पान:साथ (Sath).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "अर्थातच नाही. असं बघ. तुला माहीताय इथून कुणाशीही पटकन संपर्क साधणं किती कठीण आहे ते. फोन बहुतेक वेळ चालू नसतातच. आपल्या जवळ रेल्वे नाही, ट्रक पाहिजे त्या वेळी मिळत नाहीत. अशामुळे आपला धंदा दुसऱ्यांच्या हातात जाणार."
  " सगळा धंदा काही जात नाही. आपल्याकडून वीस वर्ष बी घेणारे लोक काही एकदम आपल्याला सोडून जाणार नाहीत. आपलं बियाणं खात्रीचं असतं हे त्यांना माहीत आहे."
 " बियाणं कितीही खात्रीचं असलं तरी ते पेरणीच्या वेळेवर पोचलं नाही तर आपलं गिऱ्हाईक नक्कीच दुसरीकडून खरेदी करील. तुला माहीत आहे, पाऊस पडेपर्यंत डीलर काही बी ऑर्डर करीत नाहीत. ऑर्डर पाठविल्यावर मात्र त्यांना बी ताबडतोब हवं. कारण ते नाही मिळालं तर शेतकरी दुसऱ्यांकडून खरीदणार. तेव्हा आपण जर त्यांची ऑर्डर लगेच पुरी करू शकलो नाही तर ते दुसरीकडे जाणार. आपण ह्या धंद्यात पडलो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता स्पर्धा इतकी तीव्र आहे की जुने संबंध आहेत म्हणून केवळ आपलं गिऱ्हाईक आपल्याला चिकटून राहील असं मानणं मूर्खपणाचं आहे."
 " समजा, तुझं बरोबर आहे. तरी आपण पुण्याला जाण्याचं काय कारण आहे ? आपण तिथे गोडाउन भाड्यानं घेऊन त्यात माल ठेवू शकतो. एक लहानसं ऑफिस फक्त तिथे ठेवायचं. आपण तिथं गेलो तर इथलं सगळं कोण बघेल ?"
 " आता आपल्या हाताखाली तयार झालेली चांगली माणसं आहेत की आपल्याकडे. आणि आपण येऊन जाऊन असूच."
 " आणि अकाउंट्सचं काय ? तिथे राहून मी कसे ते बघू शकणार?"
 " अर्थातच नाही. ते सबंध खातंच आपण पुण्याला हलवू. तिथे तुला जास्त चांगला स्टाफ पण मिळू शकेल आणि तुझा भार थोडा हलका होईल."
 "राम, हे सगळं इतकं अनपेक्षित आहे. मला जरा विचार करू दे त्याच्याबद्दल. एवढा महत्त्वाचा निर्णय घाईगर्दीने घ्यायला नको."

साथ: ११९