भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म/प्रस्तावना

विकिस्रोत कडून
प्रस्तावना

 'महाभारतातील तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म' असे या प्रबंधाला नाव दिले आहे ते पूर्ण सार्थ आहे. राष्ट्राच्या अभ्युदयाला अत्यंत अवश्य अशीच ही तत्वे, हे सिद्धांत व ही मते आहेत. ऐहिक प्रपंचाचा विचार, ती तत्वे सांगणाऱ्या पंडितांनी, जेवढा केला होता त्याच्या शतांश जरी पुढल्या काळात, विशेषतः इ. स. १००० वर्षांनंतरच्या काळात येथल्या पंडितांनी केला असता तरी भारताची दुर्दशा झाली नसती, पण दुर्दैव असे की त्या काळात स्वतंत्रपणे तर कोणी समाजचिंतन केले नाहीच पण महाभारताचाही नीट अभ्यास केला नाही. पाश्चात्य विद्या येथे येईपर्यंत देशी भाषांत महाभारतातील तत्त्वज्ञान अवतरलेच नाही. या भाषांना रस होता तो त्यांतील रामकृष्णांच्या अद्भुत लीलांमध्ये ! त्यांतील समतेचे तत्त्वज्ञान, प्रयत्नवाद, धनाचे- कृषिगोरक्ष्यवाणिज्याचे महत्त्व, राजधर्माचे श्रेष्ठत्व, बुद्धिप्रामाण्य, व्यवहारवाद यांची त्यांनी संपूर्ण उपेक्षाच केली. या तत्त्वांची महती जाणण्याची ऐपतच त्या काळात भारतातून नाहीशी झाली होती. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे समाजाच्या प्रगतिपरागतीकडे पाहून 'आपल्या मूलतत्त्वांची काही चिकित्सा करावयाची असते, त्यांचे गुरु-लाघव अनुभवाशी पडताळून पाहावयाचे असते हा विचारच भारतात या काळात कधी प्रभावी झाला नाही. त्यामुळे दारिद्र्य, अज्ञान, समाज-विन्मुखता व पारतंत्र्य हेच आपल्या नशिबी कायमचे लिहून ठेविले गेले. रजपूत, विजयनगर, मराठे, शीख यांनी या दृष्टीने काही प्रयत्न केले, पण स्थिर असे कोणतेच तत्त्वज्ञान त्यांनी अंगीकारलेले नव्हते. सामाजिक क्रान्तीचे तर त्यांनी प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे त्यांचे यश अल्पजीवी व मर्यादितच ठरले.
 ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतर आपण त्या अंध, मूढ अशा अवस्थेतून काहीसे मुक्त झालो हे खरे. पण गांधीयुगापासून पुन्हा आपल्या राष्ट्रीय प्रपंचात एकांतिक तत्त्वनिष्ठा, अवास्तव विचारसरणी, व्यवहार-शून्य दृष्टिकोण, ज्ञानोपासनेची उपेक्षा, शत्रुमित्रांतील विवेकहीनता, साध्यसाधनांतील तारतम्यहीनता, नकली दारिद्यप्रेम या घातक दोषांचा प्रादुर्भाव झाला आणि आजही त्यांचा जोर फारसा कमी झालेला नाही. अशा वेळी महाभारतातील राष्ट्रधर्माच्या सिद्धांतांचा आपण अभ्यास केला व निष्ठेने त्यांचे पालन केले तर वास्तव, व्यवहारी दृष्टी. आपल्याला पुन्हा लाभण्याचा संभव आहे.
 धर्म हे साध्य नसून समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, मनुष्याची योग्यता जन्मावरून ठरविण्यापेक्षा त्याच्या गुणांवरून ठरवावी, कृतयुग वा कलियुग हे राजसत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि मोक्ष हे अंतिम साध्य असले तरी ऐहिक राष्ट्रीय प्रपंचाच्या वैभवाकडे कदापि दुर्लक्ष होता कामा नये, हे ते सिद्धांत आहेत. वेदव्यासांच्या आशीर्वादाने आपल्या समाजाला त्यांचा अभ्यास व प्रतिपालन करण्याची बुद्धी होवो अशी शुभेच्छा प्रगट करून ही प्रस्तावना संपवितो.
 हा प्रबंध लेखमालेच्या रूपाने प्रथम मार्च, एप्रिल, मे व जुलै १९६१ या महिन्यांच्या 'वसंत'च्या अंकात प्रसिद्ध झाला. तो आता पुस्तक-रूपाने प्रसिद्ध होत आहे. भाषांतररूपाने तो हिंदीत प्रसिद्ध व्हावा. असे बरेच दिवस मनात होते. पण इतके दिवस जमत नव्हते. आता सुदैवाने ते साधले आहे. 'राष्ट्रधर्म'- लखनौ- संपादक- राम शंकर अग्निहोत्री, या मासिकात व 'रविवासरीय युगधर्म'- नागपूर, जबलपूर, रायपूर,- संपादक- सत्यपाल पटाइत- या साप्ताहिकात हा प्रबंध क्रमशः प्रसिद्ध होत आहे.
 माझे मित्र श्री. अनंतराव कुलकर्णी यांनी या प्रबंधाच्या प्रकाशनाची जोखीम हौसेने अंगावर घेतली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

पु. ग. सहस्रबुद्धे