पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निजामाची कृपा. परळीहून २२/२४ किलोमिटर्सवर असलेल्या डोंगरावर वसलेल्या आंब्याला निजामाच्या पदरी असलेल्या तैनाती फौजेचे ठाणे होते. योगेश्वरीचे पुरातन मंदिर तिथे आहे. जोगाईच्या आंब्याचे नाव निजामाने मोमिनाबाद असे ठेवले होते. जवळच्या धारूरला निजामाची टाकसाळ होती. तिथला किल्ला खूप जुना. त्यामुळेच परळीत रेल्वे आली. तेवढीच जमेची बाजू. त्यामुळे तिथे व्यापारही चांगला होता. भुईमुगाच्या शेंगाची मोठी बाजारपेठ होती. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर. परळीत कोर्ट नसले तरी वकिलांची चलती होती. तेथील वकिल जवळच्या आंब्याला जात.
 अनू प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली असल्याने आंब्याच्या विद्यानिकेतन महाविद्यालयात अध्यापिका म्हणून तात्काळ नोकरी मिळाली. मग परळी सोडून आंब्याला बिऱ्हाड मांडले. श्रीनाथ वकिली आणि विद्यार्थी संघटनात थोडा स्थिर झाला. मगच जनकचा जन्म झाला. अनू अध्यापन, भरपूर वाचन, लेखन, आल्या गेल्या कार्यकर्त्यांची आवभगत, जनक यात रमून गेला. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला एक वकिल म्हणून श्रीनाथचे नाव लोक घेत.
 गेल्या तीन चार वर्षापासून पावसांच पंचांग बिघडलं होत. वेळेवर येण, जाण नाही, पाऊस आला तरी अपुरा. दुष्काळाच्या फेऱ्यामुळे खेड्यातला माणूस गांजलाय. हजारो माणसे हैद्राबाद, पुणे, मुंबई, सुरत या दूरदूरच्या भागात भाकरीसाठी पांगू लागली. त्यात व्यापारी, धान्य, तेल, डाळी, रॉकेल... यासारख्या रोजनरोज लागणाऱ्या वस्तू गायब करू लागले. चोरून.... मागच्या दाराने दाम-दुपटीने विकू लागले. भोवतालची खेडी ओस पडू लागली.

 गेल्या काही वर्षात श्रीनाथच्या भोवती तरूणांचा चांगला गट तयार झाला होता. त्यात खेड्यातून कॉलेजमध्ये शिकायला आलेली मुल होती. नव्यान गावात आलेले काही अध्यापक, शिक्षक होते. त्यात एक मोहनसारखा उत्साही डॉक्टर होता. नव्यानेच पुण्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली होती. त्याच्या आग्रहामुळे ही तरूण मुले आणि श्रीनाथ भाकऱ्या बांधून डोंगरात जात त्यातूनच दोन तीन खेड्यातील मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली. दर रविवारी सर्वजण डोंगरातल्या खेड्यात जात. नारू सारख्या, पुस्तकातच सापडणाऱ्या रोगाचे रोगी तिथे भेटले. मोहनच्याच डोक्यातून लहान मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली… तीन गावातील मुलांच्या तपासणीतून लक्षात आले की अनेक लहान


शोध अकराव्या दिशेचा / २०