पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 … काल तो आणि बाप्पा देशमुख सहा खेड्यांतून जाऊन आले. धानवट्याचे लामतुरे डॉक्टर, डॉक्टर मोहन त्या भागातही काही खेडी कव्हर करणार आहेत. डोंगरातल्या दगडवाडी, देवठाण, लमाण तांडा अशा अगदी मध्यातल्या भागात त्यांना जायचे आहे. गरज पडली तर देवठाणच्या खरातला निरोप केलाय, की मुक्कामाला थांबू म्हणून. अवघ्या चार दिवसावर मोर्चा येऊन ठेपला आहे. त्याचं नियोजन सोपी बात नस्से. नीट आखणी तर केलीय. पण जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी अस्वस्थताही वाढतेय. खेड्यातले माणसे भाकरी बांधून आणणार आहेत. पिठलं… झुणका मात्र 'बदलाव' संघटना करणार आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय भोंग्याचा खर्च… असे अनेक विचार दशमी खातांना मनातून वहात होते. एवढ्यात मोटर सायकलचा हॉर्न वाजला. दशम्यांची शिदोरी आणि पाण्याची बाटली त्याने शबनम मध्ये टाकली. घराला कुलूप घातले. किल्ली सुधा वहिनींच्या खिडकीतून आत टाकित तो पायऱ्या उतरणार इतक्यात.
 ओ, श्रीनाथ, घरात या. बायकोने केलेला फर्मास चहा प्या आणि मग कामाला लागा. तुमच्या मित्रालाही बोलवा. गुड न्यूज देतो तुम्हाला. या…या…" मोहिते काकांनी अडवले. चहा प्यावासा वाटतच होता. श्रीनाथने प्रकाशला वर येण्याची खूण केली आणि तो घरात शिरला. काकांनी त्याच्यासमोर पेपर टाकला आणि म्हणाले वाचा.
 मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सततच्या दुष्काळावर कायम स्वरूपी तोडगा. येत्या सोळा एप्रिलला मुख्यमंत्र्यां समवेत पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्र सरकार या जिल्ह्यांमध्ये रोजगाराची हमी देणारी कामे सुरु करणार आहे. तातडीच्या नियोजनाची आखणी होऊन एक मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई, कळंब, निलंगा आदि तालुक्यात कामे सुरु होणार.' दैनिक मराठवाड्यात पुढच्या पानावर बातमी होती. श्रीनाथने बातमीवरून नजर फिरवली.
 "काका, ही कामे म्हणजे रस्ते आणि जोडरस्ते बांधणे, पुल रूंद करणे किंवा नवा बांधणे अशीच असणार. दुष्काळालाच बांध घालणारी काम का नाही शासन काढीत?"

 "श्रीभैय्या, आम्हां अधिकाऱ्यांची जात सर्वात बेरकी, लबाड आणि बदमाश. वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरींची योजना इंट्रोडयूस केली होती आठवतं? अत्यंत चांगली योजना. आपल्याकडे २५ एकरापेक्षा अधिक एकर जमिनीच्या


शोध अकराव्या दिशेचा / ३६