पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परंतु विधायक कार्य करणाऱ्यांच्या मनात समताधिष्ठीत समाजाच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना नसेल तर मग ते 'दिखावू कर्मकांड' बनते. बदलावने आपल्या तरूण मित्रांच्या मनात समताधिष्ठित समाजाची संकल्पना स्पष्टपणे गोंदवावी. राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष नेहमीच तुम्हाला मदत करील."
 त्यानंतरच्या बदलावचे तरूण डोंगर भागात नियमितपणे जाऊ लागले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक यांनी लहान शेतकऱ्यास सहाय्यक ठरणारी सामुदायिक विहिरीची योजना जाहीर केली. पण प्रत्यक्षात विहिरी कागदावरच राहिल्या. काही अर्धवट तर काहींचे नुसते खड्डे खोदलेले. चांगल्या योजनांचा खेळखंडोबा करून स्वत:च्या तुंबड्या भरणारी शासकीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांच्या या कारवायांवर श्रीनाथ, अण्ण्या प्रकाश, बप्पा आदींनी डोंगरात व अलिकडच्या भागात फिरून शोध घेतला. श्रीनाथने त्यावर प्रत्यक्ष माहिती व आकडेवारीचा आधार घेऊन लेख लिहिले. ते 'माणूस' या पाक्षिकातून प्रसिध्द झाले. लेखांनी अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. आणि पुढाऱ्यांचीही. ते दिवस आठवून अनूचे मन आतल्या आत गुदमरून जाई. वाटे, मी मात्र संसार आणि नोकरीचं एकसुरी गाणे गात वाटेतल्या विसाव्याच्या दगडासारखी एकजागी उभी आहे. अस्वस्थता मनात घेऊन आली की ती राम मनोहर लोहियांचे 'ललितलेणी' किंवा विनोबाजींचे 'गीता प्रवचने' समोर घेऊन बसत असे. ललितलेणी मधील शेवटचा लेख 'अथ योगानुशासनम्' बळ देणारा होता. बेचाळिसच्या काळातल्या राजकीय कैद्यांचा छळ इंग्रजांनी टोकाला जाऊन केला. त्यात संयमाने रहाणारे कैदी... डॉ. राम मनोहर नोंदवतात, 'एक शिपाई सगळ्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या नावाने शिव्या घालू लागला. माझे पित्त खवळले तरीही मी गप्प बसलो. मग त्याने गांधीजींचेही नाव घ्यायला सुरवात केली. 'चूप बस' असे मी बेंबीच्या देठापासून किंचाळलो. त्या किल्ल्यात बाजूबाजूला कोणी मित्र नव्हते माझ्या ओरडण्याला अर्थ नव्हता. अशावेळी माणूस विचार करून थोडाच वागतो? अविवेकाने शरीराचा ताबा घेणे हेही निकोपपणाचे लक्षण आहे....'



शोध अकराव्या दिशेचा / ७१