बापू नावाचे मोहोळ

विकिस्रोत कडून
बापू नावाचे मोहोळ


 रामचंद्र बापू पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा २६ मार्च १९८५ रोजी भास्करराव बोरावके यांच्याकडे सोपवली. संघटना आणि प्रचार या माझ्याकडे असलेल्या कामाची जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली आहे.

 संघटनेचा गेल्या पाच वर्षे आणि काही महिन्यांचा इतिहास अनेक घटनांनी आणि घडामोडींनी भरलेला आहे. पण बापूंच्या अध्यक्षपदाचा काळा हा त्यांतील सर्वात ऐतिहासिक. बापू शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाचे कर्णधार राहिले.

 फेब्रुवारी १९८४ च्या परभणीच्या अधिवेशनांत बापूंची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. संघटनेचे अध्यक्षपद म्हणजे सुळावरची खुर्ची आहे. त्यांत माधवराव खंडेराव मोरे यांचा वारसा सांभाळणे म्हणजे काही तोंडची गोष्ट नव्हे. माधवराव म्हणजे गावागावातील तरुणांच्या हृदयाचे अनभिषिक्त सम्राट. आयुष्याचा अथांग अनुभव, प्रखर बुद्धिमत्ता, खणखणित वैराग्य, अगदी सुलतानी पुढाऱ्यालासुद्धा भिडण्याचा बेडरपणा, सतत नवीन कल्पना, उपमा, शब्दप्रयोग प्रसवणारी प्रतिभा आणि महाराष्ट्राने फार वर्षांत ऐकले नव्हते असे वक्तृत्व. माधवराव नुसते उभे राहिले तरी लाखांच्या सभा स्तब्ध होऊन जात. त्यांच्या वाक्यांच्या एकेका फेकीबरोबर शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या छातीत घालमेल व्हायची.

 बापू जवळ जवळ त्यांच्या अगदी उलट. सभेत बोलणे हेच त्यांना फारसे आवडत नसे. आता बापू फार प्रभावीपणे बोलतात पण पाच वर्षांपूर्वी ते लाउडस्पीकरसमोर यायलासुद्धा टाळायचे. बापूंनी नानांचा वारसा सांभाळायला घ्यायचा म्हणजे कोवळ्या रामचंद्राने शिवधनुष्य उचलायला निघण्याचाच प्रकार.

 बापूंच्या अध्यक्षतेखाली संघटनेने पार पाडलेले कार्यक्रम पहावे; संघटना काय होती आणि कुठे आहे याकड़े नजर टाकावी म्हणजे बापूंच्या कर्तबगारीची खरी साक्ष पटते.

 परभणी अधिवेशनांत शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाची घोषणा झाली. कृषि मूल्य आयोग बरखास्त करा, कृषि उत्पादनखर्च आयोग स्थापन करा हे उद्दिष्ट ठरले. त्यासाठी आंदोलनाचा सर्वंकष कार्यक्रम ठरला. त्याची प्रमुख सूत्री: धान्यबंदी, कर्जबंदी, गावबंदी.

 परभणीचे अधिवेशन संपते न संपते तो आंबेठाण येथे पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे शिबीर आटपून चंडीगढ येथील ऐतिहासिक आंदोलनांकरिता मराठी शेतकऱ्यांनी कूच केले.

सगळा देश हिंदू-शीख दंगलींनी पेटला आहे असा समज होता तेव्हा सत्तर हजार शीख शेतकरी बांधवांबरोबर महाराष्ट्रातील दीड हजार शेतकरी उभे ठाकले. १२ ते १८ मार्च या सातच दिवसांत शेतकरी संघटनेने अगदी अटकेपार झेंडा नेला. शेतकरी चळवळ आता देशभर पसरली. शेतीमालाचा भाव ही शेतकऱ्यांच्याच नव्हे तर देशाच्या विकासाची गुरूकिल्ली आहे हे राज्याराज्यांतल्या शेतकरी कार्यकर्त्यांच्या मनोमनी पोचले. भगतसिंग-राजगुरूंच्या मिलापानंतर पुन्हा एकदा पंजाब-महाराष्ट्र आघाडीने उभा राहिला. धान्य बंदी कार्यक्रम पंजाबात राबवायचा होता. १ ते ८ मे पंजाबमध्ये भल्या प्रचंड गव्हाच्या मंड्यांवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम पार पडला. १० जूनपासून गव्हाची वाहतूक रोकण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. शेतकरी झेंडा झपाट्याने पुढे सरकत होता आणि तेवढ्यांत...

