पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४३

प्राप्त होते; त्यामुळे पाणी थंड होते. खोज्यामध्ये अगर मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेविलें असतां थंड होते ह्याचेही कारण हेच होय. खोज्यास व मातीच्या भांड्यास जी अनेक छिद्रे असतात, त्यांमधून पाणी झिरपून भांड्याच्या पृष्ठभागांवर येते, व त्याचे बाप्पीभवन होत असतांना ते भांड्यांतील पाण्यामधूनच उष्णता घेते; ह्यामुळे त्या पात्रांतील पाणी थंड होते. उन्हाळ्यामध्ये कपडे पाण्यात भिजवून सावलीमध्ये थोडा वेळ ठेविले असतां थंड होतात, ह्याचेही कारण हेच.

 ह्या बाष्पीभवनापासून इतकी थंडी उत्पन्न करितां येते की, ज्या पाण्याचे बाष्पीभवन होते तेच पाणी थिजून त्याचे बर्फ होते. अशा रीतीनें बर्फ करण्याची रीति फार सोपी आहे; परंतु त्यास यंत्राचे साहाय्य लागते. पाण्याचा आणखी एक असा धर्म आहे की, त्याच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब जसजसा कमी करावा तसतसे त्यास कमी उष्णतेनें आधण येते, म्हणजे तसतसे त्याचे फार बाष्पीभवन होऊ लागते. एका काचेच्या भांड्यामध्ये (एका वाटीत) पाणी भरून ठेवावे, व त्या वाटीशेजारीच सल्फ्यूरिक आसिड सारखा एकादा जलशोषक पदार्थ ठेवावा; व त्या भांड्यांतील हवा वाताकर्षक यंत्राने काढून टाकू लागावे; म्हणजे अर्थातच वाटीवरील हवेचा दाब कमी होऊ लागतो, व त्या पाण्याचे बाष्पीभवन फार झपाट्याने होऊ लागते. अशा रीतीने उत्पन्न झालेली वाफ सल्फ्यूरिक आसिड लागलीच शोषून घेते, व ह्यामुळे पाण्याची आणखी वाफ होऊ लागते. या बाप्पीभवनाने पाण्याची उष्णता