पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षणभर डोळे उघडले. भोवताली पाहिले. पुन्हा हसली श्रीनाथचा हात घट्ट धरून पुटपुटली, 'झोपू दे ना रे' असे म्हणून पुन्हा कुस बदलून मंदपणे घोरू लागली.
 श्रीनाथ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील मोमीनाबाद तालुक्याच्या एका लहानश्या खेड्यातला. मराठवाडा विभाग, त्यातील पाचही जिल्हे, विसाव्या शतकाची साठ वर्षे उलटून गेली तरी सर्वार्थाने मागास आहेत. याची त्याला नेहमी बोच असे आणि रागही. तो बोलतांना नेहमी मनातील खंत व्यक्त करत असे. "यार, आमच्या मराठवाड्यातले पाचही जिल्हे महाराष्ट्रात सामील होऊन बारा वर्षे उलटली तरीही शासन पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हाला सावत्र मुलासारखी वागणूक देते. विकासाच्या नावाने आमच्या भागात कोणतीही कामे होत नाहीत. आमच्या भागातला दिडदोनशे एकराचा मालक असो वा छोटा शेतकरी, बलुतेदार, भुमीहीन मजूर. आम्हाला कोणीही वाली नाही. महाराष्ट्राच्या विकासापासून आम्ही शेकडो कोस दूर आहोत. निजामाने आमच्यावर अडीचशे वर्षे राज्य केले. पण रयतेसाठी त्याने काहीच केले नाही. शेवटच्या काही वर्षात रझाकारांचा धुमाकूळ तर एवढा वाढला की प्रत्येक वाड्यात मागच्या बाजूला एखादा अरूंद आड असे. रझाकारांची धाड आली तर लेकीसुनांना त्यात ढकलून दिले जाई."
 … मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट १९४८ च्या १७ सप्टेंबरला उगवली. रझाकारांची धुमाकूळ घालण्याची क्रूर तऱ्हा, ग्रामीण भागावर असलेली त्यांची दहशत श्रीनाथने तो पाचसहा वर्षाचा असल्यापासून अनुभवली होती. त्याचे मोठे चुलतबंधू वकिलीच्या अभ्यासासाठी हैद्राबादला होते. तेथे नागनाथ परांजपे, राघवेंद्र देशपांडे, अनंत भालेराव, चारठाणकर बंधू यांचे सानिध्य लाभले. शिक्षणासोबतच नव्या पुरोगामी विचारांची पेरणी त्यांच्या मनात झाली. नव्या विचारांबद्दल विश्वासही निर्माण झाला. ते सुट्टयामध्ये गावी येत तेव्हा गावातील मित्रांना नवीनवी माहिती देत असत. त्यांनीच श्रीनाथच्या बाईला… त्यांच्या धाकटया काकीला स्वसंरक्षणासाठी बंदूक चालवायला शिकविले होते. कडक सोवळं ओवळं पाळणाऱ्या त्याच्या घरात बाईच्या पुढाकाराने गावातील गढीवरच्या देशमुखाच्या काकी, माळ्याच्या अन्साबाई अशा चारपाच जणी बंदूक चालवायला शिकल्या होत्या.

 पाचवीमध्ये मोमीनाबादच्या योगेश्वरी विद्यालयात शिकायला आल्यापासून श्रीनाथचे जगच बदलले. सुट्टीत गावाकडे आल्यावर बरोबरच्या अठरा पगड जातीच्या मित्रमंडळींना घेऊन पोहायला जाणं, एखाद्याच्या आमराईत जाऊन अंगतपंगत जमवणं, त्याला नव्याने कळलेली माहिती मित्रांना देण यात सुट्टी कशी जाई हे कळत नसे.


शोध अकराव्या दिशेचा / १७