महायुद्धानंतर ‘संयुक्त राष्ट्रसंघ' (युनो) अस्तित्वात आला. या जागतिक संघटनेची मदार राष्ट्रा-राष्ट्रांच्या सार्वभौमतेच्या (Sovernignty) पायावर उभी आहे. त्यामुळे युनोला उपजत मर्यादा आहे. शिवाय ती राजकीय संस्था आहे. तिच्या सामाजिक शाखा आहेत. (युनिसेफ, युनेस्को, डब्ल्यूएचओ इ.) त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय आहे पण मानवताकेंद्री नाही. महासत्तांपुढे मानवता प्रतिनिधी असंगत व हतबल होतात असे मत नोंदवत (पृ. १५०) जैनेंद्र ‘मानवीय राष्ट्र' संकल्पनेचा आग्रह धरतात. ‘मूल्यांचा विकास राज्यांच्या दिशेने होतो, नीतीच्या नाही' (पृ. १५१) म्हणत ते समजावतात की, ‘राष्ट्र का वाद हमें उस दिशा में (मानवीय राष्ट्र) बढ़ने से रोकता है, वह वाद नीति को राज्यगत कर देता है। इसलिए वह राष्ट्र विश्वव्यवस्था के सही विकास में साधक होगा, जो अपने ‘सत्व’ और ‘स्वत्त्व' को सांस्कृतिक और मानवीय स्वरूप देकर उस आधार पर सर्वथा निःशस्त्र बनेगा, जो अपने भीतर सर्वथा समभावमूलक अर्थ रचना और समाज-रचना उठाकर विश्व की राजनीति के आँगन में आयेगा।" जैनेंद्रांच्या या सर्व चिंतनात महात्मा गांधींचा आग्रह व स्वप्नदर्शिता आहे. हे वेगळे सांगायला नको.
कुटुंब, विवाह, प्रेम इ. प्रश्नांवरही या ग्रंथात विस्तृत विचार करण्यात आला असून तो पूर्वपश्चिम संस्कृतीच्या संदर्भात तुलनात्मक रीतीने होत राहिल्याने या दोन्ही संस्कृतीची बलस्थाने व नर्मबिंदू ओघात स्पष्ट होत राहतात. वाचक स्वतःचे आकलन तयार करत ते वाचत राहतो. वाचकांना या विचारात सहभागी करून घेण्याचे कौशल्य जैनेंद्रांच्या या हितगुजात आहे. जैनेंद्र वक्तृत्वात नि अनौपचारिक गप्पांत समोरच्याला प्रश्न विचारत सहभागी करत राहायचे, हे मी अनुभवले आहे. तीच शैली ‘समय और हम मध्ये प्रतिबिंबित झाल्याने हा ग्रंथ लेखक-वाचक संवाद केव्हा बनून जातो, ते कळत नाही. पश्चिमी प्रभावांनी बदलत्या भारताचे जैनेंद्रांना असलेले भान या ग्रंथात वारंवार डोकावत राहते. युरोपीय चर्च आणि क्लब आणि आपल्याकडील मंदिरे व मंडळे यातील फरक ते चपखल स्पष्ट करतात (पृ. १७१). कुटुंबाचा पाया हा परस्पर विश्वास असायला हवा, असे आपले
आग्रही मत मांडायला जैनेंद्र विसरत नाहीत (पृ. १७२) या ‘पश्चिम खंडातील ‘सिक्का, उन्नति और नीति' हे प्रकरण वाचकांनी मुळातूनच वाचायला हवे. औद्योगिक क्रांतीने आलेल्या भौतिक संपन्नतेवरही युरोपात बेकारी, गरिबी असावी याची चिकित्सा करताना त्यांनी म्हटले आहे की