Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
प्रस्तावना

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

 या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडेस त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे. या देशांत भट लोकांचें राज्य होऊन सुमारे तीन हजार वर्षांपासून अधिक काळ लोटून गेला असावा, असें अनुमान होतें. ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेची क्रूर शासने दिली. पुढे कांही काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले; कारण त्या वेळेस ते लोक सत्तेच्या संबंधानें पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढें त्यांस भट लोकांनीं ज्ञानहीन करून टाकिलें, याजमुळे भट लोकांचे पांचपेंच त्यांचे लक्षांत मुळींच आले नाहींत. त्यांनी त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यांस अक्षय आपले ताब्यांत ठेवण्याकरितां केवळ स्वहितास अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणा सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले, असें त्या वेळचे अज्ञानी लोकांस सांगून त्यांचें मन सर्वस्वी वळविलें. त्या ग्रंथांत त्यांनी असें लिहिलें कीं, शूद्रांस ईश्वराचा उत्पन्न करण्याचा हेतु इतकाच आहे कीं, त्यांनीं सदासर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावें व जेणेंकरून त्यांची मर्जी खुष राहील असें करावें; म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचें व जन्मास येण्याचें सार्थक झालें. आतां कोणी या ग्रंथांविषयी थोडासा विचार केला असतां ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून आले असावे किंवा कसें, हें लागलीच कळून येईल. अशा ग्रंथांपासून सर्वशक्तिमान, सर्व जगाचा व त्यांतील सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता जो परमेश्वर त्याच्या समसृष्टीला मोठें गौणत्व आणलें, असें आमचे जे हल्लीचे शहाणे भट बंधु, ज्यांस बंधु म्हणण्यास मोठी लज्जा प्राप्त होती; कारण त्यांनी एके वेळीं शूद्रादि अतिशूद्रांस फार दुःखें दिली व हल्लीही ते धर्माच्या योगानें त्यापासून दुःखें सोशीत आहेत आणि एकमेकास दुःख देणें हा बंधुधर्म नव्हे, तथापि त्यांस आम्हा सर्वांचे उत्पन्नकर्त्याच्या संबंधानें बंधु म्हणणे भाग पडते; तर ते देखील उघड रीतीनें असें म्हणण्यास सोडणार नाहींत, मात्र त्यांनीं स्वहिताकडेस लक्ष न देतां केवळ न्यायास अनुसरून विचार केला पाहिजे. असें जर आहे, तर ते ग्रंथ आमचे शहाणे इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व दुसरे विद्वान लोक पाहून (ते) शुद्ध मतलबी आहेत, ज्यांत सर्व प्रकारें ब्राह्मणांचें महत्त्व सांगून त्यांस त्यांची लोकांचे मनावर वजनदारी बसावी याजकरितां ईश्वरापेक्षांदेखील श्रेष्ठ मानिले आहेत, असें संमत दिल्यावांचून राहणार नाहींत. त्यांतून वर सांगितलेले लोकांपैकीं इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणी इतिहास वगैरे ग्रंथांत भट