पान:Samagra Phule.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न (नाटक) गा सन १८५५ (प्रथम माझ्या कुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भी वास करू लागल्याचा आरंभ होत आहे तोच ब्राह्मण जोशाची स्वारी येवून त्या गरीब बाईस मोठमोठ्या हुलथापी देऊन तिजला द्रव्यहीन कसकशी करितो याविषयी मी येथे लिहीन.) स्थळ (जोशी त्या गरोदर बाईचा नवरा घरी नसेल अशी संधी पाहून प्रथम तिथ, वार, नक्षत्र, योग, करणाचा उच्चार करून तिच्या दारी उभा राहिला. इतक्यात घरच्या धनणीने याचा शब्द कानी पडताच थोडी कोरडी भिक्षा हातात घेऊन बाहेर ओसरीवर आली.) जोशी : (थोडी भिक्षा पाहून मनांत मोठा खटू झाला.) बाई, मज ब्राह्मणास भिक्षा घेऊन आलीस ती ही कां? बाई : महाराज, काय? काय झाले? ही भिक्षा नव्हे काय? मी गरीब दुबळी, माझा नवरा तर सर्व चार रुपये दरमहा मिळवीत असतो. जोशी : बाई ही भिक्षा नव्हे कोण म्हणेल? परंतु एवढ्या भिक्षेने माझे पोट कसे भरेल ? आणि मी तुझे कल्याण कसें चिंतावे? बाई : (मोठा कंटाळा पावून) जा बाबा, ब्राह्मणाची चिकाटीच मोठी! आम्ही तुमच्या पोटाची काळजी कोठवर करावी? तुम्ही एखादा रोजगार धंदा वा करा ना? जोशी : (रोजगार धंदा करणे हे आमचे कपाळीच लिहिले आहे, यात त्वां काय जास्ती सांगितलेस असें मनांत म्हणून) ते खरे. पण, तुझ्या शेजारिणीसारखे तुझें कांही नुकसान नाही व तुला पाढे बोलू देणार नाहीं बरे! बाई : (थोडा विचार केल्यासारखे करून) त्या बाईचे मूल ते आपल्या नशिबाने मेलें. जोशी: हँ हँ, नशिबाने मेले काय? बाई : नशिबाने नाहीतर कशाने ? तुम्हाला पुष्कळ भिक्षा दिली नाही म्हणून मेले काय? जोशी : थोडी का होईना, परंतु ती आमच्या संतोषाने असावी.