पान:सौंदर्यरस.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
११५
 

 काशी ही या विराणीची (ताईची) जिवाभावाची मैत्रीण. तिला मुलगा झाला. तेव्हा बाळंतविडा घेऊन ताई गेली. काशीच्या आग्रहामुळे तिच्या सासूने ताईला बोलावणे धाडले होते. पण ताई ओटी भरायला पुढे झाली तेव्हा सासु कडाडली, 'काय अगोचर आहे ही. अंतरपाटाखालून त्याला हिचे पाय दिसले, अन् तो पळाला, अशी ही पांढऱ्या पायाची मंगलकार्यात आपण पुढे पुढे करू नये हे कळू नये तिला ? आणि विहीणबाई तुम्हालाही ? तुम्ही कशी तिला पुढे होऊ दिली.'
 समारंभ संपल्यावर काशीने ताईची माफी मागितली आणि ती म्हणाली, 'अशा वेळी मला त्याचा फार राग येतो. आपण पळून जाऊन गोसावी झाला, पण मागे तुझं काय होईल याचा विचार केला का त्यानं? अन् म्हणे चिंता करतो विश्वाची! डोंबलाची आली आहे चिंता विश्वाची!'
 ताईला अशी टीका केलेली आवडत नसे. ती म्हणे, 'अग, मनुष्यदेह कुठे वारंवार मिळतो ? आणि तेव्हा त्याचं सार्थक करायला कुठे संधी मिळते ? स्त्री म्हणजे माया, असं साधुसंत नाही का म्हणत? म्हणून ते विवाहापासून दूर राहिले. शिवाय मीही अनायासे मुक्त झाले प्रपंचातून! मनुष्यदेह सार्थकी लावण्याची त्यांनी मला संधी दिली म्हणून मी कृतज्ञ आहे. ते तसे निघून गेले नसते तर मला ही संधी मिळाली नसती.'
 असे वाद नेहमी चालत. काशीला तर कधी कधी मैत्रिणीच्या दुःखामुळ रडू कोसळे. पण अशा वेळी ताईच तिचे सान्त्वन करी. पुनः पुन्हा ती सांगे, 'तू का शीण करतेस ? मला अपार शांती मिळाली आहे. मी अवघ्या पाशांतून मुक्त आहे. माझे चित्त सदा प्रसन्न असते. किती अद्भुत जीवन मिळाले आहे मला ! कधीच कुणाला न गवसलेले. ते ज्यांच्यामुळे प्राप्त झाले त्यांना दोष कशाला देऊ ?'
 पुढल्या काळात तपश्चर्या, तीर्थाटन आटपून समर्थ जांबेस आले. त्यांची कीर्तने प्रवचन होऊ लागली. ताईच्या गावचे लोकही कीर्तनाला जात. काशी पण गेली होती. ताईने तिला विचारले, 'काय सांगितले त्यांनी ?'