पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फाटक समाजवादी युवजन सभेच्या आठवडे बैठकीत अनेकांच्या मनातली ठुसठुस मोकळी करीत होता.
 "उदयदांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. हैद्राबाद संस्थानाच्या विभाजनाचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीशी नाळेने जोडलेला आहे. भाषावार प्रांत रचनेला मराठवाड्यातील नेत्यांनी सुरवातीपासून पाठिंबा दिला. तुमच्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी आम्ही निजामाच्या दोनशे वर्षाच्या जोखडातून मुक्त झालो. निजामी राज्यात तेलगू, कन्नड, मराठी भाषिक प्रदेश होते. त्या तीनही भाषिकांचे सांस्कृतिक वेगळेपण होते. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन व्हायला उत्सुक होता. प्रांत पुनर्रचना आयोगाला सादर केलेल्या निवेदनास आमच्या भाईंनी… गोविंदभाई श्रॉफ यांनी तयार केलेली पुरवणी जोडलेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, सत्याग्रहात मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझ्या खेडेवजा गावातून पंचवीस सत्याग्रही गेले होते. मी भलेही त्यावेळी आठवीत असेन पण लख्खं आठवतेय सारे.
 … तसं पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून सामान्य माणसांनी ज्यात झोकून दिले असे किती लोकलढे झाले? आणि जेव्हा जनआंदोलन जोर पकडतं तेव्हा सरकारला गुढगे टेकावेच लागतात. मग ते सरकार आपलं असो की परक्या मुलखातलं पोर्तुगीज सरकार असो. गोवा आंदोलन आठवा.
 तेव्हा गुढगे टेकवतांनाही "मीच तुम्हाला हे मोठ्या मनाने दिले" ही राज्यकर्त्यांची भाषा. तर अमृत कलश कोणी आणला? यशवंतरावांनी!!! भंकस! आपली भूमिका मांडून श्रीनाथ खाली बसला.

 "यार, हा विषय संपवा… संयुक्त महाराष्ट्र मिळून वर्ष उलटून गेलयं. डॉ.बाबासाहेबांच्या 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' वर १५ दिवसांनी चर्चा ठेवू. मी आणि श्री टिपण तयार करून आणतो. भाईंना चर्चेच्या समारोपासाठी बोलावू या. पुढच्या गुरुवारी सर्वांनी भजनाला यायचं! न येणाऱ्यांना दंड." कुमारने पुस्ती जोडली. लक्ष्मी रोडवरच्या कार्यालयातून जिना उतरून सगळे खाली आले. श्री ने घड्याळात पाहिले. सात वाजून गेले होते. अनूकडे पहात तो पुटपुटला, 'पळा लवकर, उद्या भेटू' आणि सायकलवर टांग मारून तो पसार झाला. अनूनेही सायकल लकडीपुलाच्या दिशेने वळवली.
 निशा सामंत समाजवादी युवजन सभेत नियमितपणे जाते. ती राज्यशास्त्रात


शोध अकराव्या दिशेचा / १५