Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५०
सज्जनगड व समर्थ रामदास.

जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं ।
संसार करीत असतांही । समाधान ॥
यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासंकटें सांकडीं ।
संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥
उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥

 वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें.
 दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे.

जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥

 समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे.
 याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे.
 तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरूपण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी व निराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टिरचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं.

मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