 अटकेपार झेंडा नेणाऱ्यांवर पानिपतच्या पराभवाचा प्रसंग ओढवण्याची वेळ आली. पंजाबांतील शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फायदा उडवण्याचा प्रयत्न अकाली करत होते आणि अकाली आंदोलनाच्या ज्वालेचा फायदा अतिरेकी उठवू पहात होते. महिने महिने जेलभरो आंदोलन करूनही शासन बघत नाही या अनुभवाने मति कुंठित झालेल्या अकाली नेतृत्वाला संघटनेने परभणीत दिलेल्या कार्यक्रमांतील प्रतिभा जाणवली आणि त्यांनीही तीन जूनपासूनच गव्हाची वाहतूक रोकण्याचा कार्यक्रम जाहीर केला.

 त्यानंतर लष्कराचा प्रवेश, सुवर्णमंदिरांतील रणकन्दन हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. पण पंजाबमधील प्रत्येक गावात काय घडले हे कुठे छापून आले नाही.

 अतिरेक्यांच्या बंदोबस्ताकरता आलेल्या लष्कराचा आणि पंजाबमधील तंग वातावरणाचा फायदा घेऊन शेतकरी आंदोलन खच्ची करण्याचे कारस्थान सुरू झाले. गावोगाव घुसून वीजेच्या बिलाच्या आणि कर्जाच्या वसुलीसाठी हाणमार, पोलिसी छळ, धरपकड चालू झाली. एवीतेवी शेतकऱ्यांना पकडून नेले जातच आहे. मग मेंढ्यांसारखे तुरुंगात कां जावे? वाघासारखे जावे या हेतूने १ जुलैपासून जेलभरो आंदोलन सुरू झाले. महाराष्ट्रातून एक छोटासा जथा पंजाबमधल्या शेतकऱ्यांची दोस्ती दाखवून देण्याकरिता गेला. २० जुलै रोजी त्यांना अटक झाली.

 महाराष्ट्रभर या अटकेविरुद्ध निदर्शने झाली. शेकडो हजारोंनी शेतकरी तुरुंगात गेले. फार मोठ्या प्रमाणावर स्त्रिया या निदर्शनात सामील झाल्या. या निदर्शनांची सूत्रे बापूंनी स्वत: सांभाळली होती.

 १० सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगड येथे शेतकरी मेळावा होता. त्यावर बंदी घालण्यांत

आली. चंदीगडला येणाऱ्या आगगाड्या, बस बंद करण्यांत आल्या. शेतकऱ्यांच्या नव्या ताकदीला राजकीय मान्यता मिळाली.

 शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाची रणभूमी आता महाराष्ट्रांत आली. वर्षाअखेर शासनाला निवडणुकीच्या खिंडीत गाठून परभणीच्या मागण्या मिळवून घेता येतील हा आडाखा ठरला. महाराष्ट्रभर प्रचार मोहीमेचा धडाका चालू झाला.

 सप्टेंबर १९८४ मध्ये दक्षिण महाराष्ट्र मोटर सायकल प्रचार फेरीचा अभूतपूर्व कार्यक्रम झाला. हजारो मोटारसायकली एका मागोमाग एक लष्कराच्या शिस्तीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर जिल्हे जागवून आल्या. कोपरगांवच्या डोळे फाडून टाकण्याच्या मेळाव्याने समारोप झाला. २ ऑक्टोबरला गुजरातमधील बार्डोलीतून दोन प्रचार यात्रा निघाल्या एक बारडोली ते साबरमती आणि दुसरी बारडोली ते धुळे, जळगांव, विदर्भ, मराठवाडा मार्गे टेहरे. प्रचार यात्रेत उत्साहाला उधाण आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी टेहरे येथील मेळाव्यांत संघटना काय आदेश देते याकडे सगळे लक्ष लागले होते. हिंगणघाट येथे या प्रचार यात्रे दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राष्ट्रीय परिषद झाली.

