दायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.
हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.
शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी
शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:-
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसि आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयाशी ।
जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥
नरपती, गजपती, हयपती। गडपती, भूपती, जलपती ।
पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागीं ॥