युगाचा धर्म पुढे निघाला आहे; म्हणूनच लोकसत्ता हा सर्व धर्मांचा धर्म होय असे म्हणतात.
 अथेन्स या नगरीत प्रथम या धर्मतत्त्वाचा जन्म झाला. रोमन लोकांनी त्याचा प्रतिपाळ केला. पुढे अर्वाचीन काळांत ब्रिटनने त्याचें खरें संवर्धन केले आणि आज अमेरिका त्याची जपणूक करीत आहे. आतां यापुढलें कार्य भारताचे आहे. वर सांगितलेल्या सामन्यांत दण्डसत्तेच्या पक्षाला दिवसेंदिवस जी भरती होत आहे, ती पहातां ब्रिटन व अमेरिका आपल्या बळावर ती रस्सी लोकसत्तेच्या दिशेने खेचून नेऊं शकतील असे वाटत नाहीं; आणि त्यांत भारतानें दण्डसत्तेच्या बाजूने कौल दिला तर जगाचे भवितव्य ठरलेलेंच आहे. आतांपर्यंत मानवानें आपली बुद्धि, प्रज्ञा प्रतिभा यांच्या साह्याने जे जे मिळविले त्या सर्वावर विनाशाची घोर आपत्ति कोसळेल.
 भारताच्या हातीं जगाचें भवितव्य आहे असे प्रारंभी म्हटले आहे ते या अर्थानें. जगाला क्रान्तिरेषेच्या कोणच्या दिशेला न्यावयाचे ते आतां आपण भारतीयांनी निश्चित करावयाचे आहे. भारतीयांनी आपला कौल लोकसत्तेच्या बाजूनें दिला आहे असे साधारणपणे म्हणण्यास हरकत नाहीं; पण याचा अर्थ इतकाच की, ही शासन पद्धति हितकारक आहे हे त्यांना पटले आहे. पण या बौद्धिक जाणीवेचे निष्ठेत रूपांतर झाले नाहीं तोपर्यंत याचा कांहीं एक उपयोग नाहीं. मराठेशाहीच्या उत्तर काळांत इंग्रज आपलें राज्य घेरीत चालले होते आणि फितुरीमुळे, आपल्यांतील दुहीमुळे शेवटी आपले राज्य जाणार ही जाणीव प्रत्येक मराठा सरदाराला झाली होती हें त्या वेळच्या कागदपत्रांवरून दिसते. पण या जाणीवेमागें जें निष्ठेचे बळ लागतें तें त्या वेळी आपल्या ठायीं निर्माण झाले नाहीं; म्हणून आपण स्वातंत्र्य गमावून बसलो. आज कालपुरुषानें पुन्हां आपणांस संधि दिली आहे. दण्डायत्त शासनापेक्षां लोकायत्त शासन श्रेष्ठ होय, अशी आपल्या मनाची निश्चिति सुदैवाने झाली आहे; पण त्या निश्चितीमागें जी निष्ठेची पुण्याई लागते, ती आपल्या ठायीं नाहीं. ती कशी निर्माण करता येईल याचे दिग्दर्शन करण्याचा अल्पसा प्रयत्न या ग्रंथांत केला आहे. त्याच्या अभ्यासानें भारतीय तरुणांमध्ये आपली लोकसत्ता दृढ करण्यासाठीं तनमनधन अर्पण करण्याची इच्छा निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करून भारतीय लोकसत्तेचें हें विवेचन संपवितो.