पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटली. अनुभवातून चिमुकलं मूलही कसं शहाण होतं हे अनुभवून आत कुठेतरी थर्र झालं.
 असे एकाकी किती दिवस?... किती महिने?... कि किती वर्षे?... राज्यशास्त्राचे अत्यंत अभ्यासू म्हणून लौकीक असलेले तिचे प्राचार्य राजगुरु काहिसे खवचट पणे हसत काल म्हणाले होते.
 "मॅडम, किती वर्षे लागतील ते सांगता येत नाही. ही आणीबाणी मंत्रीमंडळाची बैठक न घेता, थेटपणाने लादली आहे. आणि केवळ बाह्य आणीबाणी नाही तर अंतर्गत आणीबाणी आहे....
 जपून रहा. फक्त महाविद्यालय आणि घर एवढच पहा. कला पथक, राष्ट्रसेवादल... वगैरे सारे कुलूप बंद ठेवा...."
 अनूच्या डोळ्यासमोर विवाहानंतरची आठ वर्षे, त्या आधीचे प्रियाराधन आठवले, विवाह करण्यापूर्वी, एकाने भाकरीची सोय पहायची आणि दुसऱ्याने सामाजिक परिवर्तनाची बांधीलकी स्विकारून काम करायचे हा घेतलेला निर्णय… त्या दिशेने केलेली वाटचाल… सारे काही क्षणभरात वेगाने गागरून चक्रीवादळासारखे समोर येऊन गेले. लग्नापूर्वीचे ते निर्णय बेकंबेच्या पाढ्यासारखे साधे, सोपे, सरळ वाटत. जीवनसाथीने व्यवसायाच्या माध्यमातून घरासाठी पैसा मिळवावा असे कधीच वाटले नाही, आणि आपल्याला मिळणारा पगार हा दोघांचा आहे, हीच भावना दोघांच्याही मनात रूजलेली होती. स्वतंत्र भारतात, स्वंय निर्णयाच्या .... विचार करण्याच्या, ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे कधीच… नव्हे स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आज?...?...?

 भोवतालचे सारेच लोक बजावत होते, जपून रहा. मोजकं बोला. कुणाचं काहीही ऐकू नका. न पाहावलं तर स्वतःचे डोळे मिटून घ्या. हे असं जगणं मान्य करायचं? मनातले कढ सतत उसळ्या मारीत असत. पण समोर होते जनक आणि इराचे मासूम चेहरे. उपेन्द्र जातांना बजावून गेले होते.
 "अनू, तुमचे रिकामी घागर मोर्चा, महागाई हटाओ मोर्चा… सारेच, काही दिवस बंद ठेवा. श्रीनाथचा डाव तुला सांभाळून खेळायचा आहे. लातूरच्या अनिताला काल लहानग्या मुलोसह येरवाड्याला पाठवल्याचा निरोप आलाय. म्हणूनच मी धावत पळत तुला सांगण्यासाठी इथवर आलो." उपेन्द्र धीर देऊन बीडला गेले. तिला लातूरची अनिता खोब्रागडे आठवली. युवक क्रांतीदलाची कार्यकर्ती. मंगेश देशपांडे


शोध अकराव्या दिशेचा / ६२