पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या लेकरांचे पण कसे हाल होतात. साऱ्या अडचणी पवार साहेबांनी शांतपणे लक्षपूर्वक ऐकूण घेतल्या आणि त्या दूर करण्याचे विशेषतः पाळणाघर, अंगणवाडी कामाच्या जागी सुरु करण्याचे व काम दोन किलोमिटर पेक्षा दूर न ठेवण्याची शिफारस करण्याचे आश्वासन दिले. जाताना अंकुशाच्या पाठीवर दिलाशाची थाप दिली.

 अंकुशाला त्याच्या दादांनी चौथीनंतर बनसारोळ्याच्या शाळेत शिकायला ठेवले होते. महिना पंधरा रूपयात जेवण आणि शाळेची फी. त्यामुळे अंकुश दहावीपर्यंत तिथे शिकला. दहावीत चांगले गुण मिळाले. परळीच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा. पण तिथे वसतीगृहाची सोय नव्हती. खोली करून चौघे राहत. घरून येताना जवारीच पीठ, तांदुळ, दाळ घेऊन येत. हाताने रांधून खात. सकाळी सातलाच कॉलेजला जावं लागे. प्रयोगशाळेतील तास आटोपून घरी यायला संध्याकाळ होई. भाकरी नि तेल तिखट कांदा, नाही तर तव्याररचा झुणका असा दुपारचा डबाबरोबर घ्यावा लागे. रात्री मात्र डाळ भात नाहीतर भाजीची संगत लागे. पोटात भूक ठेऊन पुस्तकातही मन बसत नसे. त्यात संक्राती अगोदर दादांना बुळकी लागली. डॉक्टरच औषध मिळण्याआधीच अंगातलं पाणी कमी झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तो दुःखाचा तडाखा जबरदस्त होता. आई तर आठवतच नाही. अंकुश नंतरच्या बाळंतपणात बाळबाळंतिण दोघेही दगावले होते. मूल आडवं आलं की बाईचं जगणंच संपलं. गावातली मन्नादाई तिला जमेल ते उपचार करी. पण अशी अडलेली एखांदीच वाचायची. अंकुशची आई मूल आडवे आल्यामुळेच मरण पावली. माय गेल्यावर त्याच्या दादांनी दुसरे लग्न केले नव्हते. अंकुशाने परीक्षा दिली पासही झाला. पण जुन्या रितीरिवाजानुसार चुलत्यांनी वर्षाच्या आत अंकुशचे लग्न करून दिले. अंजनी काळी सावळी पण नववी पास झालेली. लगीन झाल्यावर आडीच वर्षांनी सोनूचा जन्म झाला. एकोनसत्तर पासून पाऊस वेळेवर झालाच नाही. जुलै उजाडला तरी पावसाला सुरवात नसे. आगाताचे डोंगरात येणारे पीक म्हणजे पिवळा आणि उडीद. त्याच्या दहा एकरात धोंडे गोटेच जास्त. जेमतेम दीड एकर बरे रान होते. बाकी सगळे चढ उताराचे. पाऊसकाळ संपायला आला की हस्त दणदणा बरसून जाई. लोखंड्या हस्त पडला की जमीन गच्च होऊन जाते. लागोपाठ दोन वर्षे फार जिकरीची, कठिणाईची गेली. शेवटी लंगड्या रामकाकाला गावी सोडून तो


शोध अकराव्या दिशेचा / ५०