पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंचनद्यांचे नृत्य भरतनाट्यम शैलीत बसवून घेतले होते. अनूचे जेष्ठ सहकारी प्राध्यापक अण्णा अणदुरे यांचा हात लिहिता होता. 'गल्ली ते दिल्ली' हे राजकारणाची खिल्ली उडविणारे खुसखुसीत वगनाट्य त्यांनी लिहिले होते. ते वाचून श्रीलही उर्मी आली. आणि त्यानेही वगनाट्यात भोळ्या संभ्याची भूमिका केली. नाठाळ नि भांडखोर मंगलीची भूमिका अनूने छोट्या ईराला सांभाळत टेचात रंगवली. अन्नदाता या नृत्यनाट्याच्या सुरवातीला अनूतल्या कवयित्रीने एक तुकडा जोडला होता.

सधन सावळे मेघ भरारा वाऱ्यावर वाहती
पाण्याच्या पांगळ्या पखाली दूर दूर नेती
काळी आई तहानलेली सुकलेल्या ओठांनी
ग्रीष्माच्या तलखीत आळविते पाण्याची गाणी..

नृत्य करणारे शेतकरी… शेतकरणी लयबध्द अभिनयातून पावसाची वाट पहाणे, मातीला स्पर्श करून तिचे कोरडेपण, तिचे पावसासाठी आसुलेले मन साकार करीत. ते पाहतांना मराठवाड्यातील प्रेक्षकांना दुष्काळ आठवे.

 त्या वर्षी थेट हिंगोली पासून ते उदगीर औरंगाबादपर्यंत कला पथकाचे कार्यक्रम झाले. खुर्दा बराच जमला. बक्षीस समारंभासाठी या वेळी सुधाताई, बापूसोबत एसेम् अण्णांना बोलावण्याचा घाट घातला. एसेम् अण्णा आले नेहमीप्रमाणे शेवटच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अर्जुनराव सरांनी हिशेब सादर केला. त्यात यावर्षीचा बारा प्रयोगातून खर्च वजा जाता सात हजार रूपये उरले होते. त्यातील पुढील वर्षाच्या तयारीसाठी हजार रूपये ठेवून, छोट्या कलाकारांना बक्षीसे देऊन डोंगर विकासासाठी काम करणाऱ्या बदलाव संघटनेस पाच हजार रूपयांची मदत जाहीर करून एस्सेम अण्णांच्या हाताने ती रक्कम श्रीनाथला दिली होती. अण्णांनी बदलाव संघटनेने केलेल्या विविध आंदोलनाची माहिती घेतली होती. रात्रीच्या जाहीर सभेत बदलावंच्या युवाशक्तीचे अभिनंदन करताना ते म्हणाले होते,
 "लोकशाही अर्थपूर्ण करायची असेल तर केवळ कायदा करून भागत नाही. लोक शिक्षणावर भर दिला पाहिजे. कलापथक हे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे प्रभावी माध्यम आहे. समाजात जो अगदी शेवटच्या पायरीवर आहे त्याच्या हिताचा विचार सतत मनात ठेवला पाहिजे. त्याच्या विकासाशी आपली बांधिलकी आहे. आज राज्यकर्ते नैतिक मूल्याबद्दल बेपर्वा झालेत. अशा वेळी आपला संघर्ष रचनात्मक हवा. तुम्ही विधायक काम करीत आहात. ते लोकशिक्षणाचे प्रभावी साधन आहे.


शोध अकराव्या दिशेचा / ७०