पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते." गोविंद दादा सांगत होते. ऐकणाऱ्यांची हसाव की रडाव अशी गत.
 "अंकुशा, ल्येका तू गेला संकरातीनंतर त्या नंतरच्या सालीच बाबासाबाची जयंती झाल्यावर २४ एप्रिलला लई मोठा मोर्चा काढला आमी बदलाव तरूण इकास मंडळानी. पाच-दहा हजार माणसं असतील, तीन हजारावर बाया असतील मोर्च्यात. मिरग आला नि न बरसता ग्येला. आर्द्रा आल्या नि गेल्या. या साली हस्ताचा पाऊस आला. पण तो लोखंड्या हस्त. समदी जिमिन गच होऊन बसली. शेतकऱ्याला आशा असते वो. तशा दुष्काळात जमीन नीट नेटकी कराया झटला. मंग बदलाव तरून इकास मंडळानी ठरिवलं की मोर्चा काढायचा आन् डेपूटी कलिक्टराच्या हापिसावर हल्ला बोल बोंबलायचं. येक टोक हापिसात होतं तवा दुसरं टोक भर बाजारात होतं. समदे लोक भाकऱ्या बांधून आलेवते. बदलावच्या पोरांनी झुनका नि मिर्चुचा ठेसा दिला. म्हाताऱ्यांसाठी खिचडी केली होती. आपल्या देवठाणच्या शेवंतामावशी, दगडवाडीची राणूमाय, भामरीची उषा मास्तरीण यांनी ऐन वेळी भासणं ठोकली. शेवंता मावशीनं तर गानं जुळवून म्हटलं."

हाताला न्हाई काम, कनवटीला न्हाई दाम
पोटात न्हाई भाकर, च्यात न्हाई साकर
अन सरकारा, नकोस मारू गमज्या,
आंदी खाली उतर...

 मंग राणूमाय कशी व्हावी मागं.

जिमनीचा घसा कोरडा, घरात पोरांचा उताडा
मालक ओढतो कोरडा, दारू पायी इकला वाडा
अरं सरकारा, दारूचा माठ तुमी फोडा
नायतर खाली उतरा...

 लई झ्याक झाला मोर्चा.
 "अरं गोईंदा खेड्यातल्या बायांना काय अक्कल नसती? लई हुशार नि बेरकी असतात बरका, भाकर तव्यावर टाकली तर त्याचीच पचते अन् फिरते. कालवण बी त्यांनीच करावं. अरं म्हणून तर हा रेसमी शालू बांदून ठिवावा लागतो बासनात. येगवेगळ्या पक्षांची माणसं बी आली असतील मंग." शिवादादांनी विचारले.

 "आले की समदेच. जनसांघ, काही कांग्रीसची मानसं, सोसालिस्ट आंबेडकरवाले


शोध अकराव्या दिशेचा / ४६