पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालकाची संख्या त्या मानाने कमी आणि दीड दोन एकरवाले छोटे शेतकरी जास्त. इकडच्या जमिनी कोरडवाहूच. छोट्या शेतकऱ्याला बारा चौदा हजाराची विहीर परवडणार नाही. म्हणून तीन, चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विहिरीचा खर्च करावा. शासन त्याला मदत करील. पाण्याचे समान वाटप करावे. पाळीपाळीने पाणी घ्यावे. अर्थात न भांडता तंडता… अशी ही योजना."
 "न भांडता? हे कस व्हावं? भाऊ सख्खे आणि दाईद पक्के, ही म्हण काय आभाळातून पडली? सामाईक विहिरीवरून वाद वाढले नसते तर माझे शेतीतील डबल पदवी घेतलेले पतीराज, सातारा सोडून या मुरमाड माळावर आले असते का?... म्हणे अधिकारी बेरकी असतात!" सुधा वहिनी मध्येच खर बोलल्या "गप्पेऽऽऽ अधिकाऱ्याची बायको म्हणून श्यान नग मारूस. तर ही योजना आपल्या भागात फक्त कागदावर राहिली. आम्ही अधिकारी आणि आमचे पिट्टू कारकुंडे कागदी घोडे नाचविण्यात लई तरबेज असतोत. तस्सच झालं. घ्या शोध हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सामुदायकि विहिरी दाखवा आणि हज्जार रूपये मिळवा. माझ्याकडून. मात्र आमचं नाव न सांगता हं. आम्ही आपले झाडं लावणारे अधिकारी. पाणीच नाही तिथे झाड कशी लावणार?..."
 'चला चला उठा, तुमचा लई वेळ खाल्ला आमी.' अस म्हणत पोटावर हात फिरवीत नि मिशांना पीळ भरीत मोहिते काका गदगदून हसले.

 दगडवाडीचा चढाव चढतांना मोटार सायकल हातात धरूनच चढावे लागते. प्रचंड दमछाक. अवघा चढाव दगड गोट्यांनी लदबदलेला. भर बाराचं ऊन डोक्याला गमछा बांधला तरी झळा कानाला वाफाळत होत्या. चढाव चढून आल्यावर प्रकाशने गाडी सुरु केली. ते गावात आले. गाव कस सुनसान, वडाच्या पारावर दोन जख्खं म्हातारी माणसे बसली होती. पारावरच्या देवळीत मुंजाबाचा लाल सेंदूर फासून ठेवलेला दगड होता. तो पहाताच पक्याने माथा टेकून दर्शन घेतले. ते क्षणभर पारावर टेकले. बाटलीतल कोमट झालेलं पाणी घशात ओतलं. पण श्रीनाथच्या मनात सामुदायिक विहिरीचं पाणी झिरपत होतं.

 "बाबा, गाव लईच सुनसान दिसतंय. मानसं ऱ्हातात की नाय? कुठ गेली समदी?"
 म्हातारबाबा ठार बहिरे होते. एकाने क्षणभर डोळे उघडले आणि पुन्हा मिटून घेतले. इतक्यात समोरच्या बाजून एक वयस्क बाई आणि दोन तरूण महिला


शोध अकराव्या दिशेचा / ३७