पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सतत सत्याग्रह केला. खरे तर नानाजीचे मोठे चिरंजीव दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले, काँग्रेसचे लोकप्रिय आणि सद्भावी कार्यकर्ते. पक्षापेक्षाही लोकनीती आणि सामाजिक न्याय श्रेष्ठ असे नानाजींचे ठाम मत आहे. सुरवातीला पोलिस नानाजींना पकडत आणि लगेच सोडून देत. नानाजींना सोडून दिले की लगेच चार दिवसांनी ते शहराच्या मध्यवर्ती चौकात आणीबाणीचा निषेध करणारा फलक घेऊन सत्याग्रह करीत. शेवटी नाइलाजाने त्यांची रवानगी नासिकच्या मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. पूर्ण मराठवाडयात या सात्विक स्वांतत्र्य सैनिकाबद्दल नितांत प्रेम आहे.
 अशात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत. वसंत ऋतु संपला आहे. जेलमध्ये येऊन वर्ष झाले आहे. जेवण बरे असते, तुप, गुळ सारे मिळते. पण दिवस जाता जात नाहीत. जमात ए इस्लामीच्या विदर्भातल्या कार्यकर्त्याचे वडील अल्लाला प्यारे झाले. पण त्यांचा जनाजा उचलण्यासाठी, पित्याला शेवटचा खांदा देण्यासाठी मझर भाईना पॅरोल मंजूर झाला नाही. दातार काकांच्या पत्नी दोन वर्षापासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी आली. पण काकांना नाशकातल्या नाशकात जाण्यासाठी दगडी भिंत ओलांडता आली नाही. अशा बातम्या आल्या की वाटे दहा दिशांना फक्त अंधाराच भरलाय. उजेडाचे स्वप्न पाहण्याचे धाडस हरवू लागलेय. परंतु जाती धर्माच्या वैचारिक मतभेदांच्या भिंती मात्र ढासळू लागल्या होत्या. अगदी सहजपणे, नकळतपणे, दातारकाकांचा हात मायेने घट्ट धरून मुक्याने अश्रू गाळीत सांतवन करणारे रमजानभाई, दुःखाच्या आवेगाने कोसळलेल्या तरूण मझरभाईला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवणारे कुलकर्णी काका…
 अशोक, अण्ण्या, अमन अलिकडे अबोल झाले होते. सतत सलणारं, कुणाला सांगायलाही संकोच वाटावे असं एकटेपण सगळ्यांनाच अबोल करणारे. औशाच्या सहदेव सोळुंके या तरूण वकिलाच्या पत्नीने एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची वार्ता आल्यापासून जो तो आतून हादरला होता.
 श्रीनाथ कोऱ्या करकरीत मनाने व्हरांड्यातून वेगाने फेऱ्या मारू लागला. मध्यरात्र उलटली होती.

 नरहरी अण्णा पायाची जुडी करून भोवती हात बांधून डोळे मिटून कॉटवर बसले आहेत. त्यांनाही झोप येत नाहीय. त्यांना मुल ना बाळ, देवाघरी गेलेल्या धाकट्या बहिणीची मुलं आपलीच म्हणून सांभाळणारे नरहरी अण्णा. त्यांची साधी


शोध अकराव्या दिशेचा / ७७