 एवढ्या रणधुमाळीत बापू आणखी एक मोठे किचकट आणि बापूंच्या भाषेत 'घाणेरडे' काम सांभाळत होते. नाशिक जिल्ह्यांतील पाचहीं साखर कारखाने आणि ठेगोड्याच्या सूत गिरणीच्या निवडणूका याच वेळी जाहीर झाल्या. निवडणूकांसाठी पॅनेल तयार करणे, प्रचाराची मोहीम सांभाळणे ही कामे कोणीतरी करायला पाहिजे होती. या कामावर बापू फार नाराज असायचे. मला कितीदा म्हणाले, 'निवडणुकांच्या घाणीपासून दूर रहावे म्हणून संघटनेत आलो आणि पुन्हा त्याच घाणीच्या आसपास फिरावे लागते आहे." निवडणुका म्हटल्या की भल्याभल्यांची डोकी फिरून जातात. अगदी बापूंवर आणि भास्करभाऊंवरही लोक जिभा सोडू लागले. शत्रूशी सामना करतांना कधी न डगमगलेले बापू जिवलगांच्या शब्दांनी कासावीस होऊन जायचे.

 ३१ ऑक्टोबर १९८४ उगवला. प्रचारयात्रेला आता मुसळधार वृष्टीने तुडूंब भरून चाललेल्या महानदीचे रूप आले होते. गावागावांत यात्रेचे स्वागत करतांना शेतकरी अबालवृद्ध स्त्री पुरुष येणाऱ्या स्वातंत्र्याचेच जणू दर्शन घेत होते. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य ओठाशी आले असे क्षणमात्र वाटले.

 पण नियतीच्या मनात काही वेगळाच खेळ होता. यात्रा टेहऱ्याला पोचण्याआधी पंतप्रधान इंदिरा गांधींवरील हल्ल्याची आणि त्या जखमी झाल्याची बातमी आली.

आंदोलनाची सर्व परिस्थितीच पालटली, निवडणुकीच्या आधी उभारायच्या प्रचंड आंदोलनाच्या योजना बांधून बाजूला ठेवाव्या लागल्या. देशभर शीख बांधवांविरुद्ध दंगली घडवून आणण्यांत आल्या.

 स्व. इंदिराजींच्या मृत्यूचे दुःख, नवीन पंतप्रधानांबद्दल वाटणारी चिंता यांनी देश भारून गेला. त्यांचा फायदा घेण्याकरिता निवडणुका जाहीर झाल्या. ज्या खिंडीत शासनाला गाठायचे ठरले होते ती खिंड एकदम भूकंप होऊन राजमार्ग बनला.

 बापूंच्या नेतृत्वाची आता खरी कसोटी सगळ्या खेळींचे आडाखे उधळून गेल्यावर लागली. एका पाठोपाठ एक कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या गेल्या. खचून गेलेल्या विरोधी पक्षांच्या फळीला उचलून धरण्याचा निर्णय झाला. गावबंदीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्र झपाटून गेला. अडाणी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता देता पुढाऱ्यांच्या नाकी दम आला. सगळ्या देशात इंदिरा पक्षाची मते दहा टक्क्यांनी वाढली. फक्त महाराष्ट्र एकच राज्य असे की जेथे राज्यकर्त्या पक्षाची मते घटली. पण लोकसभेतील जागांच्या हिशेवांत अक्षरश: पानिपत झाले.

 या उलट संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला. भुईसपाट झालेल्या विरोधकांना एकत्र आणले. त्याकरिता धुळ्याच्या अधिवेशनाचा प्रचंड संसार उभारावा लागला. त्यातून पुलोद आघाडी तयार झाली आणि विरोध बचावला. एकहाती सत्तेचा धोका टळला. शेतकरी आंदोलनाच्या मार्गात आलेली धोंड दूर झाली.

 २३ फेब्रुवारी १९८५ रोजी पंतप्रधान राजीव गांधींनी घोषणा केली 'कृषि मूल्य आयोगाचे नाव बदलून आता ते कृषि मूल्य आणि उत्पादनखर्च आयोग करण्यांत आले आहे' अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बापूंनी स्वातंत्र्यवर्षाचा कार्यक्रम जवळ जवळ ठरवलेल्या अवधीत पुरा केला.

