Jump to content

पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.]अभ्यास. १२९ .

ठिकाणी आहे. त्याचे अनंत बिंदू करून सारे विश्व त्याने आपल्या जाणिवेंत आणलें म्हणजे तो परमेश्वर झालाच. त्याची जाणीव सध्या अत्यंत संकुचित आहे, तीच त्याने विश्वव्यापी केली पाहिजे. आपल्या जाणिवेच्या कक्षेचा विस्तार मनुष्याने अनंतपटीने वाढविला तर तोच परमेश्वर होतो. याकरितां जाणीव म्हणजे काय याचा विचार प्रथम करणे अगत्याचे आहे. किंबहुना, ही एकच वस्तु आपणास पूर्णपणे समजली की आपले काम झाले.
 आपण असे समजूं की चोहोकडे पूर्ण अंधकार भरला असून त्यांतून एक अनंतरेषा गेली आहे. अंधारामुळे ही रेषा आपणास दिसत नाही. पण या रेषेवर एकच तेजोविंदु असून त्या रेषेवरून तो पुढे जात आहे. आपला मार्ग हा बिंदु आक्रमीत असतां त्या रेषेचे वेगवेगळे भाग तो प्रकाशित करितो. परंतु प्रकाशित भागाच्या आगेमागें मात्र पूर्ण अंधार तसाच आहे. आपली जाणीव या तेजोबिंदूसारखी आहे. या जाणिवेचे पूर्वानुभव नाहीसे होऊन नवे अनुभव त्यांच्या जागी आले आहेत. काही पूर्वानुभव अगदीच नष्ट झाले नसले तरी ते विस्मृतीच्या कक्षेत पडले आहेत. त्यांचा विसर आप- णास इतका पडला आहे, की जणूं काय त्यांना अस्तित्वच नाही. त्यांचे अस्तित्व आपल्या ठिकाणी आहे ही जाणीवच आपणास नाही. पण असें आहे तरी त्यांचे कार्य अगदी थांबले आहे असे मात्र नाही. आपल्या सम- जुतींत न येतांही त्यांचे कार्य आपल्या शरिरावर अविरतपणे चालू आहे. हे कार्य केवळ शरिरापुरते आहे असेंही नाही; तर तें मनावरही चालू आहे.
 जगांत अनेक नीतिग्रंथ निर्माण झाले आहेत. प्रत्येकाने आपापली वेग- वेगळी उपपत्ति सांगून नीतीचा व्यवहार सांगितला आहे; पण या सा-यांनी एक घोडचूक केली आहे. अकार्यापासून परावृत्त कसे व्हावें हे कोणीही सांगितलेले नाही. सत्कार्य करावें हे चांगले; पण अकार्य करूं नये हेही तित- केंच चांगले नाही काय ? “अरे मुला, चोरी करूं नको" असे प्रत्येक शास्त्र सांगते. उपदेश फार उत्तम आहे; पण मनुष्य चोरी कां करतो, याचा विचार कोणी केला आहे काय? चोरी, दरोडेगिरी आणि आपली बाकीची सारी दुष्कृत्ये अनिवार्य अशा स्वरूपाची आहेत. इच्छा नसतांही मनुष्य चोरी करतो, खोटे बोलतो आणि दुसऱ्याचे घर फोडतो. त्याच्या इंद्रियांवर त्याचा ताबा चालत नाही. त्याचे एक मन नको नको म्हणत असतांही त्याची इंद्रियें

स्वा०वि०९-९