पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समदेच आलेत. पण म्होरक्या शिरीभैय्याच. आरं आपल्या भागातील लई माणसं पुन्या ममईकडे येतात. का तर जमिनी कोरडवाहू. गेल्या चार सालापासून दुसकाळाचा फेरा. आपल्या मुलखात शंभरातली ऐंशी हिस्सा जिमीन मोठ्या तालेवार शेतकऱ्यांकडं असती. आन् त्यांची संख्या शंभरात जेमतेम पंधरा. ते हिरी पाडू शकतात. पैसा असतो त्यांच्याकडं. आन् शंभरातली वीस हिस्सा जमीन आपल्यासारख्या दीड दोन एकरवाल्या शेतकऱ्याकडं. आपन छोटे शेतकरी सत्तरटक्के. बिगर शेतीवाले शंभरात. जेमतेम पंधरा." गोविंददादांनी ठेक्यात सांगितले.
 "व्हय, व्हय, घरी लेकीचं लगीन काढलं, नाय तर बुढ्या माणसांची मौत झाली तर पैसा लागणार. धा-वीस हजाराच्या आसपास. अशा वेळी जवळ विकाया काय असतया? मग काढा जमीन. घाला सावकाराच्या घशात. अवं अशा वेळी कालचा लहान काश्तकार रस्त्यावर येऊन उघडा व्हतो." अंकुशाला गोविंद दादाच बोलण पटलं. अन् त्याने आपले मन मोकळे केले.
 "अंकुशा अरं तुझ्याच तोंडचे शब्द श्री भैय्या बोलतात. ते म्हणतात, आजचा लहान शेतकरी उद्याचा भुमिहीन मजूर बनून देशोधडीला लागतो. ममई पुण्याच्या झोपडपट्टीतील कुटुंबाची माहिती काढली तर लक्षात येतं की हजारो मजूर बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून आले हायेत. मराठवाड्यावर अडिचशे वर्ष निजामाने सत्ता गाजविली. सामान्य शेतकऱ्यांसाठी, बलुतेदारांसाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. रझाकाराच्या धामधुमीत माणसं भरडली गेली. बायांना सूर्यदर्शन व्हत नव्हतं. आपला भाग भारतीय स्वातंत्र्यानंतर तेरा महिन्यांनी निझामाच्या जोखडातून बाहेर आला. महाराष्ट्रात आमचे पाच जिल्हे घालण्यासाठी आमी हट्ट धरला. त्याला बी आज वीस वर्षे होऊन गेली तर काय मिळालं आपल्याला?...अं.." बोलताना गोविंददादांना धाप लागली.
 "दादा शांत व्हा. तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे. पण आता बाप्पा श्रीभैय्या आणि अनेक तरूण या प्रश्नाला भिडले आहेत ना? अशा वेळी आपण खेड्यातल्या लोकांनी त्यांच्या बरोबर व्हायला हवं." दादांना शांत करीत अंकुश बोलला.

 "व्हय व्हय.... अरं तुझ्यासारखी थोडंफार शिकल्याली पोरं ममई, पुण्याकडं बराशी खंदाया येऊन बसली तर त्या शेरातल्या जाणत्या पुढारी पोरामागं काय आम्ही खेड्यातल्या बुढ्यांनी जायच?" अंकुशाचा हात झटकीत गोविंद दादा बोलले. पुन्हा


शोध अकराव्या दिशेचा / ४७