 खरं पाहिले तर बापू ही व्यक्ति नाहीच, बागलाण तालुक्यांत कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. या मोहोळाला आपण सगळे बापूंच्या नावाने ओळखतो एवढेच. सप्टेंबर १९८० मध्ये सटाण्याच्या नगरपालिका सभागृहांत एक सहकारी क्षेत्रातील कार्यकत्यांची बैठक होती. अनायासे माधवराव खंडेराव, प्रल्हादराव व मी आसपास मालेगांवला होतो. आम्हाला सटाण्याला नेण्यात आले. दोनचारशे कार्यकर्त्यांसमोर त्या दिवशी झालेली भाषणे अविस्मरणीय झाली. बस, त्यानंतर बागलाणमध्ये प्रचार करण्याची, पटवून देण्याची गरजच पडली नाही. ते काम सगळे या कार्यकर्त्यांच्या मोहोळानेच थेंबाथेंबाने केले, पण एका रात्रीत केले. बागलाणमध्ये आम्ही फिरतो ते प्रचाराकरिता नाही, आमच्याही

मनातली मरगळ झटकून टाकण्यासाठी.

 बापूरूपी मोहोळाची कितीतरी रूपे स्वरूपे गेल्या पांच वर्षात मी पाहिली आहेत. गिरणा कारखान्याने उसाच्या आंदोलनाची उपेक्षा करून २३ ऑक्टोबर १९८० रोजी गळीत चालू करायचे ठरवले. उसाच्या मोळ्या गव्हाणीत पडण्याच्या आधी तरुण कार्यकर्ते त्यांत उड्या टाकतील अशी घोषणा झाली. २३ ऑक्टोबरला कारखान्यावर हजारो शेतकरी जमले,कारखाना बंद राहिला. आज तो कारखाना सभासदांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती सुपूर्त केला आहे.

 १९८० च्या रास्ता रोकोत बागलाणची कामगिरी खरी वाघाची. मंगरूळ पीर फाटा, सौंदाणे, उमराणे, झोडगे शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने लढवले आणि मारही तसाच अफाट सोसला. १३ नोव्हेंबर मंगरूळ पीर फाट्यावर सैरभैर झालेले शेतकरी सांभाळणारे बापू, जानेवारी १९८० मध्ये सटाण्यांतील ऐतिहासिक मेळाव्याचे कर्णधार बापू. १० नोव्हेंबर १९८१ च्या टेहऱ्यांतील गोळीबाराला तोंड देणारे बापू, जानेवारी १९८२ च्या सटाण्याच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष बापू.

 सटाण्याच्या अधिवेशनाचे सगळेच स्वरूप म्हणजे बापूंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वभावाचे आणि वक्तिमत्वाचे प्रतिबिंबच. काम प्रचंड पण कुठे गोंधळ नाही, गडबड नाही सर्व अगदी शिस्तीने आणि वेळच्यावेळी चाललेले. सगळ्या विश्वाचा संसार तर दिसावा पण त्याचा नियंता मात्र कुठेच दिसू नये त्याप्रमाणे सटाण्याच्या अधिवेशनाची सूत्रे हलविणारी मंडळी कोण हे शेवटपर्यंत आम्हा पाहुण्यांना कळलेच नाही.

 तसे बागलाण भागांत अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, महर्षि आणि नेते यांचा काही तोटा नाही. बापू या सगळ्यांचे उलटे टोक. बोलणार फार थोडे, अहंकाराचा अगदी स्पर्श नाही. याउलट स्वत:कडे कमीपणाच घेण्याची प्रवृत्ती. तनमनधनाने स्वत:ला झीज लावून घेण्याची तयारी, तरीही सतत हसरा चेहरा आणि विनोद समजण्याची करण्याची ताकद.

 गेल्या तीन-चार वर्षांत संघटनेच्या कामाबरोबर मला व्यक्ति म्हणून अनेक कठीण, अगदी अंत:करण फोडून टाकण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागाल. बापू माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान. पण या काळात त्यांनी जो आधार दिला त्याचे ऋण सांगण्याचा प्रसंग कधी नंतर येईल. आज फक्त बापू नावाच्या मोहोळाचा संघटनेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीचा हा आढावा आहे.

 मनमाडच्या बैठकीनंतर मी बापूंच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गृहीणींना म्हणालो, "वर्षभर बापूंना तुम्ही संघटनेच्या कामाकरिता मोकळे केले तुमचे आभार कसे मानू ?" उत्तर साधे सरळ, "साहेब मुलं लहान आहेत म्हणून, नाहीतर आम्हीपण संघटनेकरिता बाहेर पडलो असतो."

 

(शेतकरी संघटक, १९ एप्रिल १९८५)

■ ■