पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "तुला जे पटेल ते कर. पण उद्या तुझं काम त्यांच्या मनाला आलं नाही तर… विचार करून सांग माझी ना नाही".... अंकुश निघून गेला.
 मुख्यमंत्री वसंतदादा यांना वेळ नव्हता म्हणून पवार साहेबांनी श्रीभैय्या, बाप्पा देशमुख, आण्णा, अशोका, कौसडीकर पाटील आदि शिष्टमंडळाचं निवेदन मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्विकारलं. आणि मोजक्या आठ दहा जणांना चर्चेसाठी बोलावलं. बाप्पांनी अंकुशालाही येण्याचा आग्रह केला आणि तो गेला. एक गाव एक पाणवठ्याच्या दौऱ्यात श्रीनाथ आणि पवार साहेबांची ओळख झाली होती. त्यांच्या मनात पवार साहेबांबद्दल विश्वास होता.
 श्रीभैय्या आणि बाप्पा देशमुख सर्वाच्या मनातले दुःख पवार साहेबांच्या समोर मांडत होते. दहावी बारावी पास झालेल्या डोंगरातल्या तरूणांच्या शेताला पाणी नाही. उच्चशिक्षणासाठी शहरात ठेवायला बापाजवळ पैसा नाही. धोब्याच्या कुत्र्यासारखी गत. न घरका न घाटका. याचं जित्तं उदाहरण म्हणजे अंकुश. त्यातून तो विचार करणारा. वर्तमानपत्र वाचणारा आहे. गोविंददादांनी साहेबा समोर जितं उदाहरण ठेवलं अंकुशाचं. मुंबईत आल्यापासून तो बोलतोही नेमकं आणि बिनतोड. म्हणूनच त्याला सोबत घेणे गोविंददादांना महत्वाचे वाटले होते.

 'दादा मी डोंगरातल्या दगडवाडीचा. धा एकराचा मालक. पण जमीन उताराची, दगडांनी भरलेली. ते दगड वेचून पौळ भरून पाणी आडवावं अस दहांदा मनात येई. पन त्यालाही पैसा हवं. बहिनींना उजवतांना घरातली भांडीकुंडी, बैल, औत इकले. हीर हाय पन पानी नाही. चार साल पानी पडलं नाही. खानार काय? शेवटी उचललं गठूड आन् आलो हितं. बारावी सायन्सला बावन टक्के घेऊन पास झालो. पन पुढे शिकाया पैसा हवा. आता करतो गवंडी काम. पन दादा आमची नाळ… आमचं मन गावाच्या मातीत पुरलंय. कंदीतरी गावाकडे जायचं सपन रोज उराशी घेऊन झोपतो. माज्या सारखे अनेक हाईत.' अंकुशचा आवाज बोलतांना जड झाला. रोजगार हमीच्या कामातही कसा भ्रष्टाचार चालतो याचे पुरावे बाप्पांनी समोर ठेवले. रस्ता केला तर तो दोन दिवसात परत होत्याचा नव्हता होतो. रोजगारासाठी काम गावापासून दोन किलोमिटरच्या पेक्षाही लांब असेल तर बायांना फार त्रास होतो. बायामध्ये नव्वद पंच्च्यानव्व टक्के अंगठा उठवणाऱ्या, त्यांचा अंगठा आठ रूपयावर घेतात पण हातात सहा रूपयेच पडतात. या कामावर साठ ते पासष्ट टक्के बायाच असतात.


शोध अकराव्या दिशेचा / ४९